खते, पाणी आदींच्या अनियंत्रित वा बेसुमार वापराने जमिनी क्षारपड होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. पीक फेरपालट हा त्यावरील अत्यंत महत्त्वाचा उपाय असल्याचे मत पुणे येथील अभ्यासक दीपक कान्हेरे यांनी व्यक्त केले आहे.
दैनिक ऍग्रोवनच्या माध्यमातून शेतीविषयी माहिती देण्याचा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरू आहे. विविध पिके, त्यांची उपउत्पादने, विभागवार पिकांची निवड, त्यांच्या खतांच्या मात्रा, त्यावरील विविध किडी व त्यांचे व्यवस्थापन यावर अत्यंत उपयुक्त अशी माहिती "ऍग्रोवन' दररोज शेतकऱ्यांसाठी देत आहे. ६ डिसेंबर २०१०च्या "ऍग्रोवन'च्या अंकामध्ये शुगरबीट अर्थात शर्कराकंद या पिकासंबंधी माहिती वाचनात आली. या पिकाच्या लागवडीमुळे खारपड जमिनीची परिस्थिती सुधारते, असे समजले. याबद्दल एक जुनी गोष्ट आठवते. सुमारे १९७० ते १९७५ च्या दरम्यानच्या काळातील माणसे शेतीसंबंधी आपले मत व्यक्त करताना पुढील म्हणीचा दाखला देत.
"जो जमीन खाली-वर करी, माता प्रसन्न त्याच्यावरी'' याचाच अर्थ जमीन खाली-वर करणे म्हणजे एकदा जमिनीच्या वर येणारे पीक व एकदा जमिनीखाली येणारे पीक. उदा. : आधी मका व नंतर भुईमूग हीच लागवडीची पद्धत थोड्याफार फरकाने एकदल व द्विदल पिकांसाठी लागू पडते. आज महाराष्ट्रामध्ये अति उत्पादनाच्या हव्यासाने, तसेच निविष्ठांच्या अनियंत्रित किंवा बेसुमार वापराने शेकडो हेक्टर ऊस लागवडीखालील जमीन क्षारपड झालेली आपण पाहतो आणि संपूर्ण जमिनीवर पांढरा क्षार येऊन थांबलेला दिसतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकापाठोपाठ खोडवा न राखता शर्कराकंद पिकाचे उत्पादन घेतले तर पीक फेरपालटाचा उद्देश साध्य तर होईलच, शिवाय चोपण जमिनीतील क्षाराचा प्रश्न सहज मार्गी लागेल असा विश्वास वाटतो.
शेती जर शाश्वत व्हायची असेल आणि त्याच्या विकासाचा अपेक्षित दर गाठायचा असेल तर यापुढे एकाच पिकाचा आग्रह न धरता फेरपालटाचे पीक घेणे हा संयुक्तिक पर्याय ठरेल. "ऍग्रोवन'मधून अशी विविध फेरपालटाची पिके आणि आनुषंगिक बाबी याविषयी माहिती वेळोवेळी देण्यात आली आहेच, मात्र लेखमाला स्वरूपात किंवा लेखांच्या संख्येत वाढ करीत यासंबंधीची सखोल माहिती येत राहीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- दीपक कान्हेरे (लेखक जैवइंधन विषयातील तज्ज्ञ आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
२ जानेवारी २०११
अंतिम सुधारित : 10/7/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...