অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंडी उबवणी - माशांची मरतुक

माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील माशांपैकी ९० टक्के मृत होतात. त्यामागील जैवशास्त्रीय व भौतिकशास्त्रीय कारणांचा शोध घेण्यामध्ये तेल अविव विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. त्यांनी मांडलेल्या संशोधनानुसार, पर्यावरणाशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने खाद्य घेण्यामध्ये अडचणी येतात. त्यासोबतच चिकट स्त्रावामुळे वाढलेली पाण्याची घनताही मरतुकीसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
जगभरातील एक अब्जापेक्षा अधिक लोक प्रथिनांच्या पूर्ततेसाठी माशांवर अवलंबून असल्याने अन्नसुरक्षेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या दोन दशकांमध्ये प्रदूषण व मासेमारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून, माशांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर येते आहे. त्यातच अंड्यातून बाहेर आल्यानंतरच्या पहिल्या अवस्थेमध्ये ९० टक्के माशांची नैसर्गिकरीत्या मरतुक होते. त्या मागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न तेल अविव विद्यापीठातील संशोधक डॉ. रोई होल्झमॅन आणि व्हिक्टर चीना यांनी केला आहे. त्यांनी इस्राईल येथील सागरी शास्त्र आंतरविद्यापीठीय संस्थेमध्ये प्रयोग केले आहेत. त्यांच्या मते, हायड्रोडायनॅमिक स्टार्वेशन(बाह्य स्थितीशी जुळवून घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी)मुळे माशांची अळीवस्था धोक्यात येते. अळीवस्थेतील माशांची मरतुक रोखण्यासाठी उच्च दर्जाच्या सागरी जपणूक केंद्राची (मारीकल्चर) निर्मिती करायला हवी. मारीकल्चर ही सागरी सजीवांच्या पुनरुत्पादन आणि वाढीसाठी कार्यरत अशी विशेष शाखा असून, त्यामध्ये खाद्य आणि अन्य उत्पादनासाठी उघड्या समुद्रामध्ये प्रयत्न केले जातात. त्या विषयी माहिती देताना डॉ. होल्झमॅन म्हणाले, की जर या पद्धतीने आपण अधिक चांगल्या प्रकारे माशांचे संगोपन करू शकलो, तर माशांची संख्या स्थिर ठेवण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकते.

नेमकी समस्या काय?

बहुतांश माशांच्या प्रजातीमध्ये अंड्यांचे फलन हे शरीराबाहेर होते. अंडी आणि वीर्य पाण्यामध्ये अनुक्रमे मादी आणि नराकडून सोडले जातात. या प्रक्रियेवर दोन्ही पालकांचा अंकुश असत नाही. फलन झालेली अंडी साधारणपणे दोन दिवसांमध्ये उबून, त्यातून अळीसारखी पिल्लावस्था बाहेर येते. त्या भोवती असलेल्या चिकट स्त्रावामध्ये दोन ते तीन दिवसांपर्यंत तग धरू शकतात. त्यानंतर मात्र तोंड, कल्ले आणि पर यांची वाढ कमी प्रमाणात असल्याने खाद्य खाण्यामध्ये अडचणी येतात. पर्यायाने मृत्यूचे प्रमाण वाढते.

उपाययोजनेसाठी जीवशास्त्र, भौतिकशास्त्राचा समन्वय

  • समस्या लक्षात आल्यानंतर त्यावर उपाय म्हणून डॉ. होल्झमॅन यांनी या कालावधीमध्ये अधिक नियंत्रित वातावरणामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला. योग्य प्रकारे नियंत्रित वातावरणामध्येही चिकट स्त्रावापासून दूर होऊन तोंड उघडू लागल्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण ७० टक्के इतके राहिले. मरतुक थोडी कमी झाली तरीही हे प्रमाणही अधिकच आहे. त्यामुळे त्यांना प्रश्नाच्या मुळाकडे जाण्यासाठी भौतिकशास्त्राकडे वळावे लागले.
  • डॉ. होल्झमॅन आणि त्यांचे पी. एचडीचे विद्यार्थी व्हिक्टर चीना यांनी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अभ्यास केला. त्यांनी पहिल्या टप्प्याचे ८, १३, आणि २३ दिवसांचे असे तीन भाग केले. पाण्यातील चिकटपणा अंडीअवस्थेतून बाहेर आल्यानंतरच्या टप्प्यामध्ये खाद्य मिळविण्यामध्ये अडचणी ठरत असल्याचे दिसून आले. त्वचेच्या भोवती असलेल्या दोन ते तीन मिलिमीटर थरामुळे अळीवस्थेतील माशांसाठी खाद्य खाण्यामध्ये मोठ्या अडचणी येतात.
  • कमी चिकट असलेल्या पाण्यामध्ये मात्र या अळीवस्थेतील मासे खाद्य मिळवू शकत असल्याचे दिसून आले. त्यावरून माशांचा तग धरण्याचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होऊ शकेल, असे संशोधकांचे मत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate