অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूमिका

भूमिका

खेड्यांचा शाश्वत विकास आणि पर्यावरणाचे संवर्धन हे ‘वनराई’चे मुख्य ध्येय असले, तरी शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठीही ‘वनराई’ने नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. विशेषतः पाणीटंचाई भासणार्‍या दुष्काळी भागात पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यावर आणि कार्यक्षम पाणीवापरावर ‘वनराई’चा भर राहिला आहे. तसेच शेतजमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करणे यासाठीही ‘वनराई’ने कायम पुढाकार घेतला आहे. याबरोबरच दर्जेदार बियाणे व इतर कृषी निविष्ठा (Inputs) पुरवून अल्पभूधारक व दारिद्य्ररेषेखालील शेतकर्‍यांना सक्षम बनवण्याचे कार्यसुद्धा वनराई अव्याहतपणे करत आहे.

पीकपद्धतीविषयी शेतकर्‍यांमध्ये जागरूकता घडवून आणण्यासाठी ‘वनराई’च्या माध्यमातून गावपातळीवर कृषी मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या कृषी मेळाव्यांमध्ये दरवर्षी सुमारे चार हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होत असतात. पेरणीपूर्व मशागतीपासून  पिकांच्या काढणीपश्चात हाताळणीपर्यंतच्या विविध शेतकामांबाबतचे मार्गदर्शन या मेळाव्यांतून केले जाते. याचबरोबर कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे व ‘इक्रिसॅट’सारखी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रे अशा ठिकाणी शेतकर्‍यांच्या अभ्याससहलींचे आयोजनही केले जाते. ठिकठिकाणचे प्रयोग पाहून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागतात. या सर्व उपक्रमांमुळे शेतीतील उत्पादनात भरघोस वाढ होतेच. शिवाय शेतमालाचे मूल्यवर्धन करून व त्यावर प्रक्रिया करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळवू लागतात. परिणामी, रोजगारासाठी शहराच्या दिशेने कराव्या लागणार्‍या स्थलांतराला आळा बसतो. इतकेच नाही, तर उदरनिर्वाहासाठी पूर्वी शहरात गेलेली कुटुंबे पुन्हा आपल्या गावी परततात आणि शेती व पूरक उद्योगधंदे करून चांगले आयुष्य जगू लागतात.

महाराष्ट्रामधल्या शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे होणार्‍या त्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण हा आज एक चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र शेतीच्या शाश्वततेचा मुद्दा दुर्दैवाने या चर्चांमध्ये कोठेही दिसत नाही. ‘वनराई’सारख्या स्वयंसेवी संस्थांनी, प्रगत शेतकर्‍यांनी आणि काही आदर्श गावांनी याला अनुसरून जे कार्य केले आहे; त्याचा वस्तुपाठ समोर ठेवून शासकीय स्तरावर या दिशेने आणखी व्यापक काम होण्याची गरज आहे. तरच शेतीचा वारसा आपण नेटाने पुढे नेऊ शकू!

लेखक: रवींद्र धारिया अध्यक्ष, वनराई

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate