जलयुक्त शिवार अभियान ग्रामीण भागासाठी वरदान ठरले आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याबरोबर शाश्वत सिंचनाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठीदेखील अभियान महत्वाचे ठरले आहे. नाशिक जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्याअखेर असलेली टँकरची संख्या 250 वरून यावर्षी 73 वर आली आहे. लोकसहभागामुळे या अभियानाला चांगली गती मिळाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 या वर्षात जिल्ह्यात एकुण 229 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकुण आठ हजार 110 कामे पुर्ण झाली. मजगी, वनतळे, सिमेंट बंधारा आणि विहीर पुर्नभरणाच्या कामांची संख्या यात अधिक होती. पेठसारख्या दुर्गम भागात मातीनाला बांधचा प्रथमच करण्यात आलेला प्रयोगही यशस्वी झाला. एका वर्षात जलयुक्तच्या कामांसाठी एकुण 183 कोटी 49 लाख खर्च करण्यात आला.
तसेच 2016-17 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांनांतर्गत एकुण 218 गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकुण रक्कम रुपये 141 कोटी 42 लाखाची सहा हजारापेक्षा जास्त कामे करण्यात आलेली आहेत. नेहमी टंचाईला सामारे जाणाऱ्या चांदवड, सिन्नर, येवला, कळवण, दिंडोरी, मालेगाव आणि सटाणा तालुक्यात सर्वाधिक कामे घेण्यात आल्याने या तालुक्यांमधील टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी या कामांचा उपयोग होणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने झालेल्या कामांमुळे उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.
सन 2015-16 मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेअंतर्गत शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून 591 कामे करण्यात आली असून 36 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 2016-17 या वर्षात 622 कामातून 14 लाख 53 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात मिळाल्याने योजनेला चळवळीचे स्वरुपा प्राप्त झाले आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जल व मृद संधारणाच्या कामांमुळे विहिरींच्या पाणी पातळीत सरासरी 1 ते 2 मीटरने वाढ झाली आहे. अभियानाच्या माध्यमातून 2015-16 मध्ये 37 हजार 288 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. एकूण 74 हजार 576 हेक्टर एक पाळी संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. तर 2016-17 मध्ये 24 हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. परिसरातील विहिरींची पाणी पातळी सरासरी एक मीटरने वाढली. एकूण 48 हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले.
अभियानाद्वारे समाविष्ट बहुतांश गावात पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असून जिल्ह्याची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 2017-18 साठी अभियानांतर्गत 200 गावांची निवड करण्यात आली प्रत्येक गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेच्या मान्यतेने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गावाचा आराखडा तयार करताना एमआरसॅक आणि जीएसडीए तंत्रज्ञानाचा वापर करून क्षमता उपचार नकाशा (पोटेंशिअल ट्रिटमेट मॅप) तयार करण्या आले आहेत. राज्यभरात अशा 5 हजार नकाशांचे वाटप झाले आहे. त्यामुळे कामाचे जीओ टॅगिंग करण्यास मदत होणार आहे.
मागील दोन वर्षात गावाच्या अनुषंगाने योजना राबविण्यात आली होती. यावर्षी मात्र ‘गाव पाणलोट’ हा घटक धरून कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी क्षमता पाणलोट आराखड्याचे क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. गावाच्या ‘वॉटर बजेटींग’वर देखील भर देण्यात येत असून त्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. अशा सूक्ष्म नियेाजनामुळे या अभियानाची उपयुक्तता आणि परिणामकारकता वाढणार आहे.
लघुसिंचन, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग, वन, कृषि, सामाजिक वनिकरण, भुजल सर्वेक्षण, ग्रामपंचायत, जलसंपदा अशा विविध शासकीय यंत्रणांसह अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फुर्तपणे दिलेला सहभाग हे या अभियानाचे ठळक वैशिष्ट्य आहे. काळानुरूप अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून योजना अधिकाधीक प्रभावी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
जुन्या तलावातील गळती बंद करण्यासाठी प्लास्टिकचे शीट वापरण्याचा पथदर्शी प्रयोग गांगोडबारी येथे करण्यात आला. या प्रयोगाला बऱ्याच अंशी यश आल्याने त्यात काही दुरुस्ती करून राज्यात इतरत्रदेखील असाच प्रयोग करण्यात येणार असल्याने कमी खर्चात अधिक क्षमता निर्माण होणार आहे. जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामेदेखील जलसंधार विभागामार्फत हाती घेण्यात येत आहेत. नव्या प्रकल्पांवर होणाऱ्या खर्चापेक्षा कमी खर्चात अशी कामे केल्याने उपयुक्त पाणीसाठा निर्माण करणे शक्य आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या यशाने हेच सिद्ध केले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्र येऊन अभियान यशस्वीपणे राबविले. विशेष म्हणजे चांदवड तालुक्याने अभियानाची उत्तमपणे अंमलबजावणी करून राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळविला आहे. शासनाने घेतलेल्या पुढाकाराला जनतेची साथ मिळत असल्याने या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीच्या दिशेने होत आहे.
लेखक -डॉ.किरण मोघे,
जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
माहिती : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020