सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याच बरोबर पाण्याच्या अनिर्बंधीत वापरामुळे तसेच तद्नुषंगिक कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पिक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृद आरोग्य पत्रिका ही योजना सन 2015-16 पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दोन वर्षात त्यांच्या शेत जमिनीचा मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन द्यावयाची आहे. यामध्ये वहितीखालील क्षेत्रांमधून जिरायत क्षेत्रासाठी 10 हेक्टर क्षेत्रास 1 मृद नमुना व बागायत क्षेत्रासाठी 2.5 हेक्टर क्षेत्रास 1 मृद नमुना घेऊन त्यांचे प्रमुख व सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी विश्लेषण करण्यात येत आहे. मृद आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीचा रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मुलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती व जमिन आरोग्य पत्रिकेतील अहवालानुसार पिकांना खत मात्राची शिफारस शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
सदरचा कार्यक्रम सन 2015-16 व 2016-17 या दोन वर्षात राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्यामध्ये मृद चाचणी तपासणीसाठी शासकीय 29 व नोंदणीकृत अशासकीय 137 अशा एकूण 166 मृद चाचणी प्रयोगशाळा आहेत. सदर प्रयोगशाळांची मृद नमुने तपासणीची वार्षिक क्षमता 11.50 लाख आहे. राज्यामध्ये एकूण 1.37 लाख खातेदार असून एकूण लागवडीलायक क्षेत्र 1.75 कोटी हेक्टर आहे. पैकी 1.41 कोटी हेक्टर जिरायत व 33.08 लाख हेक्टर बागायत क्षेत्र आहे. दोन वर्षात जिरायत 14.10 लाख व बागायत 13.23 लाख असे एकूण 27.33 लाख मृद नमुने काढण्यात येणार आहे.
सन 2015-16 मध्ये एकूण 9.11 लाख मृद नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत 8.99 लाख मृद नमुने काढण्यात आलेले आहेत. पैकी 7.89 लाख मृद नमुन्यांची तपासणी झालेली असून 30.58 लाख जमिन आरोग्य पत्रिकेचे शेतकऱ्यांनी वितरण करण्यात आलेले आहे.
लेखक - गजानन पाटील
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...