बहुवार्षिक, भरपूर उत्पन्न देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते.
संकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. - 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे, मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे.
या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्यतो निचरा न होणारी, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे.
लागवडीपूर्वी उभ्या - आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. तीन महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. ठोंबे किंवा कांड्या 90 सें.मी. अंतरावरील सऱ्यांच्या बगलेत लावाव्यात. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 x 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.
लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी दर चार कापण्यांनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळी हंगामात (फेब्रुवारी ते मार्च) लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात (खरीप हंगामात) गरजेनुसार 12 दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात, तसेच थंडीच्या दिवसांत 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजेच सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्टरपासून मिळू शकतो.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...