पाटील यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली त्याची पार्श्वभूमी अशी.
एकदा वर्धा येथील सेवाग्राम संस्थेतर्फे त्यांना कमी खर्चिक सेंद्रिय शेतीविषयी व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. त्याचे महत्त्व पाटील यांना पटले. त्याप्रमाणे 1988 मध्ये त्यांनी पाच एकरांत सेंद्रिय पद्धतीने कापूस पीक घेतले. त्यातून रासायनिक पद्धतीने यायचे तेवढेच म्हणजे एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्यानंतर पाटील यांचा विश्वास बळावला. तेथून टप्प्याटप्प्याने त्यांनी सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र वाढवण्यास प्रारंभ केला. मनोहर परचुरे, सुभाष पाळेकर यांच्याकडून त्यांनी त्या विषयी अधिक माहिती घेतली. त्यासोबतच वर्धा येथील धारामित्र संस्थेत सेंद्रिय शेतीविषयक प्रशिक्षणही पूर्ण केले.
एकाच पिकामुळे होणारी संभावीत जोखीम कमी करण्यासाठी मिश्र पीक पद्धतीचा पॅटर्न पाटील यांनी अंगीकारला. सोयाबीन, तूर, उडीद, मूग अशी पिके त्यांनी निवडली. ती आजही कायम आहेत. सोयाबीनच्या पाच ओळी, त्यानंतर तूर अशी साधारण पीक पद्धती असते. त्यात ज्वारीही घेतली जाते. मात्र एकरातून दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळेल एवढेच त्याचे प्रमाण असते.
सामान्य ग्राहकांकडून सेंद्रिय शेतमालाला अपेक्षित दर मिळण्याची शक्यता नसल्याचे हेरत पाटील यानी उत्पादित सेंद्रिय शेतमाल डॉक्टर, वकील अशा व्यक्तींना विकण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता नांदूरा येथे बसने जाऊन अर्धा ते एक किलोच्या पॅकिंग मधील शेतमाल सुरवातीला नमुन्यादाखल विक्री करीत. बाजारात तूर डाळ 75 रुपये किलो असताना शंभर रुपये किलो दराने ते आपला माल विकत होते. ग्राहकांना सेंद्रिय घटक व त्यातील पोषक अन्नघटकांची माहिती ते पटवून देत, त्यामुळेच बाजारदरापेक्षा अधिक दर मिळविण्यात ते यशस्वी व्हायचे. सेंद्रिय डाळ विक्रीसाठी अर्धा व एक किलो पॅकिंगसाठी खास पिशव्या तयार केल्या आहेत. घरातील महिला सदस्यांद्वारा डाळीचे पॅकिंग होते.
मुंबई येथील एका अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी गावात सेंद्रिय शेतीविषयक जाणीव जागृतीसाठी काही वर्षांपूर्वी गावात आले होते. त्या वेळी शेतीला भेट दिल्यानंतर त्यांना पाटील यांची सेंद्रिय शेतीविषयक संकल्पना आवडली. त्यानंतर संस्थेने त्यांना दाल मिल यंत्र शंभर टक्के अनुदानावर पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाटील यांनी डाळी तयार करण्याचा उद्योग सुरू केला. एक क्विंटल तुरीवर प्रक्रिया केल्यास त्याद्वारा 75 किलो डाळीचे तर एक क्विंटल उडीद, मुगापासून 90 किलो डाळीचे उत्पादन होते.
पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत तालुक्यातील एरडी येथे बियाणे बॅंक तयार केली आहे. त्यात जुन्या, चवदार बियाण्यांचा संग्रह केला आहे. त्यातील बियाणे एकमेकांना मोफत दिले जाते. टोमॅटो, वांगे, अन्य भाजीपाला, तसेच कडधान्यांचे बियाणे येथे पाहण्यास मिळते. सोयाबीन बियाण्यांचा यंदा तुटवडा असल्याने पाटील यांनी राखून ठेवलेल्या सोयाबीनला 50 रुपये प्रति किलोप्रमाणे मागणी झाली आहे.
कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पंतप्रधान पॅकेजमधून पाटील यांनी गांडूळ शेडची उभारणी केली. वर्षाकाठी चार हजार बॅंग (प्रति बॅग 40 किलो) सेंद्रिय खताचे उत्पादन होते. मात्र या उत्पादित खताचा स्वतःच्या शेतीकामी त्यांना वापर करण्याची गरजच भासत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत असल्याने जमिनीचा पोत सुधारल्याचे पाटील म्हणतात. शेती व्यवस्थापनात त्यांना कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे
संपर्क - वसंत पाटील- ८२७५०२७६६९
लेखक : विनोद इंगोले
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...