नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यांवर पानांच्या बगलेतून लांब नर-पुष्पांचे घोस अथवा एकेकटी स्त्री-पुष्पे येतात. एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळतात. फुले पिवळी असतात; नर-पुष्पांमध्ये पाच पाकळ्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसतो. त्यात आखूड तंतूंची दहा केसरदले व वंध्य किंजमंडल असते. स्त्री-पुष्पाच्या पाच मांसल पाकळ्या तळाशी जुळलेल्या परंतु वर सुट्या व बाहेरच्या बाजूस वळलेल्या दिसतात. त्यात वंध्य केसरदले आढळतात; किंजदले पाच, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यावर पंख्यासारखा पाच भागांचा किंजल्क असतो. किंजपुटात एक कप्पा आणि अनेक बीजके आतील बाजूस तटलग्न (मित्तीय) असतात [→ फूल]. मृदुफळ मोठे, गोलसर किंवा लांबट गोल आणि पिकल्यावर बाहेरून पिवळे व आत पिवळट शेंदरी असते. साधारणपणे त्याची लांबी २०-२५ सेंमी. व व्यास १०-१५ सेंमी. असतो. पिकलेल्या फलातील मगज (गर) गोड व स्वादिष्ट असतो. बिया विपुल व गर्द पिंगट असून त्यावंर नरम बाह्यावरण वा कठीण अंतरावरण असते; बाह्यावरणाला आभासी अध्यावरण [→ बीज] म्हणतात;त्यावर बारीक पुरळ असतो. फळ पौष्टिक व उत्तम खाद्य आहे. त्यामध्ये पेक्टीन, अ आणि क ही जीवनसत्त्वे व पेपेन नावाचे प्रथिन-पाचक (प्रथिनाचे शरीरात पचन होण्यास मदत करणारे) द्रव्य असते. ते द्रव्य प्राण्यांतील पेप्सिनाप्रमाणे क्रियाशील असते. पेपेन लोकर. चीज, जेली, च्युईंग गम, सौंदर्यप्रसाधने इ. तयार करण्याच्या उद्योगात वापरतात. पाने वा कच्च्या परईचे तुकडे मांस लवकर शिजण्याकरिता त्यात घालतात; कच्ची पपई भाजीकरिता वापरतात. अग्निमांद्यावर फले उपयुक्त असतात. पेपेन औषधी उपयोगाचे आहे; ते प्लीहेचे (पानथरीचे) विकार आणि मासिक पाळीचे विकार यांवर देतात.
घवघवे, ब. ग.
पपई हे सतत हिरवे रहाणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलीया, फिलिपीन्स बेटे आणि भारत या प्रदेशांत होते. भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १,३०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतातील पपईच्या लागवडीचे एकूण क्षेत्र १०,८४८ हे. असून सर्वात जास्त क्षेत्र (३,८८० हे.) बिहार राज्यात आहे. आसाममध्ये २,०४१ हे., मध्य प्रदेशात २,००० हे. आणि महाराष्ट्र व गुजरात मिळून १,२३६ हे. क्षेत्र आहे आणि इतर राज्यांत १,४१७ हे. क्षेत्र आहे.
कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. २° से. च्या खालील तापमान पपईला मानवत नाही. थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव असतात.
रोपे लावून लागवड करतात. नांगरणी, भरखत घालणे, कुळवणी वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीला रोपे लावतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020