आंबा आणि पेरूसारख्या नाशवंत फळांची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी लुधियाना (पंजाब) येथील केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने (सिफेट) "बायो कोटिंग' तंत्रज्ञान विकसित केले आहे. कमी खर्चात फळांची टिकवणक्षमता वाढविणे यामुळे शक्य होणार असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
आपल्या देशात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या फळांपैकी अनेक फळे नाशवंत आहेत. योग्य साठवणुकीअभावी या फळांचे थोड्याच दिवसांत मोठे नुकसान होते, तसेच लांब अंतरावर त्यांची व्यावसायिक वाहतूक करण्यावरही मर्यादा येतात. शीतगृहासारख्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही फळे साठवता येतात, मात्र त्याला मोठी गुंतवणूक लागते व खर्चही जास्त येतो. "वॅक्स कोटिंग' म्हणजेच मेणयुक्त पदार्थांचे थर फळांवर देण्याचा उपाय कमी खर्चिक आहे, मात्र खाद्य स्वरूपातील थर निर्मिती अपयशी ठरली, कारण त्यामुळे विनॉक्सी श्वसन वाढीला लागले. त्यामुळे सिफेटने संशोधन करून बायो कोटिंगची पद्धत विकसित केली आहे.
भात, साबुकंद, कायटोसन (कोळंबीच्या कवचातील घटक) आणि हळद यांपासून स्टार्चवर आधारित बायो-कोटिंग (जैविक थर) विकसित करण्यात आला आहे. या कोटिंगचा आंबा आणि पेरूच्या बाह्य आणि अंतर्गत स्वरूपावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास सिफेटने केला आहे. या कोटिंगमुळे कमी खर्चात फळांची टिकवणक्षमता वाढते आणि फळांना चकाकीही येते; तसेच सामान्य तापमानाला फळे व भाजीपाला या तंत्रज्ञानाच्या साह्याने टिकविणे शक्य आहे. स्टार्चवर आधारित बायोकोटिंगमुळे रंग विकसित होण्याची क्रिया मंदावते, तसेच फळांचा घट्टपणा टिकून राहतो, असे तुलनात्मक अभ्यासात आढळले आहे.
या तंत्रामध्ये स्टार्चवर आधारित द्रव्यामध्ये फळे बुडविली जातात, त्यानंतर ती हवेने सुकवून सामान्य तापमानाला साठविली जातात. त्यानंतर फळावर स्टार्चची फिल्म (थर) तयार होते. थंड झाल्यावर ती पारदर्शक बनते. ती जैवविघटनशील असते. कायटोसन आणि साबुकंदावर आधारित स्टार्चचा वापर सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे आढळले. त्यांच्या वापरामुळे फळे पिकण्याचा वेग कमी झाला. कायटोसनवर आधारित कोटिंगच्या वापरामुळे काही बुरशींची वाढ थांबवली गेली, त्यामुळे बुरशीनाशकांच्या वापराला पर्याय होऊ शकतो.
फळे पिकण्याची प्रक्रिया बायो कोटिंगमुळे लांबणीवर टाकली जात असली तरी फळांचे वजन घटण्याला त्यांच्याकडून फारसा प्रतिबंध होत नाही. त्यामुळे या कोटिंगची निर्मिती करण्याच्या पद्धतीवर अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
साबुकंदावर आधारित कोटिंग सर्वाधिक प्रभावी ठरले. त्यामध्ये फिल्म तयार करण्याची चांगली क्षमता असून, कायटोसन किंवा अन्य पदार्थांच्या तुलनेत ते स्वस्त आहे. ते खाद्य स्वरूपात असून घरच्याघरीही सहज बनविणे शक्य आहे. त्याच्या साह्याने सामान्य तापमानाला फळांची टिकवणक्षमता तीन ते चार दिवसांनी वाढविता येते, तसेच सामान्य तापमानाला साठविलेल्या फळांचा घट्टपणा आठ दिवसांनंतरही टिकतो. या पद्धतीने साठविलेली फळे ग्राहकही स्वीकारतात, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.