অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुसऱ्या हरितक्रांतीचे पाऊल

दुसऱ्या हरितक्रांतीचे पाऊल

संकरित बियाण्याचा वापर पुन्हा करता येईल असे तंत्रज्ञान हैदराबाद येथील "सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मॉलिक्‍युलर बायोलॉजी' या संस्थेने नुकतेच विकसित करून बियाणे क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदानच ठरणार आहे. आज संकरित बियाण्याचा वापर शेतकऱ्यांसाठी अनिवार्य ठरला आहे. कारण ते वापरल्याशिवाय चांगल्या उत्पादनाची हमीच त्याला मिळत नाही. बाजारपेठेवरही संकरित बियाण्यांचे आणि त्याहीपेक्षा त्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. एकतर हे बियाणे महागडे असते आणि शेतकऱ्याला दरवर्षी ते विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या हवामान तर इतके बेभरवशाचे झाले आहे, की पेरलेले बियाणे उगवण्यासाठी हवामानाची योग्य साथ मिळेलच याची जराही हमी नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येते आणि बियाणे पुन्हा विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला पैशाने आधीच निम्मा झालेला खिसा पूर्ण रिकामा करावा लागतो.

ऍपोमिक्‍सिस तंत्रज्ञान वापरून तयार झालेले संकरित बियाणे पुढील वर्षीही आपला जोम कायम ठेवणार असल्याने शेतकऱ्यांना बियाण्यामध्ये स्वयंपूर्णता मिळवणे आता शक्‍य होणार आहे. शेतीतील उत्पादनखर्चात बियाण्यांवर तुलनेने अधिक खर्च होतो. तो करण्याशिवाय गत्यंतरच नसते. संकरित बीटी कॉटन तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर सुरवातीच्या काही वर्षांमध्ये त्याच्या किमती इतक्‍या चढ्या होत्या, की खासगी कंपन्यांनी त्यावर प्रचंड कमाई करून घेतली. उत्पादनखर्च कमी करा असे वारंवार सांगितले जाते. मात्र तो कमी करणारे तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले तरच खऱ्या अर्थाने ते यशस्वी होऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल यात शंका नाही. ऍपोमिक्‍सिस तंत्रज्ञान तर विकसित झाले. आता खरे आव्हान राहणार आहे ते शेतकऱ्यांना ज्या पिकांमध्ये त्याची सर्वाधिक गरज आहे त्यात संशोधन करण्याची. त्याचबरोबर त्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची. अन्यथा, एखादे चांगले तंत्रज्ञान शेतापर्यंत न पोचताच केवळ प्रयोगशाळेतच बंदिस्त होऊन राहील.

सध्या पुरेसे व दर्जेदार बियाणे उपलब्ध न होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. बियाणे मिळविण्यासाठी विक्री केंद्रांसमोर रांगा लावल्याची दृश्‍येही अनुभवण्यास आली आहेत. आल्यासारख्या पिकात आज केवळ बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. बियाणे पुरेसे व वेळेवर उपलब्ध झाले तर बाजारपेठेतील कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्याचे दरही शेतकऱ्यांच्या आवाक्‍यात राहणे शक्‍य होईल. तंत्रज्ञान चांगले असले तरी शेतापर्यंत ते पोचण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे अशा तंत्रज्ञानाबाबतचे प्रकल्प विविध राज्यांतील कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था यांच्या माध्यमातून संयुक्तपणे सुरू केले तर त्याला अधिक गती मिळेल. काही असो पण हे तंत्रज्ञान म्हणजे दुसऱ्या हरितक्रांतीसाठीचे आश्‍वासक पाऊल आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

 

स्त्रोत : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate