भाताच्या सुधारित एसआरआय (सिस्टिम ऑफ राइस इंटेंसिफिकेशन) अर्थात सघन पद्धतीच्या लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी व बियाणे व अन्य निविष्ठांत बचत करून उत्पादन वाढवणे शक्य झाले आहे.
भात लागवडीची एसआरआय (सघन) पद्धतीमुळे कमी खर्चात, कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळविता येणे शक्य आहे. या सुधारित लागवड तंत्रज्ञानातील बारकावे शेतकऱ्यांनी समजावून घेतल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा भाताचे चांगल्या दर्जाचे अधिक उत्पादन घेता येणे शक्य आहे.
एसआरआय (सघन) लागवड पद्धतीमुळे भाताची रोपे बळकट होतात. रोपांची मुळे लांब असल्याने कमी पाण्यातही तग धरतात. बळकट मुळांमुळे मातीमधील सिलिकॉन अधिक प्रमाणात शोषून घेतले जाते. या पद्धतीने पारंपरिक, तसेच सुधारित, संकरित जातींची लागवड करता येते.
या पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी दोन ते तीन किलो चांगल्या प्रतीचे, 80 टक्के उगवणक्षमता असलेले शिफारशीत बियाणे निवडावे. रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी तीन टक्के मिठाच्या द्रावणात दहा मिनिटे बियाणे बुडवावे. या द्रावणात तरंगणारे बियाणे काढून टाकावे, पाण्यात बुडलेले बियाणे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावे. त्यानंतर पाणी काढून 24 तास हे बियाणे सुती कापडामध्ये झाकून ठेवावे. या अंकुर फुटलेल्या बियाणांची मुळे दोन ते तीन मिलिमीटर लांबीची असतात.
1) रोपवाटिकेच्या प्रत्येक 100 चौ. मीटर भागासाठी चार क्युबिक मीटर खतमाती मिश्रण मिसळावे. यासाठी साधारणपणे सात भाग मातीमध्ये दोन भाग चांगले वाळलेले शेणखत, गिरीपुष्प पाला, गांडूळखत आणि एक भाग भात तुसांची काळसर राख मिसळावी.
2) रोपवाटिकेत पेरणीसाठी खतमाती मिश्रणाचे दहा सें.मी उंचीचे आणि गरजेइतके लांब गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा सोडावी. गादीवाफ्यावर अंकुरलेले बियाणे पेरावे. त्यावर भाताच्या पेंढ्याचे आच्छादन करावे, झारीने पाणी द्यावे. पेंढा दोन दिवसांनी काढावा. त्यानंतर 8 ते 12 दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी.जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावीत.
एसआरआय पद्धतीने लागवड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणेच शेतीची मशागत करावी. मशागतीनंतर मात्र शेतामध्ये समतलता काळजीपूर्वक ठेवावी, म्हणजे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात लागू शकेल. शेतात प्रत्येकी तीन मीटर अंतरावर निचरा होण्यासाठी पाट काढून द्यावा. मार्करच्या साह्याने 25 x 25 सें.मी. अंतरावर उभ्या आणि आडव्या रेषा ओढाव्यात. प्रत्येक फुलीच्या मध्यावर रोप लागवडीचे नियोजन करावे. पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर माती परीक्षणानुसार करणे आवश्यक आहे. एसआरआय पद्धतीमुळे खतांचा आणि पाण्याचा काटेकोरपणे वापर केला जातो, त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये रासायनिक खते आणि पाण्याच्या वापरात बचत होते.
रोपांची लवकर पुनर्लागवड
8 ते 12 दिवसांच्या दोन पानांच्या रोपांची पुनर्लागवड केल्यामुळे फुटवे फुटव्यांची संख्या वाढते. रोपे वरवर लावल्यास लगेच मुळे धरतात. अंगठा व तर्जनीचे बोट वापरून रोपे अलगद फुलीच्या मध्यावर लावावीत.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...