सद्यपरिस्थितीतील हवामान पाहता कोबी, फुलकोबी या पिकांवर डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता आहे. रोपे लागवडीनंतर रोगाची लागण झाली आणि प्रमाण वाढले तर नुकसान ६० टक्केपेक्षा जास्त होऊ शकते. परिणामी उत्पादनात मोठी घट येणे, गड्डे लहान निपजणे असे प्रकार होऊ शकतात. तेव्हा या पिकांचे "डाऊनी'पासून संरक्षण करण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.
या आठवड्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात असाधारण वाढ झालेली आहे. त्याचबरोबर हलका पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता प्रमाण ८० टक्केपेक्षा जास्त आहे. खरंतर नोव्हेंबर महिना किंवा दिवाळीदरम्यान थंड आणि कोरडे हवामान असते; परंतु सद्यपरिस्थितीत अचानकपणे हवामानात जो बदल झाला आहे, त्याचा रब्बी हंगामातील काही पिकांवर प्रतिकूल परिणाम संभवतो.
या हंगामात कोबी आणि फुलकोबी ही भाजीपाला पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. आजमितीस बहुतांश शेतकऱ्यांनी रोपांची पुनर्लागवड केली आहे; परंतु सध्याच्या आठवड्यातील हवामान पाहता या पिकांवर डाऊनी म्हणजे केवडा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता आहे. रोपे लागवडीनंतर रोगाची लागण झाली आणि प्रमाण वाढले तर नुकसान ६० टक्केपेक्षा जास्त होऊ शकते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणे, गड्डे लहान निपजणे असे प्रकार होऊ शकतात. यासाठी कोबी आणि फुलकोबी या पिकांचे "डाऊनी' पासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
रोगाची लक्षणे
कोवळी तसेच जून पाने या बुरशीजन्य रोगाने ग्रासली जातात. बुंध्याजवळची आणि जून पाने लवकर बळी पडतात. पानांच्या पृष्ठभागावर गोलाकार पिवळसर चट्टे दिसून येतात. रोगग्रस्त पाने खुडून सूर्यप्रकाशाकडे धरल्यास हे फिक्कट पिवळसर गोलाकार चट्टे सहज लक्षात येतात. शेतामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले, की या चट्ट्यांच्या विरुद्ध खालच्या बाजूस बुरशीची तंतुमय राखाडी रंगाची वाढ झालेली दिसते. हे चट्टे आकाराने मोठे होतात, एकमेकांत मिसळतात आणि संपूर्ण पानभर पसरतात. रोगग्रस्त पाने करपतात, गळून पडतात. याचा दुष्परिणाम गड्डे पोसण्यावर होऊन उत्पादन घडते. रोगकारक बुरशीचा प्रसार हवेतून बीजाणूंमार्फत होत असतो. सध्याचे हवामान बीजाणूच्या निर्मितीस, प्रसारास आणि रुजण्यास अत्यंत अनुकूल आहे. तरी खबरदारी घेऊन रोग आटोक्यात आणणे गरजेचे आहे.
करावयाच्या उपाययोजना
रोगग्रस्त पाने काढून, गोळा करून नष्ट करावीत.
नत्र खताची मात्रा शिफारशीप्रमाणेच म्हणजे हेक्टरी १५० किलो या प्रमाणात द्यावी. जास्त नत्राच्या मात्रेने रोगाची तीव्रता वाढते.
तणांचा बंदोबस्त करून स्वच्छता राखावी. तणाची वाढ शेतामधील सापेक्ष आर्द्रता वाढविण्यास मदत करते.
मेटॅलॅक्झील (आठ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून पाठीवरील साध्या पंपाने फवारावे. द्रावणामध्ये स्टिकरचा वापर करावा. १० ते १२ दिवसांनी पुन्हा फवारणी करावी
डॉ.हसबनीस, ९४२३२६११९१
(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत - अग्रोवन