जलयुक्त शिवार अभियान हे केवळ शासकीय अभियान न राहता ती लोकचळवळ झाली पाहिजे. यासाठी शासनाच्या वतीने नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. लोकसहभागातून नाला खोलीकरण, गाळ काढणे, रुंदीकरण यासारखी कामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहेत. यातून प्रेरणा घेऊन धुळे तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन व त्यांचे पुत्र निमेश यांनी शेतातून गेलेल्या नाल्याचे खोलीकरण करुन बांध बांधले आहेत.
धुळे तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन व त्यांचे पुत्र निमेश यांनी राज्य शासनाची मदत घेत शेत शिवार फुलविले आहे. सुरवातीला महात्मा फुले जलभूमी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी बंधाऱ्याचे काम केले. त्यासाठी 53 हजार 769 रूपये एवढा निधी मिळाला होता. अलिकडे राज्य शासनाचा महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतात कंपार्टमेंट बंडिगची कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे झालेले काम आणि कंपार्टमेंट बंडिंगच्या कामामुळे शेतीतील उत्पन्नात भर पडली आहे, असे महाजन पिता-पुत्र आवर्जून नमूद करतात.
सर्वांसाठी पाणी व टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने जलयुक्त अभियान सुरु केले आहे. जलयुक्त शिवार अभियान हे केवळ शासकीय अभियान न राहता ती लोकचळवळ झाली पाहिजे. यासाठी शासनाच्या वतीने नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. लोकसहभागातून नाला खोलीकरण, गाळ काढणे, रुंदीकरण यासारखी कामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहेत. यातून प्रेरणा घेऊन धुळे तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन व त्यांचे पुत्र निमेश यांनी शेतातून गेलेल्या नाल्याचे खोलीकरण करुन बांध बांधले आहेत.
धुळे तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी श्री. महाजन यांची पाडळदे येथेच स्वत:ची शेती आहे. त्यांच्या शेतातून झगड्या नाला वाहतो. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना पीक घेणे अवघड झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या शेतात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. अगोदर आपण करावे मग दुसऱ्यास सांगावे या उक्तीप्रमाणे त्यांनी झगड्या नाल्याचे स्वखर्चाने खोलीकरण केले. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी त्यांनी लहान-लहान जंपिंग बंधारे तयार केले. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीने झगड्या नाल्यावर श्री. महाजन यांच्या शेताजवळ सिमेंटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधलेला आहे. हा बंधारा नादुरुस्त असल्याने यात पावसाळ्यात देखील पाणी साठत नव्हते. हा बंधारा महाजन यांनी पांढरी चिकट माती व दगड-गोटे यांचा 15 फुटापर्यंत थर लावून दुरुस्त केला. जेणेकरुन पावसाळ्यात त्यात पाणी साचेल. त्याचा लाभ त्यांना झाला.
झगड्या नाला शेताच्या मध्यातून जात असल्याने या ठिकाणीही त्यांनी 5 ते 7 फुट लांब व 7 ते 8 फुट रुंद असा कोरावा काढला. हा कोरावा म्हणजे लहानसा बंधारा आहे. या कोराव्याच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे दगड लावले आहेत. यामुळे कोरावा पाण्याने भरल्यावर त्याच्या आऊट लेटमधून सुपीक माती वाहून न जाता फक्त पाणीच पुढे जाते. या नाल्याच्या काही अंतरावर त्यांची विहीर आहे. या विहिरीच्या अलीकडे जमीन 20 ते 25 फूट खोल केली असून वरच्या बाजूने दगड व मातीचा थर लावला. यात कोराव्याने आलेले पाणी मोठ्या प्रमाणात साठणार आहे. याला पुढे विहिरीच्या अलीकडे सांडवल काढली असून सांडवलच्या पुढे गॅब्रियन पद्धतीचा दगड व मातीचा बंधारा बनवून जागोजागी पाणी जिरवले जाईल. पुढे हे पाणी सांडवलद्वारे सिमेंटच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात जाईल. या कामात जवळपास दोन हजार ट्रॅक्टर गाळ काढल्यामुळे नाला खोल झाला आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. तसेच सर्व गाळ शेतात टाकल्यामुळे शेतीची सुपिकता व उत्पादकता वाढणार आहे. ही सर्व कामे जेसीबी यंत्राद्वारे करण्यात आली. या कामासाठी श्री. महाजन यांना आतापर्यंत 9,24,000 रूपयांपर्यंत खर्च आला आहे. धुळे पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता ए.बी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी महात्मा गांधी जलभूमी अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या खर्चापोटी 53,769 रूपयांचे शासकीय अनुदान श्री. महाजन यांना मिळवून दिले आहे.
वरील सर्व कामे करतांना श्री. महाजन यांना तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ आदींचे वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन लाभले आहे.
-गोपाळ साळुंखे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/21/2020