অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्षामध्ये गर्डलिंग करताना घ्यावयाची काळजी

द्राक्षामध्ये गर्डलिंग करताना घ्यावयाची काळजी

सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त बागांत मणी सेटिंग ते आठ- दहा मि.मी. आकाराचे मणी अशा प्रकारची अवस्था दिसून येते. वातावरणाचा विचार करता सध्या द्राक्ष बागेत घडांच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण आढळून येते. विविध अवस्थांतील द्राक्ष बागेत घडांचा विकास हेच एक आपले ध्येय असते. अशा वेळी आपण बागेत प्रत्येक गोष्टीचा अवलंब करतो; परंतु अशाच सर्व उपाय योजना एकाच वेळी केल्यास कोणत्याही गोष्टीचा फारसा उपयोग होत नाही. या लेखामध्ये गर्डलिंग करताना पाहावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी माहिती पाहू.

गर्डलिंग करणे

मण्याच्या विकासामध्ये गर्डलिंगचे फार महत्त्व आहे. गर्डलिंग करणे म्हणजे खोडावर जवळपास दोन मि.मी. जाडीची म्हणजेच बांगडीच्या आकाराची पूर्णपणे साल काढणे. खोडावरील ही साल काढल्यास जमिनीतून वर, तसेच वेलीवरून खाली जाणारा प्रवाह खंडित होतो. वरून खाली येणारा प्रवाह खंडित झाल्यास साहजिकच वेलीच्या वरच्या भागामध्ये दाब निर्माण होईल, त्याचाच परिणाम मण्यांच्या फुगवणीमध्ये होतो. कारण मणी सेटिंग झाल्यानंतर फुटींची वाढ होणे थांबते, शेंडावाढ थांबून पानेसुद्धा जवळपास जुनी झालेली असतात. अशा परिस्थितीमध्ये जुन्या झालेल्या पानांद्वारे कर्बोदके गोळा केली जाऊन हीच कर्बोदके मण्यांचा विकास होण्यास मदत करतात. परंतु, सर्वच परिस्थितीमध्ये बागेत गर्डलिंग करणे शक्‍य होत नाही. 
गर्डलिंग करण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे, त्या गोष्टी खालीलप्रमाणे -

  1. नवीन बागेत गर्डलिंग करू नये  - द्राक्ष लागवडीच्या पहिल्या दोन वर्षी गर्डलिंग करू नये. यावेळी खोड चपटे असते, म्हणजेच या खोडामध्ये आवश्‍यक तो अन्नद्रव्यांचा साठा नसतो. यालाच आपण खोडामध्ये स्टोअरेज कमी आहे असे म्हणतो. खोडावर आवश्‍यक अशी सालसुद्धा दिसत नाही.
  2. घडांची संख्या जास्त असल्यास गर्डलिंग करू नये  - वेलीवर जर घडांची संख्या जास्त असेल, तर पाहिजे तसे चांगले परिणाम मिळत नाहीत. जास्त घडांमुळे आधीच वेलीवर ताण असतो, त्यात पुन्हा गर्डलिंग केल्यामुळे मण्यांच्या जाडीवर फारसा परिणाम होत नाही. वेलीवर घडांची संख्या मर्यादित असतानाच गर्डलिंग करावे.
  3. वेलीवर पानांची संख्या आवश्‍यक  - द्राक्ष बागेत मण्यांचा विकास होण्याकरिता त्या वेलीमध्ये पुरेसे स्टोअरेज असणे आवश्‍यक असते. हे स्टोअरेज मागील हंगामात आपण कशाप्रकारे व्यवस्थापन केले, यावर जास्त अवलंबून असते. याचप्रमाणे या हंगामात त्या वेलीवर घडाच्या पुढे किंवा त्या काडीवर किती पाने आहेत, यावरसुद्धा तेवढेच अवलंबून असते. कारण यावेळी असलेली पाने ही मण्यांच्या विकासाकरिता आवश्‍यक असलेले स्टोअरेज कर्बोदकाच्या माध्यमातून पुरवठा करते. म्हणजेच घडाचा विकास होण्याकरिता वेलीवर पुरेशा पानांची आवश्‍यकता असते. जर पानांची संख्या अपुरी असेल, तर वेलीमध्ये पुरेसे स्टोअरेज तयार होईल याची शाश्‍वती नसते; तसेच गर्डलिंग केल्यामुळे वेल आधीच ताणामध्ये (शॉकमध्ये) असते. पानांची संख्या अपुरी असल्यास पुढील समस्या टाळण्याकरिता गर्डलिंग करायचे टाळावे.
  4. बागेत पुरेसे पाणी आवश्‍यक  -  द्राक्ष बागेत घडांचा विकास होण्याच्या दृष्टीने पाण्याची उपलब्धता वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असावी. बागेत पाणी कमी असल्यास गर्डलिंग करायचे टाळावे.
  5. पानांची परिस्थिती -  द्राक्ष बागेत घडांचा विकास होण्याच्या दृष्टीने काडीवर घडाच्या पुढे 10 ते 12 पाने आवश्‍यक असतात. प्रत्येक पानाचे क्षेत्रफळ साधारणतः 150 ते 160 वर्ग सें.मी. असते. प्रत्येक काडीवर 16 ते 17 पाने असल्यास त्या त्या काडीवर असलेल्या घडाचा आकार वाढून जवळपास 500 ग्रॅम वजन मिळण्यास मदत होते. काडीवर असलेली ही पाने प्रकाशसंश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्य तयार करून घडाच्या विकासाला मदत करतानाच त्या घडाला उन्हापासून संरक्षणसुद्धा देतात. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता वातावरण चांगले आहे. भरपूर असा सूर्यप्रकाश असल्याने प्रकाशसंश्‍लेषण चांगले होईल; परंतु याकरिता पानांची गर्दी नको आहे. प्रत्येक पान सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात राहण्यासाठी आपण उपाय योजना कराव्यात, म्हणजेच परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेता येईल. जर पानांची गर्दी जास्त असेल, तर पाने एकमेकांवर पडून सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा वाढेल. पाने अन्नद्रव्य गोळा करण्यास समर्थ राहणार नाहीत. उलट ही पाने पिवळी पडून गळून पडतील. तेव्हा, आपल्या बागेत जास्त असलेल्या फुटी यावेळीसुद्धा कमी करायला हरकत नाही, त्यामुळे सोर्स ः सिंक संबंध अधिक मजबूत होऊन त्याचा घडांच्या विकासात फायदा होईल.
  6. मुळी कार्यक्षम असणे  - बागेत वेलीची मुळी कार्यक्षम असल्यास पुरवठा केलेल्या संपूर्ण अन्नद्रव्य व पाण्याची उपलब्धता आवश्‍यकतेप्रमाणे होईल, याकरिता मुळी चांगली असावी. बोद थोड्याफार प्रमाणात मोकळे करून त्यावर माती किंवा काडीकचरा टाकल्यास बोदामध्ये मोकळीक राहील व त्याचा फायदा घडाच्या विकासात होईल.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate