1) लसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू 7.5 ते आठ दरम्यान असणारी जमीन पिकास मानवते.
2) हे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. या पिकास भरपूर प्रमाणात भरखते व वरखते देणे गरजेचे आहे. मशागतीच्या वेळी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी 20 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 50 किलो पालाश या रासायनिक खतांची प्रति हेक्टरी आवश्यकता आहे. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यांनंतर हेक्टरी 50 किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.
3) जातिवंत व शुद्ध बियाणे लागवडीसाठी निवडावे. लागवडीसाठी आरएल-88, आनंद-2, आनंद-3, को-1 सुधारित जातींची निवड करावी. लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्टरी फक्त 25 किलो एवढेच बी पुरेसे होते.
4) ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हातकोळप्याने आंतरमशागत करता येते. ओळीत बियाणे पेरणी करण्याअगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावे, यासाठी जमिनीचा उतार बघून साधारणपणे तीन ते पाच मीटर रुंद व 10 मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर एक फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. यासाठी अत्यंत साधे व सोपे अवजार तयार करता येऊ शकते. तयार केलेल्या काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरावे. हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. पेरणीपूर्वी 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.
5) बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाने पाणी देणे फायद्याचे ठरते. यामध्ये रानबांधणीचा खर्चही बराच वाचतो.
6) लसूणघास हे बहुवर्षीय पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे. ओळीत बियाणे पेरले असल्यास हातकोळपणी यंत्राने कमी खर्चात तणनियंत्रण करता येते.
7) लसूणघासाची पहिली कापणी पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी करावी. पहिल्या कापणीनंतर दर 22 ते 25 दिवसांनी कापणी करावी. बहुवार्षिक लसूणघासापासून दर वर्षी 12 ते 15 कापण्या मिळतात.
8) लसूणघासाच्या वर्षभरातील 12 ते 15 कापण्यांपासून सरासरी 100 ते 125 टन हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
संपर्क ः 020- 26926248
बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन,
मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...