অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रवासात विजांपासून सुरक्षितता

 

प्रवास करीत असताना अनेकदा विजांची वादळे होतात. अशा वेळी तातडीने पक्क्या, बंदिस्त आणि कोरड्या इमारतीचा आसराच सुरक्षितता देतो. विजा पडणे थांबेपर्यंत घरात किंवा कार्यालयात थांबता येईल. दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी येणाऱ्या पावसात भिजण्याचा आणि मनसोक्त फिरण्याचा कितीही मोह होत असला तरी विजा चमकत असताना पावसात बाहेर पडण्याचा मोह टाळायला हवा. मॉन्सूनपूर्व काळात तसेच स्थानिक हवामानामुळे मॉन्सून सक्रिय नसताना पडणाऱ्या विजांमुळे अनेकदांना प्राण गमवावे लागतात. विजांची वादळे आपल्यापासून किती दूर आहेत, याचा अंदाज अगदी सहज घेता येतो. हा अंदाज घेऊन विजा आपल्यापर्यंत पोचण्याआधीच सुरक्षित जागी जाणे योग्य ठरते.

प्रकाश/ध्वनी अनुपात नियम

साधारणतः विजा या सहा ते सात किलोमीटर परिसरात पडतात. अनेकदा त्या १० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापून अगदी निरभ्र आकाशाच्या प्रदेशातही पडतात. विजांचे दिसणे आणि त्यांचा आवाज ऐकू येणे यातील वेळेतील तफावतीवरून विजा किती दूर आहेत, याचा ढोबळ अंदाज लावता येतो.
  • वीज चमकणे म्हणजे प्रकाश उत्पन्न होणे व ध्वनी उत्पन्न होणे या क्रिया एकाच वेळी घडतात. प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग वेगवेगळा आहे. ध्वनीचा हवेतला साधारणतः वेग हा ३०० मीटर प्रतिसेकंद इतका असतो. प्रकाश दिसल्यानंतर विजा कडाडण्याचा आवाज ऐकू येण्यास जितका जास्त वेळ लागतो तेवढ्या विजा जास्त दूर असतात.
  • वीज चमकणे व त्याचा गडगडाट ऐकू येणे यात ५ ते १० सेकंद अंतराचा कालावधी असणे म्हणजे विजांपासून आपण अनुक्रमे दीड ते साडेतीन किलोमीटर या अत्यंत धोकादायक क्षेत्रात असतो.
  • आवाज न करता पडणारी वीज पण शक्तिशाली आणि विध्वंसक ठरू शकते. आवाज निर्माण न करणाऱ्या उन्हाळी विजा यांना हा नियम लागू नाही, मात्र या विजाही जीवघेण्याच आहेत.

फॅरेडेचा पिंजरा आणि सुरक्षित प्रवास

फॅरेडेच्या पिंजऱ्याचा नियम म्हणजे प्रवासात जीवदान देणारी संजीवनीच होय. हवाबंद डब्यावर विद्युतभार दिला असता तो त्या डब्याच्या केवळ बाहेरच्या बाजूने आवरणावर पसरतो आणि आतमध्ये जाऊ शकत नाही, असे फॅरेडे यांनी शोधून काढले. हा हवाबंद डबा म्हणजेच फॅरेडेचा पिंजरा होय. ज्यात प्रत्येक गोष्ट विजेच्या धक्क्यापासून सुरक्षित राहते.
  • प्रवास करताना आपल्या वाहनाचा म्हणजे कार आदींच्या काचा हवाबंद करून घेता येतात. मग आपल्या वाहनावर प्रत्यक्ष विजेचे अनेक लोळ जरी पडले तरी आपण अगदी सहीसलामत बचावतो. मात्र आतील ऑक्सिजन संपेपर्यंत वेगाने प्रवास करीत सुरक्षित ठिकाणी पोचणे यासाठीच हा नियम उपयोगी ठरतो. अन्यथा गुदमरण्याचा धोका आहेच.
  • हवाबंद याचा अर्थ अगदीच हवाबंद. कारण हवा जाण्यास अगदी सुईएवढी जागा शिल्लक राहिल्यास विद्युतभार वाहनात शिरकाव करण्याचा धोका आहे. म्हणून आजकाल ‘एअर टाइट’ वाहनांची मागणी वाढत आहे.

३० मिनिटांचा सुरक्षा नियम

शेवटचा विजेचा आवाज किंवा विजेचे कडाडणे संपल्यानंतर अर्धा तासाने म्हणजे ३० मिनिटांनीच प्रवासाला बाहेर पडायला हवे. याला ३० मिनिटांचा सुरक्षा नियम म्हणतात. विजेचा कडकडाट चालू असताना प्रवासाला बाहेर निघताना ३० मिनिटांचा सुरक्षा नियम सर्वांनी पाळायला हवा. जो विजांपासून जास्त सुरक्षितता प्रदान करतो.
  • प्रवासाला निघताना शेवटची चमकणारी वीज २९ व्या मिनिटाला जरी दिसली किंवा विजेचा गडगडाट कानी पडला तरी पुन्हा पहिल्यापासून ३० मिनिटांच्या कालावधीची मोजणी सुरू करावी. विजा चमकत असताना ३० मिनिटांच्या नियमाची मोडतोड करू नये. चमकदार विजांच्या रेषा शक्तिशाली आहेतच. मात्र आपली जीवनरेखा अधिक भाग्यशाली बनविणे आपल्याच हातात आहे, हे विसरून चालणार नाही. सुरक्षिततेच्या घेतलेल्या काळजीने हे नक्कीच शक्य आहे.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate