कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.
कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनात घट येते. ही घट कांद्यामध्ये जातीपरत्वे 25 ते 30 टक्के असते. कांदा काढणीनंतर तो चांगला सुकवला नाही तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही. वरचे कवच ओलसर राहिले तर कांदा सडतो. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. सडीमुळे कांद्याचे या काळात 10 ते 15 टक्के नुकसान होते.
कांद्याच्या आकारमानाचा परिणाम कांद्याच्या साठवणीवर होतो. 55 ते 75 मि.मी. जाडीचे कांदे साठवणीत चांगले टिकतात. लहान गोलटी कांदा साठवणीत लवकर सडतो. दोन मोठ्या कांद्यामध्ये मोकळी जागा जास्त राहते. त्यांच्या भोवती हवा खेळती राहते, सड कमी राहते.
कांदा चाळीतील कांद्याची उंची 4 ते 5 फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. तसेच चाळीची रुंदीदेखील 4 ते साडेचार फुटांपेक्षा जास्त असू नये.
संपर्क - वैजनाथ बोंबले - 9049559553
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) म्हणून कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020