कोरड्या हवामानात अंजिराची उत्तम प्रतीची दर्जेदार फळे मिळतात. अंजीर बागेस दोन वेळा फळ बहर येतो. पावसाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला "खट्टा बहर' आणि उन्हाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला "मीठा बहर' असे म्हटले जाते.
खट्टा बहराचे नियोजन करताना अंजीर बागेस मार्च ते मे पूर्ण विश्रांती दिली जाते. ज्या विभागामध्ये उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसते, त्या विभागात खट्टा बहराचे नियोजन करता येते. कमी पाण्यावर देखील यशस्वीरीत्या बहर घेता येतो. अंजीर बागेस १५ ते ३० मे दरम्यान हलकी छाटणी केली जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यात खताची वयानुसार व जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे मात्रा देण्यात येते. शिफारशीप्रमाणे पाणी नियोजन करावे. या बहराची फळे ऑक्टोबर ते १५ जानेवारीपर्यंत तयार होतात. या वर्षीपासून जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे खट्टा बहरातील अंजीर बागा फुटून आल्या असून पूर्ण हिरव्यागार दिसून येत आहेत.
खट्टा बहर नियोजनातील महत्त्वाच्या बाबी
१) खट्टा बहर घेणार आहोत तेथील तापमान, हवेची आर्द्रता, सूर्यप्रकाश, पडणारा पाऊस, पावसाचे एकूण दिवस, धुके, गारा, वादळ, वारा या सर्व बाबींचा अभ्यास असणे गरजेचे आहे.
२) अंजीर बागेतील मातीचे परीक्षण दरवर्षी करून घेणे गरजेचे आहे. माती परीक्षणानुसार बागेस संतुलित खताच्या मात्रा घ्याव्यात. गरजेनुसारच सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्यांचा वापर महत्त्वाचा आहे.
३) अंजीर बागेचा जोम प्रभावी राखण्यासाठी, उत्पादनक्षमता टिकवण्यासाठी व चांगल्या प्रतीची अधिक फळे मिळण्यासाठी एकाच बहरात उत्पादन घेणे अधिक नफ्याचे ठरते.
४) अंजीर बागेस भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा.
५) खट्टा बहरासाठी पाणी सुरू करत असतानाच खोडावर व फांद्यांवर संजीवकाची फवारणी करावी. त्यासाठी दहा मि.लि. हायड्रोजन सायनामाईड (५० टक्के) प्रति लिटर पाण्यातून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने फवारावे किंवा संपूर्ण झाडास चोळावे, त्यामुळे सर्व सुप्त डोळे फुटतात, झाडांना नवीन पालवी येते.
६) पिकावरील कीड-रोगाची अचूक ओळख करून घ्यावी. योग्य ती कीटकनाशके व रोगनाशके योग्य वेळी, योग्य त्या प्रमाणात फवारणी करावी. बागेतील तणांचे वेळीच नियंत्रण करावे.
७) एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. फवारणीसाठी निवडक कीटकनाशकांचाच वापर करावा. मित्र कीटकांचा संहार होणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे.
८) अंजीर बागेस सूत्रकृमीचा उपद्रव आहे की नाही याची प्रत्येक वर्षी तपासावे. त्यासाठी अंजिराच्या मुळ्यांची तपासणी करावी तसेच माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.
९) अंजीर बागेत सतत ओलावा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.
१०) बागेच्या पश्चिमेस व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. - सुरू, निरगुडी, मलबेरी, करंज, शेवगा, हातगा, पांगारा, बकान इत्यादीची लागवड करावी.
११) अंजीर फळांचा टिकाऊपणा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे, त्याकरिता खतांची संतुलित मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर देखील महत्त्वाचा आहे. उदा. जर फळे भेगाळत असतील तर ३० ते ५० ग्रॅम बोरॉन प्रति झाड घ्यावे.
१२) फळे वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी करण्याची पद्धती आहे. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करून बागेस पाणी देण्यात येते. त्यामुळे फळांचे आकारमान सुधारते, चांगल्या प्रतीची फळे मिळतात.
१३) कीडग्रस्त फांद्या, बांडगूळ, खोडे कीडग्रस्त असल्यास वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात. खोडकिडीने केलेल्या छिद्रामध्ये २० मि.लि. डायक्लोरव्हॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या स्वरूपात द्यावे. छिद्र मातीने बंद करावे. बागेत प्रकाश सापळे लावावेत.
१४) छाटणीनंतर २० दिवसांनी कोवळी पाने फुटल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने २० ग्रॅम क्लोरथॅलोनील अधिक दहा ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति दहा लिटर या प्रमाणात फवारावे किंवा दहा ग्रॅम कार्बेन्डॅझिम अधिक २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा दहा ग्रॅम कार्बेन्डॅझिम अधिक २० ग्रॅम कॅप्टन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून चार ते सहा फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
मीठा बहर
या बहरामध्ये जून ते ऑगस्ट पूर्ण विश्रांती दिली जाते. साधारणपणे १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरमध्ये बागेची चाळणी व छाटणी करतात. सर्वसाधारणपणे १ ते १५ सप्टेंबर बागेस पहिले पाणी देण्यात येते. सदर बहराची फळे फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतात. सदर बहरातील फळातील साखरेचे प्रमाण खट्टा बहरापेक्षा अधिक असते.
- डॉ. विकास खैरे, ९३७१०१५९२७
(लेखक कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)