महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. कोकण विभागात औद्योगिकीकरणाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. शासनाने 2016 मध्ये किरकोळ व्यापार धोरण जाहीर केले, यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. या धोरणात राज्याला अग्रेसर ठेवणे, गुंतवणूकीचा वेग वाढविणे, ग्रामीण भागातील तरुणांना सहभागी करून घेऊन किरकोळ व्यापार वाढविणे, जागतिकीकरणाला सामोरे जाण्यासाठी किरकोळ व्यापार अधिक बळकट करणे हही उद्दिष्ट्ये आहेत.
राज्यात सन 2015-16 मध्ये 30 हजार 580 कोटी रुपयाच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव आले. 0.3 लाख रोजगार निर्मितीसह 340 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. नोव्हेंबर 2016 पर्यंतची आकडेवारी पाहिली असता 28 हजार 615 कोटी रुपये गुंतवणूकीतून 0.2 लाख रोजगार निर्मितीचे 262 प्रकल्पांची नोंदणी झाली. 2361 कोटी रुपये गुंतवणूकीचे 22 प्रकल्प कार्यान्वित झाले. सर्वसाधारणपणे 1991 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत 8 हजार 664 विविध प्रकल्प राज्यात कार्यान्वित झाले. त्यामध्ये 2,69,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
कोकणातील विशेष आर्थिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहेत. मंजूर 32 पैकी 23 अधिसूचित झाली. त्यापैकी 6 कार्यान्वित झाली. यातून 1.65 लाख रोजगार प्राप्त झाला. 7366 कोटी रुपयाची कार्यान्वित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक झाली आहे. अजून प्रकल्प कार्यान्वित व्हायचे आहेत. त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. माहिती संकुले, जैव संकुले, मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून अनेक भागात उद्योगासोबतच अन्य विकास अपेक्षित आहे. कोकणात 14 नोंदणीकृत सहकारी औद्योगिक वसाहतीपैकी 9 कार्यान्वित आहेत. त्यामध्ये 602 उद्योग घटक कार्यान्वित आहेत. 1.01 कोटी रुपये भाग भांडवल त्यामध्ये लागले आहे. 9888 रोजगार यातून उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकणात 12306 उद्योग घटकांमधून 40842 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 4.01 लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लघु उद्योग, खादी ग्रामोद्योग मंडळ, विविध महामंडळे यातून कोकणात अनेक रोजगार उपलब्ध झाले आहेत.
ठाणे हा महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेला जिल्हा आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी हे औद्योगिकदृष्ट्या विकसित आणि शहरीकरण झालेले भाग आहेत. जिल्ह्यात १० एमआयडीसी, २ सहकारी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हे रसायनिक, ऑटोमोबाइल, औषधनिर्मिती, कृत्रिम धागेनिर्मिती, प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तू निर्मिती, खते, जंतूनाशके, रंग, खाद्य पदार्थ निर्मिती आदी आहेत.
ठाणे – बेलापूर – कल्याण हा औद्योगिक पट्टा अत्याधुनिक उद्योगांचा आहे. जिल्ह्याची औद्योगिक वाढ या पट्ट्यातच केंद्रीत झाली आहे. जिल्ह्याचे विभाजन तीन विभागांत करता येईल. पहिला विभाग जो थेट मुंबई महानगराच्या प्रभावाखाली आहे. हा भाग बहुतांश उपनगरासारखा आहे, तो म्हणजे ठाणे, कल्याण आणि उल्हागसनगर तालुक्याचा भाग. येथे अनेक आधुनिक आणि संघटित उद्योग केंद्रीत झाले आहेत. दुस-या भागात औद्योगिकदृष्ट्या विकसित होणा-या अंबरनाथ आणि भिवंडी या भागाचा समावेश होतो. तिस-या भागात उर्वरित विभागाचा समावेश होतो. त्यात काही ग्रामोद्योग, लहानसहान उद्योग आणि प्राथमिक कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण भौगोलिक भाग ९३४ हजार हेक्टरचा आहे. अर्थात राज्याचा ३.११ टक्के भाग या जिल्ह्याने व्यापला आहे. जिल्ह्यात ठाणे, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर असे सात तालुके आहेत.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहे. महाड, पाताळगंगा, ,खोपोली, रोहा, कर्जत, उसर, विले, तळोजा या भागात मोठे-हान उद्योग आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मिरजोळे, झांडगांव, खेर्डी, लोटे परशुराम, वालाणे, सडावली या भागात औद्योगिक केंद्र आहेत. लहान-मोठे उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि गुंतवणूक उपलब्ध झाली आहे. पालघर जिल्ह्यात वाडा, तलासरी, डहाणू, तारापूर या भागात औद्योगिक संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत. नव्याने काही मोठे उद्योग या क्षेत्रात उभे राहत आहेत.
एकूणच या सर्वांचा विचार करता कोकणातील उद्योग आता सर्व स्तरावर अग्रेसर असल्याचे चित्र दिसते आहे. शासनाच्या औद्योगिकीकरणाच्या धोरणामुळे उद्योगांना गती मिळत असून मोठ्या प्रमाणात शासन पातळीवरून सुविधा देखील उपलब्ध होत आहेत. हे विशेष म्हटले पाहिजे.
लेखक - डॉ.गणेश व.मुळे,
उपसंचालक (माहिती), कोकण विभाग, नवी मुंब
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 4/14/2020