शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. शक्यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.
शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरासाठी बेंटोनाईट, माती- सिमेंट मिश्रण, दगड, विटा, सिमेंट मिश्रण, चिकणमाती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी 300 ते 500 जी. एस. एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1-8 व जाडी पाच सें. मी. इतकी ठेवतात.
शेततळी ही काळ्या खोल जमिनीत बांधली गेली असतील तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहते; परंतु शेततळ्यात गाळ राहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते.
शेततळे घेण्यापूर्वी मृद् व जलसंधारणाचे उपाय करावेत. त्यामुळे पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर 2 × 2 × 1 मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्ड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पानांमुळे गाळणी होईल.
परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेततळ्याच्या आकारमानासंबंधी संशोधन करून पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार शेततळ्याचे आकारमान निश्चित केलेले आहे. तसेच साठलेल्या पाण्यातून संरक्षित सिंचनाच्या मात्रा निश्चित केल्या आहेत.
शेततळ्यातील साठलेल्या पाण्यातून सहा सें. मी. खोलीचे संरक्षित सिंचन दोन वेळा देता येईल. इनलेट व आऊटलेट (प्रवेशद्वार व निर्गमद्वार) प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मीटर अंतरावर 2 × 2 × 1 मीटर आकाराचा सिल्ट ट्रॅपचे (गाळ साठणारा पिंजरा) खोदकाम करावे. शेततळ्याच्या दोन्ही द्वारांजवळ दोन मीटर लांबीपर्यंत दगडाचे पिचिंग करावे. शेततळ्याला काटेरी तार किंवा लाकडाचे कुंपण करावे, जेणेकरून जनावरांचा त्रास होणार नाही.
संपर्क - 02452-223801, विस्तार क्र. 357
मृद् व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्व...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात य...
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खर...