অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोयाबीन उत्पादनावर परिणाम

महाराष्ट्रात मॉन्सून तब्बल तीन आठवडे ते एक महिना उशिरा व अतिशय अल्प प्रमाणात आला. ३ ऑगस्टपर्यंत भारतातील निम्म्यापेक्षा अधिक भूभागावर सरासरीहून अतिशय कमी, तर पाव भागात मुसळधार बरसला. भारतातील अन्य भागाप्रमाणेच महाराष्ट्रातही हीच स्थिती होती.

  • उशिरा आलेला मॉन्सून महाराष्ट्रामध्ये खरीप पेरणीला उपयुक्त ठरला नाही. खरीप हंगामाच्या सरासरी ३८ ते ४० टक्के एवढीच या वर्षी पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या फक्त ५० टक्क्यांपर्यंत पेरणी महाराष्ट्रात झाली आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये भारतात काही ठिकाणी चांगला पाऊस पडून परिस्थिती सुधारली. मात्र, पंजाब राज्य व महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात जून व जुलै महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा ४० टक्क्यांहून कमी पाऊस पडला.
  • भारतीय स्तरावर १६ राज्यांत ३ ऑगस्टपर्यंत खरीप हंगामाच्या सरासरीइतका, तर १८ राज्यांत २० ते ५९ टक्के इतका पाऊस पडला. दोन राज्यांत दुष्काळी स्थिती (म्हणजेच ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस) आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादन घेणारी राज्ये उदा. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये मध्यम ते भारी दुष्काळी परिस्थिती सध्या अनुभवास येत आहे.
  • मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, तर दुसऱ्या पंधरवड्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. त्यातही मराठवाड्याच्या सोयाबीन पट्ट्यामध्ये म्हणजेच हिंगोली (७५ टक्के कमी), नांदेड (७१ टक्के कमी), परभणी (६८ टक्के कमी), जालना (६० टक्के कमी) आणि औरंगाबाद (४३ टक्के कमी) पाऊस पडला आहे.
  • महाराष्ट्रामध्ये जून ते जुलै महिन्यामध्ये १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीइतका, तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २५ ते ५० टक्के कमी पाऊस झाला. म्हणजेच अर्धे राज्य दुष्काळी स्थितीत आहे.
  • अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जवळपास १४ लाख हेक्टर प्रक्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकाची शाश्वती किती, हा यक्षप्रश्न सर्वांपुढे आहे.

असा झाला प्रयोग -

२०१० ते २०१३ या वर्षांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषी हवामानशास्त्र विभागाने सोयाबीन पीक पेरणी चार विविध तारखांना केली होती.
  • पहिली पेरणी तारीख २ ते ८ जुलै (२७ वा कृषी हवामान आठवडा), दुसरी पेरणी ९ ते १५ जुलै (२८ वा कृषी हवामान आठवडा), तिसरी पेरणी १६ ते २२ जुलै (२९ वा कृषी हवामान आठवडा) आणि चौथी पेरणी २३ ते २९ जुलै (३० वा कृषी हवामान आठवडा) या कालावधीत करून त्याच्या विविध नोंदी घेण्यात आल्या.
  • चार वर्षांतील खरिपात पीकवाढ कालावधीत उपलब्ध पाऊस आणि पर्जन्यदिवस, आलेले उत्पादन याच्या नोंदी तक्ता १ मध्ये पाहा.
  • मागील चार वर्षांतील सोयाबीन पिकाच्या पेरणी आठवड्यानुसार असे ध्यानात येते, की
  • पहिल्या पेरणीत (२ ते ८ जुलै) सरासरी उत्पादन २३.४६ क्विंटल प्रति हेक्टरी होते, तर त्यानंतरच्या दोन पेरण्यांमध्ये (९ ते १५ जुलै) २०.९८ क्विंटल प्रति हेक्टरी, तर १६ ते २२ जुलैच्या पेरणीमध्ये २१.१६ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आढळते.
  • साधारणतः १० ते ११ टक्के घट सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या व तिसऱ्या पेरणीमध्ये दिसून आली.
  • त्यानंतर (२४ ते २९ जुलैपर्यंत) सोयाबीनची पेरणी केली असता उत्पादनात २५ टक्के घट दिसून आली.


तसेच, या विभागांतर्गत २०१३ मध्ये घेतलेल्या आणखी एका प्रयोगाचे निष्कर्ष तक्ता क्र. २ मध्ये दिले आहेत.

सोयाबीन पिकाचे हवामान आठवड्यानुसार पेरणीचे उत्पादन (क्विंटल/ हेक्टर) 
पेरणीचा आठवडा ---- उत्पादन ---- पर्जन्यमान (पर्जन्य दिन) ---- उत्पादनातील घटीची टक्केवारी 
२५ कृ.ह.आ. (१८ ते २४ जून) ---- १०.२९ ---- ९१८.८ (४५) ---- -- 
२६ कृ.ह.आ. (२५ जून ते ०१ जुलै) ---- ९.५६ ---- ९५४.८ (४८) ---- ७.१ 
२८ कृ.ह.आ. (०९ ते १५ जुलै) ---- ५.७५ ---- ८४९.४ (५०) ---- ४४.१३ 

मधील सोयाबीन पेरणीच्या प्रयोगाचा निष्कर्षही मागील चार वर्षांच्या प्रयोगाच्या निष्कर्षाशी मिळताजुळता आहे. यामध्येही २६ व्या आणि २८ व्या कृषी हवामान आठवड्यात पेरणी केलेल्या सोयाबीन उत्पादनात अनुक्रमे ७ टक्के आणि ४४ टक्के घट २५ व्या कृषी हवामान आठवड्याच्या तुलनेत आढळून आली.

या प्रयोगावरून काय शिकलो?

  • यावरून २ ते २२ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करण्यास हरकत नाही.
  • त्यानंतरच्या आठवड्यात पेरणी केली आणि उर्वरित काळात पाऊस चांगला पडल्यास पीक उत्पादन येते. मात्र, त्यात २५ ते ४५ टक्के घट येऊ शकते.
  • सोबतच्या तक्त्यावरून सोयाबीन पिकाच्या कालावधीमध्ये सोयाबीन उत्पादनासाठी ५५० ते ७०० मि.मी. पाऊस मध्यम ते भारी जमिनीसाठी आवश्यक आहे; तसेच ३२ ते ३९ पर्जन्यदिवस लागतात.
  • परंतु या वर्षीसारख्या परिस्थितीमध्ये ३५०.० मि.मी. ते ५५०.० मि.मी. इतका पाऊस आणि ३५ पर्जन्यदिवसांतही सोयाबीन पीक येते.
  • सोयाबीन पिकास पावसातील खंड आणि अति पाऊस या दोनही गोष्टी मारक ठरतात, हेच यावरून दिसते. तसेच, एकूण पावसापेक्षा ‘पर्जन्य दिन’ हा घटक उत्पादनावर अधिक परिणाम करतो, असेच या अभ्यासावरून दिसते.

संपर्क - प्रा. प्रल्हाद जायभाये, ७५८८०८२१०४ 
संपर्क वेळ - सायंकाळी ६ ते ८ वाजता 
(कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate