অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधारित अळू लागवड

अळू हे जोमाने वाढणारे पीक आहे. याच्या पानांचा वापर वडी तयार करण्यासाठी केला जातो, तर कंद उकडून खातात. नारळ, सुपारी बागेत आंतरपीक किंवा सलग पीक म्हणून अळूची लागवड करता येतेअळू लागवडीसाठी खोल, चांगल्या निचरा, सुपीक गाळाची पण भुसभुशीत आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध अशी जमीन निवडावी. जमिनीचा सामू उदासीन असावा. पोयटायुक्त जमिनी पिकास चांगल्या समजल्या जातात. अतिबारीक कणाची चिकणयुक्त जमीन पिकास अयोग्य असते. पिकाचा कालावधी जास्त असल्याने जमीन प्रथम २० ते २५ सें. मी. खोलवर नांगरावी. नंतर उभी-आडवी कुळवणी करून ढेकळे फोडून जमीन सपाट करावी. शेवटच्या कुळवणीवेळी जमिनीत १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे. जमिनीची पूर्वतयारी करताना जमीन चांगली भुसभुशीत होईल याकडे लक्ष द्यावे. सलग लागवड करावयाची असल्यास ९० सें. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करावेत.

सुधारित जात

कोकण हरितपर्णी


१) काळपट जांभळ्या देठाची, मोठे रुंद त्रिकोणी पान असलेली व भरपूर कंद येणारी जात. 
२) याची पाने अळूवडी करण्यासाठी उपयुक्त. 
३) हेक्टरी ४ ते ५ टन हिरव्या पानांचे (देठासहित) आणि ५ ते ६ टन कंदाचे उत्पादन.

लागवडीचे तंत्र


१) लागवड वर्षभर केव्हाही करता येते. लागवडीसाठी सरी वरंबा, सपाट वाफे किंवा गादी वाफा पद्धतीचा अवलंब करावा. मात्र, चांगल्या निचऱ्याबरोबर पुरेसा ओलावा जमिनीमध्ये टिकून राहील याची काळजी घ्यावी. 
३) लागवडीसाठी ९० x ९० सें. मी. अंतर ठेवावे. लागवडीसाठी मुख्य कंदाचा वापर केला जातो. कंद ८ ते १० सें. मी. खोलीवर लावावेत. कंद मातीने चांगल्या झाकावेत. 
४) ९० x ९० सें. मी.वर लागवड केल्यास प्रतिगुंठ्यास १२५ ते १३० कंदांची आवश्यकता असते. 
५) पावसाळ्यात अतिपावसाच्या भागात सरी वरंब्यावर लागवड करावी, तर उन्हाळी हंगामात सऱ्या फोडून सपाट वाफे तयार करावेत. आंतरपीक म्हणून लागवड करावयाची असल्यास सपाट वाफे पद्धत वापरावी. मात्र, या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. जमिनीत ओलावा असणे हे अळू पिकाच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने चांगले असते. 
६) जमिनीची पूर्वमशागत करतेवेळी हेक्टरी १० टन शेणखत मिसळून द्यावे. 
७) माती परीक्षणानुसार हेक्टरी ८० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. यापैकी स्फुरद खताची संपूर्ण मात्रा लागवडीवेळी द्यावी. नत्र व पालाश खते दोन वेळा समान हप्त्यात विभागून द्यावीत. खताचा दुसरा हप्ता आळे पद्धतीने देऊन मातीने झाकून घ्यावा, त्यानंतर लगेच पाणी द्यावे. 
८) ओलावा जेवढा जास्त तेवढ्या प्रमाणात पानांचे उत्पादन जास्त मिळते. पावसाळ्यात पिकास पाणी देण्याची आवश्यकता नसते. मात्र, त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. पाणी मुळाशी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. 
९) नारळ, सुपारी, चिकू बागेत आंतरपीक म्हणून अळू लागवड केल्यास मुख्य पिकास पाणी देताना आपोआपच वडीच्या अळू पिकास पाणी दिले जाते. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज नाही. 
१०) पिकाच्या लागवडीसाठी दोन ओळी आणि दोन झाडांमधील अंतर जास्त असल्याने पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत तणांशी स्पर्धा होऊ शकते. त्यासाठी सुरवातीस २० ते २५ दिवसांनी आणि ४० ते ४५ दिवसांनी तण नियंत्रण करावे. एकदा पिकाची वाढ झाली की तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. दुसरी बेणणी केल्यानंतर खतांची दुसरामात्रा देऊन पिकास भर द्यावी. 
११) या पिकापासून पाने व कंद असे दोनही उत्पादन मिळते. पानांचा आकार योग्य लक्षात घेऊन बाजारात विक्रीसाठी पाने काढावीत. पहिल्या वेळी पाने काढल्यानंतर पुन्हा १५ ते १८ दिवसांनी अंतराने पाने काढणीस तयार होतात. पाने काढताना देठासहित काढावीत. कंदासाठी उत्पादन घेत असताना मात्र पानांची खुडणी जास्त करू नये. 
१२) योग्य व्यवस्थापन केल्यास हिरव्या पानांचे (देठासहित) हेक्टरी ४ ते ५ टन, तर कंदाचे ५ ते ६ टन उत्पादन मिळते.
डॉ. नामदेव म्हसकर ः ९७३०८३७६६६, 
०२३५८- २४००३५, 
(लेखक, अखिल भारतीय समन्वित कंदपिके संशोधन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate