हैदराबाद : संकरित बियाणे दरवर्षी विकत न घेता पुढील हंगामातही त्याचा वापर शेतकऱ्यांना सक्षमपणे करता येईल असे तंत्रज्ञान हैदराबाद येथील "सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मॉलीक्युलर बायोलॉजी'(सीसीएमबी) या संस्थेने विकसित केले आहे.
'ऍपोमिक्सिस' असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. संकरित बियाणे वापरात स्वयंपूर्णता मिळवण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरणार आहे.
"सीसीएमबी'च्या डॉ. इम्रान सिद्दिकी यांनी फ्रान्स तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील (अमेरिका) शास्त्रज्ञांच्या साह्याने या विषयी संशोधन केले आहे.
डॉ. सिद्दिकी या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, की काही वनस्पतींमध्ये "ऍपोमिक्सिस'ची प्रक्रिया घडून येते. मात्र काही जागतिक संस्थांच्या साह्याने संशोधनाद्वारे अन्नपिकातही हा गुण आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ऍराबिडॉप्सिस थॅलियाना या मोहरीवर्गीय कुळातील वनस्पती आम्ही प्रयोगासाठी निवडली. कोणतीही संकरित जात ही दोन जातींच्या संकरीकरणातून विकसित होते.
मात्र एका हंगामासाठी त्याचा वापर केल्यानंतर त्यातील जोम कमी होत असल्याने त्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पुढील वर्षाकरिता त्याचे बियाणे लागवडीसाठी वापरले जात नाही. ऍपोमिक्सिस तंत्रज्ञान वापरल्यामुळे संकरित जातीचा जोम टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे एका हंगामातील लागवडीनंतर पुढील हंगामासाठीही त्या बियाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येतो.
या अभिनव तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हे बियाणे दरवर्षी विकत घेण्याची गरज भासणार नाही. साहजिकच बियाणेखर्चात बचत करणे त्यांना शक्य होणार आहे. सीसीएमबीचे संचालक डॉ.सीएच. मोहन राव म्हणाले, की ऍपोमिक्सिस हे अभिनव तंत्रज्ञान असून, त्याच्या वापरामुळे संकरित बियाणे उत्पादनाच्या खर्चात बचत करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी आपल्या शेतात हे सं करित बियाणे लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे दरवर्षी संकरित बियाणे बाहेरून खरेदी करण्यासाठी त्याला परावलंबी राहण्याची गरज भासणार नाही. संकरित वाण विकसित करण्याच्या पारंपरिक पद्धतीचा कार्यकाल नव्या तंत्रज्ञानामुळे कमी होण्यास मदत मिळणार आहे. भातासारख्या अन्नपिकातही याविषयी प्रयोग करण्यात येणार असल्याचे सीसीएमबी संस्थेतील शास्त्रज्ञांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती देताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व बियाणे पैदासकार शास्त्रज्ञ डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, की ऍपोमिक्सिस पद्धतीत नर वाणाची मदत न घेता केवळ मादी वाणाद्वारे संकरित वाणाची निर्मिती केली जाते. गवतवर्गीय किंवा अरुंद पाने असलेल्या वनस्पतीत ऍपोमिक्सिस ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या नेहमीच घडून येते. संकरित वाणामध्ये मात्र हा गुणधर्म आणण्यात सीसीएमबी संस्थेने यश मिळवले आहे.
हे संशोधन अ तिशय चांगले व उपयुक्त ठरणारे आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठीही सं करित बियाण्याचा वापर करता येईल. त्यामुळे बियाणे स्वस्त होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर संकरित बियाणे तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीचा वेळ कमी होण्यास मदत मिळेल. ज्वारी, बाजरी, ऊस आदी पिकांमध्ये त्याचा वापर उपयुक्त ठरणार आहे.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाने आणखी एक पाऊल पुढ...
जगातील इतर देशांनी जीएम तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिक...
कुठलीही व्यक्ती असो, ती व्यक्ती वस्तूंची मागणी करत...
जैवतंत्रज्ञान नियंत्रण कायदा अर्थात ‘बायोटेक्नॉलॉज...