टोमॅटो, कलिंगड, ढोबळी मिरचीसह हॉट पेपरचे (तिखट मिरची) बीजोत्पादन केले जाते. प्रति झाड सरासरी दीडशे ते सव्वा दोनशे फळे ठेवली जातात. फळे पूर्ण लाल झाल्यानंतर काढणी व यंत्राद्वारे बिया काढून योग्य प्रकारे वाळवल्या जातात. स्वच्छ व पॅक करून बियाणे पुढे पाठवले जाते. ही मिरची जाड व तिखट आहे. विविध देशांची मिरचीची डिमांड वेगवेगळी असते. आपल्या भागात खूप कमी मात्र इंडोनेशिया वा आफ्रिकेत ती चांगली चालते.
अजहर पठाण यांच्या फार्ममध्ये सुमारे दोनशे कर्मचारी तैनात आहेत. महिलांची संख्या त्यात कमी नाही. दोन महिलांकडे बीजोत्पादन पिकाच्या प्रत्येकी तीस ओळींची प्रमुख या नात्याने जबाबदारी असते. त्यांच्या हाताखालील प्रत्येक महिला तीन ओळी सांभाळतात. पॉलीनेशन, प्रुनिंग, स्टेकिंग, निर्जंतुकीकरण या सर्व गोष्टीत त्या कुशल आहेत. निवडक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे पठाण म्हणाले.
पर्यवेक्षकांत राज्यातील कृषी व अन्य विद्यापीठांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मजूर व्यवस्थापन, त्यांचे प्रशिक्षण, शेतीचा जमा-खर्च, तंत्रज्ञान वापर, किडी-रोगनियंत्रण आदी गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळतात. सामग्री पुरवठा, त्यासाठी व्यावसायिक संबंध जोपासणे, टीम वर्क यातील कौशल्य वाढीस लागते. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलेही येथे बीजोत्पादनात तरबेज झाले असून, मुक्त विद्यापीठात बीएस्सी ऍग्रीसाठी प्रवेश घेण्यापर्यंत उंची त्यांनी गाठली आहे. पठाण म्हणाले, की बियाणे क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीसोबत शेतकरी म्हणूनच मी करार केला आहे.
बियाण्यासाठी कंपनीचा दर हंगामाआधीच फिक्स होतो. त्यामुळे नफा संतुलित ठेवण्यासाठी खर्च कसा नियंत्रित करायचा त्याचे नियोजन करता येते. कोणता वाण लावला तर किती उत्पादन, खर्च व नफा मिळेल या गोष्टींचे गणित काढता येते. चाळीस एकर क्षेत्र टप्प्याटप्प्याने विकसित करताना गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडे नऊ नेटकेजेस होत्या. आता ही संख्या साठवर गेली आहे. पूर्वी पाच-सहा केजेस उभारणं अवघड वाटत होतं, आज 100, 150 केजेस उभारायला काहीच वाटत नाही असं पठाण म्हणतात. तांत्रिक ज्ञान अद्ययावत करणे, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण या गोष्टींवर त्यांची श्रद्धा आहे.
पठाण म्हणतात, की वीज, पैसा व पाणी या शेतकऱ्याच्या तीन मूलभूत गोष्टी आहेत. विजेच्या समस्येवर उत्तर शोधताना त्यांनी ट्रॅक्टर घेतला. त्यावर डायनोमा लावून पॉवर बॅकअप मिळाला. पाण्यासाठी एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले. पैशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय बॅंकेच्या कृषी व्यापारी शाखेकडून कर्ज काढले. शेती व्यावसायिक होऊ शकते हे बॅंकेला पटवून दिले. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भांडवल उभे केले, बॅंकेकडे गेले तर त्यांना कर्जाची चांगली रक्कम उभी करता येईल. बीजोत्पादनाचा लेखी कायदेशीर करार असतो. तो बॅंकेत चालतो.
ड्रीप, फर्टिगेशन, नेटकेजेस, स्ट्रक्चर उभारणे असा सुरवातीचा मूलभूत खर्च जास्त आहे. सुरवातीला गुंतवणूक खूप करावी लागली. प्रत्येक गोष्ट खरेदी करावी लागली. 10 गुंठ्यांच्या साध्या केजसाठी किमान 60 ते 65 हजार रुपये व अन्य खर्च पकडून पहिल्या वर्षी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एका नेटकेजमधून वर्षाला 70 ते 80 हजार रुपये व अधिक चांगल्या व्यवस्थापनाअंती उत्पन्न एक लाखांपर्यंतही जाते. तुम्ही किती पिके व कशी घेता, तसेच कोणत्या प्रकारचे नेटकेज व साहित्य वापरणार यावर खर्च अवलंबून असतो.
टोमॅटो- वाणानुसार- 10 ते 15 किलो
तिखट मिरची- 30 ते 40 किलो
काकडी- 30 ते 40 किलो
कॅप्सिकम- 10 ते 15 किलो
मागील वर्षी उपलब्ध : सर्व पिकांचे 20 ते 25 केजेसमध्ये बीजोत्पादन केले. या वेळी 60 ते 70 केजेसमध्ये उत्पादन होईल. बियाणे फेल होण्याचे प्रमाण नाही.
पठाण म्हणतात...
1) पावसाळ्यात रोग वाढतात. वेळेवर नियंत्रण करता यायला हवे. नेटमध्ये ते शक्य होऊ शकते.
2) कंपनीसोबत करार झाल्यानंतरच बीजोत्पादनाला सुरवात करावी. अभ्यास करीत थोड्या-थोड्या केजेस वाढवत जावे. प्रत्येक केजमध्ये किती झाडे, प्रत्येक झाडावर किती फळे, प्रत्येक फळात किती बी असायला हवी असे परिपूर्ण ज्ञान नसेल तोपर्यंत यशस्वी होता येणार नाही.
3) खर्च जास्त आहे. तो आधी करावा लागतो. पैसे नंतर मिळणार असतात.
4) मजूर उपलब्धता भरपूर पाहिजे. ते प्रशिक्षित असणे गरजेचे.
5) तांत्रिक ज्ञान खूप चांगले हवे. नियोजन व अंमलबजावणी तसेच निर्णय वेगाने घेण्याची तयारी हवी.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...