सिन्नर तालुक्यातील गोंदे गावात माळरानावर जिथे केवळ गवती जंगल दिसायचे किंवा खरीपात बाजरी, सोयाबीनची पिके घेतली जात असत त्याच ठिकाणी भाजीपाला पिके घेतली जात आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत सिमेंट बंधारे करण्यात आल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
गावाचे सरासरी पर्जन्यमान केवळ साडेचारशे मिलीमिटर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रामुख्याने खरिपावर अवलंबून रहावे लागे. रब्बी हंगामात विहिरींची पाणीपातळीदेखील खालावत असल्याने रब्बीची पिके घेणे शक्य नव्हते. गहू आणि हरभरा फार थोड्या प्रमाणात होत असे. परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे 2016-17 जलयुक्त शिवार अभियान राबविले. गावाचे ‘वॉटर बजेट’ करण्यात येऊन त्यानुसार कामांची निवड करण्यात आली.
लोकसहभागातून गावातील नाल्यातील 29 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यासाठी शासनातर्फे 3 लाख 25 हजार रुपये डिझेलसाठी देण्यात आले. कृषी विभागाने एक कोटी खर्चाची 14 कामे पुर्ण केली. कृषी सहाय्यक डी.आर. जोशी यांनी ग्रामस्थांना कामांसाठी प्रेात्साहीत केले. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, पंचायत समिती कृषी विभागानेही काही कामे केल्याने गरजेएवढा 515 टीसीएम पाणी अडविण्यात यश आले आहे. अडविलेले पाणी जमिनीतही जिरत असल्याने परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.
सरपंच उषाताई दत्तात्रय सोनवणे यांनी पुढाकार घेऊन जलयुक्तच्या कामांसाठी लोकसहभाग वाढविला. जलसंवर्धनाची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी झाल्याने गाव जलसमृद्ध झाले आहे. गावात मोठ्या प्रमाणात टोमॅटो, मेथी, मिरची, कांदा अशी भाजीपाला पिके आणि डाळींबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही त्यामुळे निश्चितपणे बदलणार आहे.
सखुबाई भाबड- पूर्वी पावसाळ्यानंतर शेत ओसाड पडायचे. आता शेजारीच पाणी अडविल्याने विहिरीला पाणी आले आहे. आता कांदा आणि भाजीपाला घेता येईल, दोन पैसे जास्त मिळतील. |
-डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020