‘शिकवणी वर्गात प्रवेशासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा छळ’ होत असल्याची तक्रार पारनेरच्या काही जागरुक पालकांनी केली आहे. असे प्रकार सगळीकडेच चालतात परंतु पालक सहसा तक्रार करीत नाहीत. म्हणून पारनेरच्या ‘त्या’ पालकांचे कौतूक वाटते. त्यांना बळ दिले पाहीजे. प्रश्न तडीला नेला पाहीजे.
अशा शिक्षकांची(?), प्राध्यापकांची(?) लेखी तक्रार नावांनिशी, पुराव्यानिशी करुन संबंधीतांना अद्दल घडवली पाहीजे. ज्यांनी समाज घडवायचा तेच जर बिघडले असतील तर त्यांना सनदशीर मार्गांनी नीट केलेच पाहीजे. मी प्राध्यापक म्हणून रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ‘मी खाजगी शिकवण्या घेणार नाही’ असे वचन तत्कालीन प्राचार्यांनी माझ्याकडून घेतले होते.
३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही ‘ते’ वचन मी आजतागायत मोडले नाही. आज सेवेत असणार्या शिक्षक/प्राध्यापक यांनी खाजगी शिकवण्या घेण्यावर कायद्याने बंदी असताना त्या राजरोस चालतातच कशा ? याचा अर्थ त्यांचे अनेकांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असलेच पाहीजेत. शिरावर जोडीदार असताना बाहेर संबंध ठेवणे जितके अनैतिक आहे त्याहीपेक्षा सेवेतील शिक्षकांनी खाजगी शिकवण्या घेणे जास्त अनैतिक आहे. कारण पहिल्या प्रकारात फारतर एक कुटुंब उध्वस्त होईल परंतु दुसर्या प्रकारात अनेक पिढ्या बरबाद होतात. विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गास यावेत म्हणून चालणारे घाणेरडे उद्योग मी स्वत: पाहीले आहेत. दुर्दैवाने मी त्यावेळी काही करु शकलो नाही व आजही प्रतिक्रिया देण्यापलीकडे काही करु शकत नाही. पिडीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीच उठाव केला पाहीजे. करतील ना ?
सोमनाथ देविदास देशमाने ,
अहमदनगर-४१४००१
अंतिम सुधारित : 6/27/2020