एकीकडे शहरी तसेच ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा धडाधड बंद पडत असताना, दुसरीकडे फार मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळा सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारला आणि मराठी माणसाला झाले आहे तरी काय ? आपण वेड्यासारखे इंग्रजीच्या पाठीमागे धाऊन भावी पिड्यांचे भविष्य का बरबाद करतो आहोत ? आपल्याच पाल्यांना आपण मायमराठी पासून कायमचे तोडतो आहोत, हे आमच्या लक्षात का येत नाही ? आधीच आम्ही आमच्या ’संस्कृत’ आजीला गमाऊन बसलो आहोत. आम्ही वेळीच डोळे नाही उघडले तर उद्या ’मायमराठी’लाही पोरके होऊन जाऊ. मायमराठी बोलीभाषा म्हणून अस्तित्वासाठी दीनवाणा प्रयत्न काही दिवस करील व निराश होऊन एक दिवस तिच्या संस्कृत मातेच्या भेटीला निघून जाईल. आपल्या दिवट्या नातवांनी स्वत:च्या मायमराठीला हाल अपेष्टा करुन हाकलून दिले हे पाहून संस्कृत आजीला वाईट वाटेलच परंतु, त्याही पेक्षा तिला अधिक वेदना तेंव्हा होतील जेंव्हा तिला कळेल की आपल्या नातवांनी पुतना मावशी ’इंग्रजी’च्या प्रेमात पडून तिची लाडकी लेक ’मराठी’ला हद्दपार केले आहे. संस्कृत आजी आम्हाला शाप वगैरे देईल की नाही हे सांगणे कठीण असले तरी भावी मराठी पिड्यांना आमचा अभिमान नक्कीच वाटणार नाही. कदाचित ते आमचा द्वेषच करतील. ज्यांचा आपल्या मातेवर विश्वास नाही त्यांना प्रेम मिळणार कुठून ? आई जिवंत असेपर्यंत आपल्याला तिची किंमत कळत नाही व ती निघून गेली की आपल्याला काही किंमत राहत नाही.
सोमनाथ देशमाने,
अहमदनगर,
९७६३६२१८५६
अंतिम सुधारित : 7/28/2020