डॉ. बाबासाहेब तमाम बहुजनांना संदेश देतात- 'देव, दैव यावर विसंबून राहू नका भविष्य, मुहूर्त,चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.'
तर स्वामी विवेकानंद देखील नेहमी म्हणायचे 'जो पर्यंत या देशातील तरुण नशिबावर अवलंबून रहाणार आहे तो पर्यंत भारतासारख्या देशाला मुळीच भवितव्य नाही.' क्रांतिसूर्य जोतीराव ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांपर्यंत व आगरकर ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत सर्वांनी 'नशिब' या संकल्पनेवर कडाडून हल्ला केलेला आहे. का बरं या लोकांनी नशीब या संकल्पनेवर हल्ला केला?
आपलं नेहमीचं एक वाक्य असतं ''नशिबात असतं तसं घडतं!''
तुमच्या माझ्या जीवनात कर्तुत्व केल्याशिवाय काही घडत नसेल तर खाटेवर पडून काही होणार नाहीच. काही मिळवायचे असेल तर आपल्याला त्यासाठी काम करावे लागेल, अपार मेहनत घ्यावी लागेल. आणि नेमक्या संधीचा नेमकेपणाने फायदा उठवावा लागेल, तेंव्हा काही बाबींमध्ये आपल्याला आपल्या जीवनात यश मिळेल हे जर आपल्याला माहित असेल तर 'नशिबात असतं तस घडतं' म्हणण्याला काय अर्थ आहे ? आणि जर आपलं नशीब आधीच ठरलेलं असेल तर कर्तुत्व केलं काय अथवा न केलं काय , तसंच घडायला हवं दुसर काही वेगळ घडायलाच नको !
त्यामुळे मित्रांनो, आपल्या आयुष्यात एक तर नशिबाला जागा असू शकते किंवा कर्तुत्वाला तरी जागा असू शकते ! दोन्हीही गोष्टींना एकत्रितपणे आपल्या जीवनामध्ये जागा असू शकत नाही ! पण आपली सर्वात मोठी अडचण ही आहे की, आपण दोन्ही दगडांवर पाय ठेऊन असतो. ना आपल्या कर्तुत्वावर आपला विश्वास असतो ना धड नशिबावर विश्वास असतो !
मित्रांनो आपण 'आपल्या नशिबात असतं तसं घडतं !' हे धोरण स्वीकारले की, लोकशाहीला काही जागा उरत नाही. कायदा व्यवस्थेला काही जागा उरत नाही. तुमच्या माझ्या कर्तुत्वालाही जागा उरत नाही. आपल्याला मग 'ठेविले अनंते तैसेची …. असं म्हणून झोपून रहावे लागेल ! पण यावर कोणीही विश्वास ठेवत नाही कारण आम्हांला एक सवय लागलेली आहे दोन दगडांवर पाय ठेवण्याची ! तळ्यात मळ्यात ! तळ्यात मळ्यात !
मित्रांनो, आपण असफल होत असू, तर त्याला काही कारणे आहेत - कदाचित संधी अनुकूल नसेल, प्रयत्न कमी पडत असतील ह्याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे आणि करणे समजून घेतली पाहिजेत.
मला एक छत्रपती शिवरायांच्या काळातील उदाहरण आपल्याला द्यावेसे वाटते . -''गड आला पण सिंह गेला. ''
ही कथा आपल्याला सर्वाना माहित आहे. - तानाजी मालुसरे आणि मावळे घोरपड लाऊन गडावर चढले - नंतर तुंबळ युद्ध झाले - युद्धामध्ये तानाजी मालुसरे पडले (मारले गेले) - तानाजी पडले तसे सर्व मावळे ज्या दोराने वर आले होते त्या दोराने खाली उतरू लागले - तानाजीचे भाऊ सूर्याजी याने एकच मोठे काम केले की जाऊन दोर कापले आणि मावळ्यांना म्हणाला -'अरे तुमचा बाप इकडे मरून पडलाय,आणि तुम्ही पळताय ! कड्याचे दोर मी कापून टाकलेत, आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे भेकडासारखे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शुरांसारखे लढा, जिवंत रहा, विजय संपादन करा ! उड्या टाकून मेलात तर नरकात जाल , लढताना मेलात तर स्वर्गात जाल ! जिवंत राहिलात, विजय संपादन केलात तर सुवासिनी तुम्हाला ओवाळतील !
मित्रांनो, स्वर्ग - नरक हा मुद्दा इथे सोडून द्या पण मूळ मुद्दा हा आहे की तुम्हाला परतायचे नाही, त्यामुळे एक तर उड्या टाकून मरा, नाहीतर शुरांसारखे लढा आणि जिवंत रहा...आणि अशा परिस्थितीत माणसे नेहमी शुरांसारखे लढण्याचाच मार्ग स्वीकारतात, आणि तोच मार्ग मावळ्यांनी स्वीकारला आणि गड जिंकला.
तुमच्या माझ्या जीवनामध्ये नशिबासारख्या काही भोंगळवादी संकल्पना रुजवल्या गेल्या आहेत. या संकल्पनांचे दोर पकडून आपण पलायनवाद स्वीकारतो आणि जीवानातून पळ काढतो. आज पासनं आपल्या जीवनातले नशिबाचे दोर कापून टाका!जीवनातल्या प्रसंगांना शर्थीने तोंड द्या ! कदाचित पराजित व्हाल , कदाचित विजयी व्हाल, जरी पराजित झालो तरी आपण पूर्ण ताकदीनिशी लढलो याचं समाधान घेऊन आपल्याला जगता येईल आणि पुन्हा नव्या उर्मीने लढण्याची जीद्द निर्माण होईल. त्यामुळे यापुढे कधीही नशिबाचे दोर पकडू नका ! नशिबाचे दोर कापून टाका !
संकलन - अनिल बाप्ते
अंतिम सुधारित : 4/25/2020