सध्याच्या काळात कोकणातील चारही जिल्ह्यांत भात पिकावर कमी-अधिक प्रमाणात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. वास्तविक पाहता खरीप हंगामात भात पिकावर कोकणात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव सहसा आढळून येत नाही. परंतु या वर्षी बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. याची कारणे आणि पेरलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातून असे दिसून आले, की रोगट बियाण्यातून रोगकारक बुरशीचा प्राथमिक प्रसार झाला. रोगास बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड झाली, त्याचबरोबरीने शेतकऱ्यांनी नत्र खताचा अतिरिक्त वापर केला होता. या रोगाच्या नियंत्रणासाठी तातडीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. 1) रोगट बियाण्यातून रोगकारक बुरशीचा प्राथमिक प्रसार :
ज्या भागात हा रोग दिसून आला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या व रोगास बळी पडलेल्या भात बियाण्याची तपासणी करता त्यात करपा रोगास कारणीभूत बीजे असल्याचे दिसून आले. ही बीजे जिवंत आणि रोगकारकक्षम स्वरूपात असल्याचे दिसून आले. विविध ठिकाणांहून गोळा केलेल्या बीज नमुन्यातून असा प्रकार पाहायला मिळाला.या भागातून बुरशीजन्य करपा रोगाची प्राथमिक लागण ही रोगट बियाण्यांमार्फत झाली होती.
2) रोगास बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या क्षेत्रावर लागवड
रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या भागाची पाहणी करता असेही आढळून आले, की शेतकऱ्यांनी सुवर्णा, गुजरात-4, गुजरात-11, गुजरात-17, रूपाली, कोमल इत्यादी रोगास बळी पडणाऱ्या जातींची लागवड मोठ्या क्षेत्रावर केली आहे. या जातींची कृषी विद्यापीठाने लागवडीसाठी शिफारस केलेली नाही. या भागातूनच रोगाचा प्राथमिक उद्रेक होऊन रोगप्रसार झपाट्याने झाला. ही लागवड मोठ्या क्षेत्रावर असल्याने या क्षेत्रावर रोगाची लागण पाहावयास मिळाली. प्रत्यक्ष पाहणीत असे आढळून आले, की कोकणातील चारही जिल्ह्यांत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित आणि संकरित वाणांवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.
3) रोगप्रसारास अनुकूल हवामान
या वर्षी ऑगस्ट महिन्यात असणारे हवामान कधी ऊन तर कधी पाऊस, सलग नसणारा पाऊस, त्यामुळे हवेत असणारी 90 टक्क्यांपेक्षा जास्त अशी आर्द्रता; पावसात असणारा वारा, तापमान (19 ते 28 अंश से.) हे सर्व घटक रोगाच्या बुरशीच्या वाढीस आणि प्रसारास अत्यंत उपयुक्त व पोषक आहे. सध्या असे वातावरण असल्याने रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः डोंगरपायथ्याजवळील भागातून भात पिकावर दिसून आला. हा प्रादुर्भाव रोगास बळी पडणाऱ्या जाती मोठ्या क्षेत्रावर असल्याने वेगाने पसरला.
4) नत्र खतांचा अवाजवी वापर :
ज्या भागात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता तेथील शेतांमध्ये नत्र खतांचा भरपूर वापर झालेला आहे. शिफारशीनुसार स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर करण्यात आलेला नाही. अन्नद्रव्यांच्या असंतुलनामुळे पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होऊन त्याऐवजी पीक रोगास बळी पडले. नत्र खतांचा अतिरेकी वापर हा भात पिकामध्ये बुरशीजन्य करपा रोगाच्या वाढीस अत्यंत अनुकूल व पोषक असल्याने रोगाची निर्मिती झपाट्याने झाली.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...