नारळ, सुपारी बागेतील नैसर्गिक सावलीमध्ये वेलदोड्याची लागवड फायदेशीर ठरते. वेलदोडा रोपे पाण्याचा ताण अजिबात सहन करू शकत नाहीत म्हणून जमिनीत नियमित ओलावा राहील याची काळजी घ्यावी. सूक्ष्म तुषारसिंचनाने पाणी दिल्यास झाडांची वाढ झपाट्याने होते, तसेच पाण्याचा अपव्ययही टळतो.
झाडाच्या बुंध्याजवळ पाणी देण्यासाठी आळे करू नये. त्यामध्ये पाणी साचून मुळे कुजतात. या झाडास उष्ण हवामान, तसेच जोरदार वारा सहन होत नाही. उष्ण हवामानामुळे झाडे करपतात, तसेच जोरदार वाऱ्यामुळे झाडे मोडतात. झाडावर थेट पडलेले दुपारचे सूर्यकिरण वेलदोड्यास सहन होत नाहीत.
खते वर्षातून दोनदा ऑगस्ट-सप्टेंबर आणि मे-जूनमध्ये द्यावीत. रोपांच्या पसाऱ्याभोवती आठ ते दहा सें.मी. खोलीचा चर खणून खते द्यावीत. रोपांच्या वाढीनुसार 500 ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत व शिफारशीत रासायनिक खताची मात्रा द्यावी. खते सेंद्रिय व रासायनिक अशी दोन्ही प्रकारे द्यावीत. खते घातल्यावर चर मातीने बुजवून घ्यावा. वातावरण व जमीन मानवल्यास वेलदोडा रोपे एका वर्षातच चार ते पाच फूट उंच वाढतात, तसेच 10 ते 15 रोपांचे बेट तयार होते.
तिसऱ्या व चौथ्या वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत मूळ रोपास जमिनीलगत हिरवट रंगाचे तुरे येण्यास सुरवात होते. तुरे वाढत असतानाच मागील पापुद्य्रातून नाजूक कळ्या व नंतर एकच पाकळी असलेली व आतून जांभळट छटा असलेली पांढरी शुभ्र फुले उमलतात. यथावकाश फुलांना हिरवट रंगाची छोटी छोटी फळे धरू लागतात.
सर्वसाधारणपणे तीन ते चार महिन्यांत फळे काढणीस तयार होतात, मात्र सर्व फळे एकाच वेळी तयार होत नाहीत. चांगल्या, मोठ्या वाढलेल्या एका वेलापासून वर्षभरात 200 ग्रॅम वाढलेली फळे मिळू शकतात.
संपर्क - 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्म...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...