অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यवस्थापन मसाला पिकांचे...

व्यवस्थापन मसाला पिकांचे...

नारळ, सुपारीच्या बागांमधील नवीन लागवड केलेल्या तसेच जुन्या जायफळ, दालचिनी, काळीमिरी आणि लवंग झाडांचे योग्य व्यवस्थापन करावे. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते, चांगले उत्पादन मिळते.

जायफळ

1) नवीन लागवड केलेल्या जायफळ कलमांच्या जोडाखालून रोपांना फुटवा येतो. तो तसाच वाढू दिल्यास कलमांच्या वाढीवर परिणाम होतो म्हणून असा फुटवा काढून घ्यावा. 
2) नवीन लागवड केलेल्या जायफळ कलमांवर सावली करावी; अन्यथा अतिउन्हामुळे पाने करपण्याची शक्‍यता असते. 
3) जायफळ कलमांना उंच जाण्यासाठी काठीचा आधार द्यावा. कलमे आधाराच्या काठीला सुतळ अथवा केळीच्या पानाच्या सोपटाने बांधून घ्यावे. असे न केल्यास कलमे वेडीवाकडी वाढतात आणि उत्पादनावर परिणाम होतो. 
4) कलमांना लहान असताना 10 लिटर आणि पाच वर्षांनंतर पुढे 30 लिटर ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. 
5) झाडांच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे. 
6) फळकुजवा हा रोग आढळल्यास 1 टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

दालचिनी

1) नवीन लागवड केलेल्या दालचिनी झाडांना काठीचा आधार देऊन त्यांची वाढ सरळ ठेवावी. 
2) पावसाळ्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पाच लिटर प्रतिदिन या प्रमाणात पाणी द्यावे. 
3) झाडांच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे. 
4) साल काढण्यासाठी तोडलेल्या दालचिनी झाडांना असंख्य फुटवे येतात, त्यापैकी जोमदार 5 ते 6 फुटवे ठेवून बाकीचे काढून टाकावेत.

काळीमिरी

1) मिरीच्या वेलाचे सरळ वाढणारे फुटवे आधारवृक्षाला उदा. सुपारी, नारळ, सिल्वर ओक, ग्लिरीसिडीयाला बांधून घ्यावेत. 
2) काळीमिरी वेलाला प्रतिदिन 10 लिटर या प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
3) तयार काळीमिरी घड काढून उन्हात वाळवावेत आणि पूर्ण वाळल्यावर हवाबंद डब्यात अथवा अन्य पॅकिंगमध्ये साठवून ठेवावेत. 
4) रोगट पाने, मेलेल्या वेली जाळून टाकाव्यात. बुंध्यामधून पाण्याचा चांगला निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. 
5) काळीमिरीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी वेलाला लहानपणापासून आकार देणे, आधार देणे आणि वाढ नियंत्रित ठेवणे या गोष्टी करणे आवश्‍यक आहेत. 
6) पानांवर किंवा वेलावर पान कुडवा किंवा वेल कुजवा किंवा मर रोग आढळून आल्यास एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

लवंग

1) लवंग हे सर्व मसाला पिकांमध्ये नाजूक झाड आहे. सरळ उन्हात त्याची पाने करपतात, झाडाची वाढ चांगली होत नाही, खोड खराब होते म्हणूनच रोपांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. 
2) लवंग झाड नाजूक असल्याने पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. लहान रोपांना प्रतिदिन 10 लिटर, तर 5 वर्षांनंतर मोठ्या झाडांना 30 लिटर पाणी द्यावे. 
3) लवंगाच्या पूर्ण वाढलेल्या झाडांना येणाऱ्या कळ्या या फुलामध्ये रूपांतरित होण्यापूर्वी टपोऱ्या झाल्यावर काढाव्या लागतात. त्यासाठी अशा तयार कळ्या काढताना काळजीपूर्वक तोडणी करावी. झाडांच्या फांद्या नाजूक असतात. त्या न मोडता कटरच्या साहाय्याने तोडणी करावी.
संपर्क - 02352- 255077 
( लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate