অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वांगी उत्पादन - प्रकाशसापळे

वांगी उत्पादन - प्रकाशसापळे

वांग्यातील फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तिचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा उपयोग फायदेशीर ठरल्याचे आढळले आहे. तमिळनाडू राज्यात प्रचलित प्रकाशसापळ्यात थोडी सुधारणा करून त्याचा वापर यशस्वीपणे करण्याचे प्रयोग घेण्यात आले आहेत. बीटी कापसापाठोपाठ बीटी वांगे सध्या चर्चेत आहे. ज्या किडीच्या नियं त्रणासाठी त्याची निर्मिती झाली आहे, त्या किडीचे नाव फळ आणि शेंडा पोखरणारी अळी असे आहे. देशभरातील वांगे उत्पादकांना या किडीचा मोठा उपद्रव जाणवतो. या किडीच्या नियंत्रणासाठी अनेक फवारण्या घेतल्या जातात; मात्र ही कीड पिकाच्या आतील भागात राहात असल्याने या फवारण्या तिच्यापर्यंत पोचण्यास अडथळा निर्माण होतो.

किडीच्या समस्येची तीव्रता सांगताना त मिळनाडू राज्यातील कडायम (तिरुनेलवेल्ली) येथील फलोत्पादन संचालक पी. डेव्हिड राजा बेअुला असे स्पष्टीकरण देतात. फवारण्या अधिक केल्याने प्रभावी नियंत्रण होतेच असे नाही उलट शेतकऱ्याचा पैसा व्यर्थ जातो.

पर्यावरणातही प्रदूषण निर्माण होते. डेव्हिड म्हणतात, की अनेक वांगी उत्पादकांनी मला या किडीवर ठोस उपाय सुचवण्यासंबंधी विचारले आहे. माझ्या शेतातील अनेक भेटींमध्ये प्रकाशसापळा ही पद्धत किडींचे सर्वेक्षण व पर्यायाने त्यांचे नियंत्रण करण्यास फायदेशीर ठरल्याचे मला अनुभवण्यास आले आहे. आता याच सापळ्यात थोडी सुधारणा करून वांगी उत्पादकांना मी त्याचा वापर करण्यासाठी सांगितले असल्याचे डेव्हिड म्हणाले. यामध्ये प्रकाशासाठी रिचार्जेबल लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेतात त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून, ते यशस्वी ठरले आहे. या सापळ्याचा वापर केल्याने कीडनाशकाच्या वापरात एकरी दहा हजार रुपयांचा खर्च सात हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. या वायरलेस सापळ्याचा खर्च पाचशे रुपये (प्रति नग) असून, एकरी दोन सापळे पुरेसे होतात. अशा रीतीने कीडनाशकांवरील तीन हजार रुपयांमध्ये शेतकरी बचत करू शकतो. एका शेतकऱ्याच्या शेतात या प्रकाशसापळ्याचा वापर करण्यात आला, त्याला एकरी दहा टनांचे उत्पादन मिळाले आहे. अन्य पिकांतही अशा सापळ्यांचा वापर करणे शक्‍य असल्याचे डेव्हिड म्हणाले.

वांग्यावरील किडीविषयी महत्त्वाचे

शेंडा णि फळ पोखरणारी अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यांत, फुलांत किंवा फळांत शिरून उपजीविका करते. किडीच्या वर्षभरात आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी पानाच्या मुख्य शिरेतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात. लहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडले आहे की नाही, हे कळणे अवघड असते. अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात. किडीमुळे 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. किडीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास हेच नुकसान 70 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याचे आढळले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate