অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्षामध्ये आणा एकसारखा रंग आणि साखरेचे योग्य प्रमाण

द्राक्षामध्ये आणा एकसारखा रंग आणि साखरेचे योग्य प्रमाण

द्राक्ष मण्यांच्या रंगाचा सारखेपणा हा द्राक्ष उत्पादन किती टन घ्यायचे यावर अवलंबून असतो. प्रमाणापेक्षा जास्त लोड असल्याससुद्धा रंग येण्यास विलंब लागतो. एकाच घडात मणी सारख्या रंगाचे नसतात. पाने व फळांचे गुणोत्तराप्रमाणे घडांची संख्या ठेवावी. द्राक्षाची चव रुचकर आहे किंवा नाही हे मण्यातील साखरेवर ठरत असते. जरी मण्यात ऍसिड जास्त प्रमाणात असेल आणि साखरेचे प्रमाणसुद्धा जास्त असेल तर चवीत किंवा दर्जामध्ये जास्त फरक पडत नाही. उलट द्राक्ष चवदार लागतात.

रंगीत द्राक्षाखालील क्षेत्र नगण्य असले तरी खाण्याच्या द्राक्षासाठीचा रंग हा एक आवश्‍यक गुणधर्म आहे, ज्यावर ग्राहकांची पसंती अवलंबून असते. खरे तर द्राक्षाचे रंग या विषयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही; परंतु रंगीत जातीचा विचार करता रंगांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. द्राक्षामध्ये पक्वतेत आढळणारा रंग हा मुख्यतः ऍन्थोसायनीन या घटकामुळे असतो.

सद्यःस्थितीत बहुतेक बागा या मण्यामधील पाणी उतरणे किंवा द्राक्ष काढणीच्या स्थितीत आहेत; परंतु काढलेली द्राक्षे बाजारात ग्राहकाच्या कमी पसंतीस येत आहेत. मण्यातील रंग, त्यातील साखरेच्या प्रमाणामुळे मिळणारी गोडी ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारी असली पाहिजे.

मण्यातील एकसारखा रंग


घडातील मण्याच्या आकारातील एकसारखेपणासोबतच घडातील सर्व मण्यांतील रंगातील एकसारखेपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगीत द्राक्षामध्ये रंगातील एकसारखेपणाचा प्रश्‍न आजकाल उद्‌भवतो आहे. एकाच घडातील सर्व मणी एकाच रंगाचे आढळून येत नाहीत. रंगीत जातींमध्ये रंगातील एकसारखेपणा द्राक्षाच्या जातीवरही अवलंबून असतो. दिवस- रात्रीच्या तापमानातील फरक, दैनंदिन तापमानातील बदल आणि मणी परिपक्वतेचा कालावधीत असलेले जास्त तापमान यावर रंग भरण्याची क्रिया अवलंबून असते.

सद्यःस्थितीत तापमान (मुख्यतः रात्रीचे) दहा अंश से.पेक्षा जास्त नाही. तापमान जर दहा अंश से.पेक्षा कमी असले, तर निसर्गतः द्राक्षात ऍन्थोसायनीन या घटकाचे प्रमाण मण्यात वाढते. त्यामुळे द्राक्षांना रंग प्राप्त होतो. या वर्षी हे तापमान दहा अंश से.पेक्षा जास्त असल्यामुळे मण्यांना रंग येण्यास अडचण निर्माण झालेली होती; परंतु उत्तर भारतामध्ये सध्या हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे कदाचित रात्रीचे तापमान राज्यात दहा अंश से.पेक्षा कमी होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे द्राक्षांना रंग येण्यास विशेष अडचण निर्माण होणार नाही असे वाटते. काढणीची अवस्थासुद्धा या बाबतीत महत्त्वाची असते. जर काढणी लवकर केली तर योग्य रंग येणे कठीण होते.

उपाययोजना

  1. क्रॉप लोड - रंगाचा सारखेपणा हा द्राक्ष उत्पादन किती टन घ्यायचे यावरसुद्धा अवलंबून असतो. प्रमाणापेक्षा जास्त लोड असल्याससुद्धा रंग येण्यास विलंब लागतो. एकाच घडात मणी सारख्या रंगाचे नसतात. पाने व फळांच्या गुणोत्तराप्रमाणे घडांची संख्या ठेवावी. वेलीवर घड जास्त झाल्यास त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. परिणामतः मण्यात असलेल्या ऍसिडचे रूपांतर साखरेत योग्य प्रमाणात होत नाही; तसेच ऍन्थोसायनीनच्या प्रमाणातसुद्धा बाधा पोचते. घडातील सर्वच मण्यांना सारखा रंग प्राप्त होत नाही. हे टाळण्यासाठी वेलीवरील पानांची संख्या किंवा वेलविस्तार यांचा विचार करून घडांची व त्यातील मण्यांची संख्या ठरवावी. त्यामुळे रंगीत द्राक्ष जातीत (शरद सीडलेस, फ्लेम सीडलेस, जम्बो, नाना पर्पल इ.) एकसारखा रंग येईल. त्यामुळे द्राक्षांची उत्कृष्ट प्रत तयार होऊ शकेल.
  2. सीपीपीयूचा वापर - सीपीपीयूसारख्या संजीवकांच्या वापरामुळे द्राक्ष मण्यांना रंग येण्याचेच नाही तर द्राक्ष काढणीचासुद्धा कालावधी लांबतो याचे कारण म्हणजे हे संजीवक द्राक्ष मण्यातील हरितद्रव्य जास्त दिवस टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ऍन्थोसायनीनचे प्रमाण मण्यात येण्यास जास्त दिवस लागतात. त्यामुळे मण्यांना रंग येण्यास विलंब होतो. त्यामुळे सीपीपीयूचा शिफारशीत प्रमाणातच वापर करावा, अतिवापर टाळावा.
  3. पाणी व अन्नद्रव्ये व्यवस्थापन - मण्यांमध्ये पाणी उतरणे ते द्राक्ष काढणीपर्यंत पाण्याचे नियोजन करावे. बाजारपेठांचा विचार करून द्राक्ष लवकर तोडावयाची असल्यास पाण्याचे खूप मोठे ताण दिले जातात. पूर्ण साखर उतरल्यानंतर दिलेल्या ताणांमुळे मण्याचे आकारमान घटते, लवकर काढणी केल्यामुळे एकसारखा रंग मिळत नाही. घडाच्या पुढे अवश्‍य पाने राखावीत, त्यामुळे उन्हापासून घडाचे रक्षण होईल, ऊन जळीच्या खुणा टाळता येतील.
  4. रंगीत जातीमध्ये इथेफॉनचा वापर योग्य ठरणार नाही. कारण या संजीवकाला "सीआयबी'कडून लेबल क्‍लेम मिळालेला नाही.
  5. योग्य वेळी द्राक्षाची पक्वता ओळखून काढावी करावी. द्राक्ष मण्यांच्या रंगात होणाऱ्या बदलावरून द्राक्षाची पक्वता ओळखता येते. पक्व झालेले मणी पारदर्शक दिसताच व जातीपरत्वे त्यांच्या रंगात बदल होतो. काळ्या किंवा लाल रंगाच्या द्राक्षाचा रंग काढणीच्या वेळी जास्त गर्द होतो व जास्त चमकदार दिसतो.
  6. शेडनेटचा वापर किंवा पेपरने घड झाकल्यामुळे थंडी किंवा उष्णता यांचा अनिष्ट परिणाम टाळण्यासोबतच एकसारखा रंग मिळण्यास फायदा होऊ शकतो.

मण्यातील साखरेचे प्रमाण

मण्यातील साखर म्हणजेच एकूण विद्राव्य घनपदार्थ (TSS) होय. द्राक्षे खाण्यावरून त्यांचा दर्जा ठरविता येतो. द्राक्षाची चव रुचकर आहे किंवा नाही हे मण्यातील साखरेवर ठरत असते. जरी मण्यात ऍसिड जास्त प्रमाणात असेल आणि साखरेचे प्रमाणसुद्धा जास्त असेल तर चवीत किंवा दर्जामध्ये जास्त फरक पडत नाही. उलट द्राक्ष चवदार लागतात. याचाच अर्थ द्राक्षाची चवही त्यात असणाऱ्या साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असते.

साधारणतः असे दिसून येते, की जेव्हा मणी मऊ पडतात किंवा मण्यांचा रंग बदलण्यास सुरवात होते तेव्हा साखरेचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते, आम्लता कमी होते. मण्यातील साखरेचे/ आम्लाचे प्रमाण वाढण्याचे/ कमी होण्याची क्रिया मुख्यतः त्या वेळच्या तापमानावर अवलंबून असते.

मण्यातील साखरेचे प्रमाण हे जातीपरत्वे जरी बदलत असले तरी ते 18 ब्रीक्‍सच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. हे उत्पादन किती घेतो म्हणजेच क्रॉप लोड, मण्यांच्या संख्येच्या तुलनेत पानांची संख्या, पोटॅशचे संतुलन, कार्बोहायड्रेटची उपलब्धता, पानांची प्रकाशसंश्‍लेषण करण्याची क्षमता, कॅनॉपीचा विस्तार इ. सर्व बाबींवरसुद्धा अवलंबून असतो.

उपाययोजना

  1. मणी मऊ पडतानाचे वेळी (वरायझन स्टेच) मध्ये शाकीय होत असेल तर मण्यात साखर उतरण्यावर परिणाम होतो. त्यामुळे शाकीय वाढ करणारी खते किंवा जास्त पाणी अशा वेळी देऊ नये.
  2. साखरेचे प्रमाण जास्त लवकर वाढण्यासाठी मण्यांची विरळणी, घडांचा शेंडा खुडणे तसेच गर्डलिंग करणे अगत्याचे ठरते.
  3. साखरेचे प्रमाण वाढविण्यासाठी काढणी शक्‍यतोवर उशिरा करावी.
  4. वेलीच्या क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन घेण्याचे टाळावे. वेलीवर द्राक्षाच्या घडाची संख्या जास्त असेल तर फुटींची वाढ कमी होते व विस्तार मर्यादित राहतो. त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्यावर मर्यादा येतात.
  5. द्राक्षवेलीच्या विस्तारामध्ये बहुतांशी पाने जर उन्हात असतील तर द्राक्षाची पक्वता वेगाने होते. पाने सावलीत राहून घडही सावलीत राहतात, तर सावलीतील घडांची पक्वता उशिरा येते. परिणामतः साखर भरण्याच्या क्रियेत अडथळे येतात.
  6. तोडणीच्या वेळी घडामध्ये असणाऱ्या एकूण साखरेपैकी 40 टक्के शर्करा वेलीचे साठवणीचे कर्बोदकांमधून आलेली असते. त्यामुळे खरड छाटणीनंतर शेवटच्या टप्प्यांमध्ये वेलीमध्ये भरपूर अन्नसाठा होणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने खरड छाटणीपासूनचे व्यवस्थापन उपयोगी ठरते.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate