जगातील निम्म्या लोकसंख्येच्या जेवणात भात हा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे येत्या काळातील वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलाचे धोके लक्षात घेता भाताच्या उत्पादकतावाढीशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने विविध देश अन्नधान्य सुरक्षेसाठी भात उत्पादकतावाढीकडे जाणीवपूर्ण लक्ष देत आहेत. यासाठी विविध देशांतील संशोधन संस्थांच्यामध्ये संशोधन सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यातून भविष्यातील अन्नधान्य टंचाईवर मात करणे शक्य आहे, असे मत आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. समरेंद्रू मोहंती यांनी चर्चासत्रात मांडले.
डॉ. मोहंती म्हणाले की, गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर अन्नधान्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. त्यामध्ये भाताच्या व्यापाराला अत्यंत महत्त्व आहे. उपलब्ध भात लागवडीचे क्षेत्र पाहता सन 2020 चा विचार करता सध्याच्या उत्पादनापेक्षा 84 दशलक्ष टन, तर सन 2035 चा विचार करता 116 दशलक्ष टन भाताच्या उत्पादनात वाढ आवश्यक आहे. भविष्यातील भाताची मागणी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने भात उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विविध देशांची गरज लक्षात घेऊन भाताच्या संकरित जाती विकसित करण्यात येत आहेत. यातील काही जातींच्या लागवडीमुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. त्याचबरोबरीने जैवतंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भातही काम सुरू आहे.
मिशिगन स्टेट विद्यापीठातील तज्ज्ञ थॉमस रीडॉन म्हणाले, की नवीन जातींच्या संशोधनाबरोबरीने पीक व्यवस्थापन आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असल्याने भाताच्या उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये फरक पडतो आहे. उत्पादनवाढीच्या बरोबरीने सरकारी पातळीवर भात उत्पादकता वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जंगली भातवर्गीय तणांतील काही जनुकीय गुणधर्म अधिक स...
सद्यपरिस्थितीनुसार भात पीक लागवडी कशा प्रकारे कराव...
या विभागात मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमद...
चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांग...