जनावरांच्या शेण आणि अन्य खताचे शेतीमध्ये मोठे महत्त्व आहे. शेतीला सेंद्रिय पदार्थ यातूनच उपलब्ध होत असतात. उसासारख्या नगदी पिकाच्या बाबतीत ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे; मात्र शेण किंवा अन्य खते देण्यासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. "गरज शोधाची जननी असते' हेच खरे. तमिळनाडूतील ईरोडे जिल्ह्यातील "सेंद्रिय शेतकरी फेडरेशन'मधील एक शेतकरी सक्थीवल यांनी शेण उसाला देण्यासाठी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र शेणकाला आणि अन्य घटकांचे व्यवस्थित गाळणी करून पुढे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेताला पुरवले जाते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ उपलब्धी वाढल्याने ऊस उत्पादनात सक्थीवल यांना चांगली वाढ मिळाली आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये शेण आणि अन्य सेंद्रिय पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र शेण शेताला देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते ठिबक सिंचनामधून देता येत नाही. हे आता सक्थीवल यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे. याबाबत बोलताना सक्थीवल यांनी सांगितले, की शेतीमध्ये केवळ रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडावयास सुरवात झाली होती. त्याकरिता मी शेणखताचा, शेणकाल्याचा वापर सुरू केला. मात्र ते ठिबक सिंचनातून देता येत नसल्याने अडचण होत असे. मजुरांच्या साह्याने हे करावे लागत असे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च सुमारे 27 हजार रुपयांनी वाढत होता. हा कमी करण्यासाठी विचार करत असताना या गाळणी यंत्राचा विचार मनात आला. यावर काम करत गेलो. होणाऱ्या चुका सुधारत गेलो. त्यातूनच ही गाळणीची पद्धत विकसित झाली आहे.
सक्थीवल यांनी शेणकाल्यासाठी गाळणी यंत्र विकसित केले आहे. त्यात चार कप्पे केले आहेत. पहिल्या एका कप्प्यात जनावरांचे शेण आणि मूत्र गोळा केले जाते. त्यात पाणी मिसळले जाते. ते चांगल्या प्रकारे एकत्रित केले जाते. हे एकत्रित शेण मिश्रित पाणी गाळणीसाठी दुसऱ्या कप्प्यात जाते. त्यातील शेण आणि घट्ट पदार्थ हे बायोगॅस तयार करणाऱ्या यंत्रामध्ये वापरले जातात. त्यातील वरचे पाणी तिसऱ्या कप्प्यात जाते. तिथे त्यामध्ये गूळ मिसळला जातो. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. या कप्प्यातील कुजलेले द्रावण चांगल्या प्रकारे गाळून नंतर ते पाणी ठिबक सिंचन यंत्रणेद्वारे शेताला दिले जाते.
या गाळणी यंत्राच्या वापरामुळे ठिबक सिंचन यंत्रणेद्वारे शेणकाला आणि त्याचे द्रावण देता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरांवरील खर्च कमी होतो. तसेच त्यांच्याकडील शेण आणि टाकाऊ घटकांचा वापर लवकरात लवकर होत असल्याने परिसरातील शेणखताचे खड्डे कमी होऊन स्वच्छता वाढते. खतांवरील खर्चात कपात होते. तसेच सेंद्रिय पदार्थ अधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शेतात गांडुळांची संख्या वाढते. त्याचाही शेताला फायदा होतो.
ही गाळण यंत्रणा तयार करण्यासाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च झाले आहेत. ही यंत्रणा इतरही पिकासाठी वापरता येऊ शकते. या शेणखताच्या वापरामुळे सक्थीमल यांना पहिल्या वर्षी 60 टन एकरी ऊस उत्पादन मिळाले आणि दुसऱ्या वेळी 63 टन उत्पादन मिळाले आहे. या यंत्रणेचा वापर परिसरातील बन्नारीम्मन साखर कारखान्याने त्यांच्या ऊस पैदास संस्थेत करावयास सुरवात केली आहे. त्याचे फायदे लक्षात घेऊन या यंत्रणेचा वापर करण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.
सध्या आम्ही याचा वापर करावयास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. अनेक शेतकरी ही यंत्रणा वापरत आहेत. या यंत्रणेच्या वापरामध्ये अडचणी येत नसल्या तरी काही शेतकऱ्यांनी प्रक्रिया व्यवस्थित पार न पाडल्यामुळे ठिबक सिंचन यंत्रणा ब्लॉक झाल्याची तक्रार आली आहे. त्यावर तीन महिन्यांतून एकदा ई एम द्रावणांचा वापर करण्याची शिफारस केली जाते. उसालाही त्याचा फायदा होतो. ठिबक ब्लॉक होत नाहीत. हे संशोधन जबलपूर येथे नुकत्याच झालेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये सक्थीवल यांनी मांडले होते.
डॉ. के. अलगेसान, प्रकल्प समन्वयक, मायरादा कृषी विज्ञान केंद्र, ईरोडे
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/8/2023
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे ...
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व ...
वेगवेगळ्या राज्यातील अनेक मिठाया, उदा.- खवा जिलबी,...
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण...