অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंबा फळे कशी पिकवावीत...

आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो. 
आंबा पिकवणे हे वेगळे शास्त्र आहे. विषुववृत्तीय प्रदेशात आंब्याचे फळ पिकण्यास सर्वसाधारणपणे 7 ते 8 दिवस लागतात. दूरच्या बाजारपेठेत विकली जाणारी फळे काही अंशी प्रवासातच पिकतात. फळाची प्रत ही प्रामुख्याने काढणी कुठल्या अवस्थेत केली आहे, त्यावर अवलंबून असते. मागील लेखात आपणास हापूस आंब्याची काढणी व पक्वतेबाबतच्या अवस्थेबाबत पाहिले आहेच. लवकर काढलेली फळे (10 आणि 12) ही पिकल्यानंतर सुरकुतलेली असतात किंवा त्यांचा बाह्यरंग हा पिवळा धम्मक नसतो. याउलट योग्य अवस्थेत काढलेल्या फळांचा रंग आणि गंध हा उत्तम प्रतीचा असतो.
नैसर्गिकरीत्या फळे पिकताना त्यामध्ये इथिलिन वायू तयार होतो व फळे पिकण्याची क्रिया सुरू होते. प्रत्येक फळानुसार ही नैसर्गिक प्रक्रिया फळे काढल्यानंतर 2 ते 5 दिवसांनी सुरू होते. तसेच इथिलिन वायू नैसर्गिक वनस्पती संजीवक म्हणून गणला गेला आहे. त्यामुळे इथिलिन वायू उत्पन्न करणाऱ्या रासायनिक फळांचा वापर फळे पिकवण्यासाठी ग्राह्य धरला जातो. फळे पिकताना त्यामध्ये रंग, प्रत, सुगंध यांमध्ये बदल होऊन फळ खाण्यायोग्य होते. या प्रक्रियेमध्ये पिठूळ पदार्थांचे रूपांतर साखरेमध्ये होत जाते. फळांची आम्लता कमी होते. फळांचा घट्टपणा जाऊन फळे मऊ पडतात आणि याचबरोबर फळांचा विशिष्ट सुगंध व चव यांची निर्मिती होऊन फळ खाण्यायोग्य बनते. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी फळे पिकविताना इथिलिन जनरेटरद्वारा इथिलिन गॅस, इथेफॉन अशा रसायनांचा वापर करून फळे पिकविली जातात. व्यावसायिकरीत्या आंबे पिकविण्यासाठी 100 पी.पी.एम. इथिलिन गॅसची मात्रा वापरली जाते.
  • सर्वसाधारणपणे आंब्याची फळे 7.30 सें.मी. ते 10 सें.मी. जाडीचा भातपेंढा किंवा गवती पेंढ्याच्या थरावर फळांचा एक थर देऊन पिकवतात. अशा पद्धतीने ठेवलेली फळे 8 ते 10 दिवसांत उत्तमप्रकारे पिकतात.
  • सर्वसाधारणपणे फळे देठाकडून कोयीकडे, तर कोयीकडून सालीकडे अशा पद्धतीने आंबा पिकतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यामध्ये काही ठिकाणी देठाच्या विरुद्ध भागास (चोचीकडे) आंबा थोडासा आंबट असतो. आंब्याच्या न पिकलेल्या फळांच्या अढीत काही पक्व फळे ठेवल्यास पिकण्याची क्रिया लवकर सुरू होते.

फळ पिकण्याची प्रक्रिया लांबविण्यासाठी...

फळांची पिकविण्याची क्रिया लांबविण्यासाठी मेणाचा थर (व्हॅक्‍स कोटिंग) दिल्यास पिकविण्याची क्रिया दोन दिवस लांबवता येते. 
1) सोडियम आर्थोफिनाईल फिनेट किंवा 2, 4, डी किंवा 1-एमसीपीए या रसायनांचा वापर केला असता, फळांची पिकविण्याची क्रिया लांबविली जाते. 
2) फळे काढल्यानंतर ती गरम पाण्यात 52 अंश डिग्री सेंटिग्रेडला 5 मिनिटे बुडवून ठेवल्यास फळांची रोगजंतूंमुळे होणारी कुजण्याची क्रियासुद्धा लांबते व फळांची प्रत सुधारते, असे प्रयोगाअंती आढळून आले आहे.

कॅल्शियम कार्बाईडवर बंदी

फळे लवकर पिकविण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

ओळखा कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे

कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे ही घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळामध्ये योग्य ती पिकवण प्रक्रिया न झाल्यामुळे फळे चवीस आंबट किंवा चवहीन असतात. तसेच आतून काळसर रंग आणि विचित्र स्वाद असलेली असतात. याउलट इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनामुळे फिकणारी फळे ही पिकल्यानंतर थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.

डॉ. के. एच. पुजारी
काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, डॉ. बा.सा.को.कृ.वि., दापोली

स्त्रोत: अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate