द्राक्ष मण्यांच्या रंगाचा सारखेपणा हा द्राक्ष उत्पादन किती टन घ्यायचे यावर अवलंबून असतो. प्रमाणापेक्षा जास्त लोड असल्याससुद्धा रंग येण्यास विलंब लागतो. एकाच घडात मणी सारख्या रंगाचे नसतात. पाने व फळांचे गुणोत्तराप्रमाणे घडांची संख्या ठेवावी. द्राक्षाची चव रुचकर आहे किंवा नाही हे मण्यातील साखरेवर ठरत असते. जरी मण्यात ऍसिड जास्त प्रमाणात असेल आणि साखरेचे प्रमाणसुद्धा जास्त असेल तर चवीत किंवा दर्जामध्ये जास्त फरक पडत नाही. उलट द्राक्ष चवदार लागतात.
रंगीत द्राक्षाखालील क्षेत्र नगण्य असले तरी खाण्याच्या द्राक्षासाठीचा रंग हा एक आवश्यक गुणधर्म आहे, ज्यावर ग्राहकांची पसंती अवलंबून असते. खरे तर द्राक्षाचे रंग या विषयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही; परंतु रंगीत जातीचा विचार करता रंगांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. द्राक्षामध्ये पक्वतेत आढळणारा रंग हा मुख्यतः ऍन्थोसायनीन या घटकामुळे असतो.
सद्यःस्थितीत बहुतेक बागा या मण्यामधील पाणी उतरणे किंवा द्राक्ष काढणीच्या स्थितीत आहेत; परंतु काढलेली द्राक्षे बाजारात ग्राहकाच्या कमी पसंतीस येत आहेत. मण्यातील रंग, त्यातील साखरेच्या प्रमाणामुळे मिळणारी गोडी ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारी असली पाहिजे.
घडातील मण्याच्या आकारातील एकसारखेपणासोबतच घडातील सर्व मण्यांतील रंगातील एकसारखेपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगीत द्राक्षामध्ये रंगातील एकसारखेपणाचा प्रश्न आजकाल उद्भवतो आहे. एकाच घडातील सर्व मणी एकाच रंगाचे आढळून येत नाहीत. रंगीत जातींमध्ये रंगातील एकसारखेपणा द्राक्षाच्या जातीवरही अवलंबून असतो. दिवस- रात्रीच्या तापमानातील फरक, दैनंदिन तापमानातील बदल आणि मणी परिपक्वतेचा कालावधीत असलेले जास्त तापमान यावर रंग भरण्याची क्रिया अवलंबून असते.
सद्यःस्थितीत तापमान (मुख्यतः रात्रीचे) दहा अंश से.पेक्षा जास्त नाही. तापमान जर दहा अंश से.पेक्षा कमी असले, तर निसर्गतः द्राक्षात ऍन्थोसायनीन या घटकाचे प्रमाण मण्यात वाढते. त्यामुळे द्राक्षांना रंग प्राप्त होतो. या वर्षी हे तापमान दहा अंश से.पेक्षा जास्त असल्यामुळे मण्यांना रंग येण्यास अडचण निर्माण झालेली होती; परंतु उत्तर भारतामध्ये सध्या हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे कदाचित रात्रीचे तापमान राज्यात दहा अंश से.पेक्षा कमी होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे द्राक्षांना रंग येण्यास विशेष अडचण निर्माण होणार नाही असे वाटते. काढणीची अवस्थासुद्धा या बाबतीत महत्त्वाची असते. जर काढणी लवकर केली तर योग्य रंग येणे कठीण होते.
मण्यातील साखर म्हणजेच एकूण विद्राव्य घनपदार्थ (TSS) होय. द्राक्षे खाण्यावरून त्यांचा दर्जा ठरविता येतो. द्राक्षाची चव रुचकर आहे किंवा नाही हे मण्यातील साखरेवर ठरत असते. जरी मण्यात ऍसिड जास्त प्रमाणात असेल आणि साखरेचे प्रमाणसुद्धा जास्त असेल तर चवीत किंवा दर्जामध्ये जास्त फरक पडत नाही. उलट द्राक्ष चवदार लागतात. याचाच अर्थ द्राक्षाची चवही त्यात असणाऱ्या साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असते.
साधारणतः असे दिसून येते, की जेव्हा मणी मऊ पडतात किंवा मण्यांचा रंग बदलण्यास सुरवात होते तेव्हा साखरेचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते, आम्लता कमी होते. मण्यातील साखरेचे/ आम्लाचे प्रमाण वाढण्याचे/ कमी होण्याची क्रिया मुख्यतः त्या वेळच्या तापमानावर अवलंबून असते.
मण्यातील साखरेचे प्रमाण हे जातीपरत्वे जरी बदलत असले तरी ते 18 ब्रीक्सच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. हे उत्पादन किती घेतो म्हणजेच क्रॉप लोड, मण्यांच्या संख्येच्या तुलनेत पानांची संख्या, पोटॅशचे संतुलन, कार्बोहायड्रेटची उपलब्धता, पानांची प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमता, कॅनॉपीचा विस्तार इ. सर्व बाबींवरसुद्धा अवलंबून असतो.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/7/2023
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...
कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावा...
उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिरा...