जलयुक्त शिवार अभियान ग्रामीण भागासाठी वरदान ठरले आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याबरोबर शाश्वत सिंचनाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठीदेखील अभियान महत्वाचे ठरले आहे. नाशिक जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्याअखेर असलेली टँकरची संख्या 232 वरून यावर्षी 72 वर आली आहे. लोकसहभागामुळे या अभियानाला चांगली गती मिळाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 या वर्षात जिल्ह्यात एकुण 229 गावांची निवड करण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकुण 8108 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. प्रत्यक्षात एकुण 8110 कामे म्हणजेच शंभरटक्के कामे पूर्ण झाली असून त्यासाठी एकुण रक्कम 181 कोटी 25 लाख खर्च करण्यात आला.तसेच 2016-17 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांनांतर्गत एकुण 218 गावांची निवड करण्यात आलेली आहे. सदर गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकुण रक्कम रुपये 194 कोटी 95 लाखाची एकुण 6069 कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यापैकी एकुण 4657 कामे सुरु झालेली असून त्यापैकी 3618 कामे पूर्ण झालेली आहेत व 1039 कामे प्रगतीपथावर आहेत. सदर कामावर एकूण रुपये 93 कोटी 89 लाख 21 हजार इतका खर्च झालेला आहे.
सन 2015-16 मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेअंतर्गत शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून 591 कामे करण्यात आली असून 36 लाख 26 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 2016-17 या वर्षात 323 कामातून 8 लाख 81 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जल व मृद संधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सरासरी 1.5 ते 2 मीटरने वाढ झाली आहे. अभियानाच्या माध्यमातून 2015-16 मध्ये 41 हजार 803 टीसीएम पाणीसाठा निर्माण झालेला असून एकूण 74 हजार 576 हेक्टर एक पाळी संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.
अभियानाद्वारे समाविष्ट बहुतांश गावात पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असून जिल्ह्याची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 2017-18 साठी अभियानांतर्गत 200 गावांची निवड करण्यात आली प्रत्येक गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेच्या मान्यतेने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फुर्तपणे दिलेला लोकसहभाग हे या अभियानाचे ठळक वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे चांदवड तालुक्याने अभियानाची उत्तमपणे अंमलबजावणी करून राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळविला आहे. शासनाने घेतलेल्या पुढाकाराला जनतेची साथ मिळत असल्याने या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीच्या दिशेने होत आहे.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020
पूर्वी ‘चूल आणि मूल’ एवढंच कार्यक्षेत्र असलेल्या म...
भारतातील समशीतोष्ण/समकोरडवाहू प्रदेशातील सततचा कमी...