অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काश्मीरी साहित्य

काश्मीरी साहित्य

प्राचीन काश्मीरी साहित्याचा सर्वांत जुना उपलब्ध पुरावा म्हणजे, शितिकंठाच्या महानयप्रकाश या संस्कृत ग्रंथातील चारचार चरणांची ९४ कडवी हा होय. महानयप्रकाशाचा रचनाकाळ सु. बारावे शतक (ग्रीअर्सनच्या मते पंधरावे शतक) मानला जातो. शैवदर्शन आणि तंत्र हा या काव्याचा विषय असून त्याचा आशय फक्त सांप्रदायिकांनाच सुगम आहे. प्रा.पुष्प यांना द्‌दुमा संप्रदाय नावाच्या ग्रंथातील ७४ काश्मीरी पद्यांची रचना उपलब्ध झाली असून ती भाषा व आशय ह्या बाबतींत महानयप्रकाशाच्या काळातील असावी.

बाराव्या-तेराव्या शतकापासून निर्माण होऊ लागलेल्या काश्मीरी साहित्याच्या ऐतिहासिक कालविभागणीबाबत विद्वानांत एकवाक्यता आढळत नाही. स्थूलमानाने पुढील कालखंडांनुसार काश्मीरी साहित्याचा ऐतिहासिक आढावा घेणे अधिक उपयुक्त ठरेल.

(१) आद्य कालखंड : ( १३०० ते १५००) कालदृष्टीने पाहता काश्मीरी साहित्याचा उदय लल-द्यदने ( १३३९ ते १४००)  घडवून आणला. आपल्या वाख्‌ (संस्कृत ‘वाक्य’) रचनेत तिने ‘त्रिक्‌’ नावाच्या शिवाद्वैैतवादी संप्रदायाची विचारसरणी व्यक्त केली. ओजस्वी भाषाशैली आणि अत्यंत साध्या, घरगुती, पण अर्थसघन प्रतिमा यांमुळे तिची काव्यवचने काश्मीरी साहित्यात आणि काश्मीरी जनतेच्या मनावर कायमची कोरली गेली. तिचा समकालीन शेख नूर-उद्‌-दीन नूरानी  ऊर्फ नुंदर्योश (१३७६ — १४३८) हा संतकवी ‘रेशी’ ह्या धार्मिक संप्रदायाचा प्रवर्तक होता. त्याची उपदेशपर काव्यवचने ‘श्रुख’ (संस्कृत श्र्लोक) ह्या नावाने ओळखली जातात. इस्लामी इतिहासातील निर्देश आणि तद्विषयक प्रतिमा यांचा वापर त्याने आपल्या काव्यात केला आहे. त्याने विशुद्ध `श्रुख' रचनेखेरीज इतरही काही नवीन काव्यप्रकार हाताळले तसेच आपल्या रचनेत फार्सी व अरबी शब्दांचाही प्राचुर्याने उपयोग केला. याचाच समकालीन बडशाह अर्थात सुलतान झैन-उल्‌-आबिदीन (१४२०-७०) याची कारकीर्द काश्मीरी साहित्याचा सुवर्णकाळ ठरली. या सुलतानाच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्याचा समृद्ध साहित्यातील बरेचसे साहित्य नंतरच्या राजकीय धामधुमीत कायमचे लुप्त झाले. तरीही या काळापासून काश्मीरी भाषेचा नाटकादी विविध साहित्यप्रकारांसाठी एक समर्थ भाषा म्हणून अनेक विद्वानांकडून आणि साहित्यिक वर्गाकडून वापर केला जाऊ लागला.

बोध भट्‌ट याचे झैन-विलास (झैन-उल्‌-आबिदीनवरील नाटक) वासिष्ठसोम याचे झैन चरित (बडशाहचे चरित्र), वासिष्ठ ब्रह्माचे श्रीवर याने केलेले काश्मीरी भाषांतर हे ग्रंथ आज तरी काश्मीरात कोठेही उपलब्ध नाहीत; ते नष्ट झाले असावेत. भट्टावताराचे बाणासुरवध (उषा-अनिरुद्धाची प्रेमकथा) हे काश्मीरी काव्य अलीकडेच पुणे येथाल भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ह्या संस्थेने शोधून काढले आहे. तथापि त्याचे तपशील अजून निश्चित व्हावयाचे आहेत. महाभारताच्या काश्मीरीतील भाषांतराचीही स्थिती याप्रमाणेच आहे. हे  भाषांतर काश्मीरी रिसर्च डिपार्टमेंटच्या ग्रंथालयात असून त्याचे शीर्षकपृष्ठच नेमके गहाळ झाल्यामुळे त्याचा भाषांतरकार कोण, हे कळावयास मार्ग नाही.

शेख नूर-उद्‌-दीन नूरानी या कवीच्या जीवनाबाबत आणि कर्तृत्वाबाबत पहिला `रेशीनामा ' बाबा नसिबुद्दीन याने सुलतानाच्या कारकीर्दीतच संकलित केला. त्यात बाबा बामु-द्दीन, श्याम बीबी आणि शेखचे इतर शिष्य यांची रचनाही अंतर्भूत असावी. या काळातील इतर अनेक काश्मीरी कवींची रचना मात्र नष्ट झाली. अकनन्दुन हे आध्यात्मिक स्वरूपाचे कथाकाव्य बहादुर गनी याने सुलतानाच्या मृत्यूनंतर लिहिले असावे. दुसरे सुखी जीवनावरील एक उपदेशपर काव्य म्हणजे सुखदुख चरितम्‌ हे असून ते गणक प्रशस्त नावाच्या कवीने लिहिल्याचे, पुणे येथील संशोधकांनी सिद्ध केले आहे. प्रस्तुत काव्य सुलतान हसन शाह याच्या काळात लिहिले गेले असावे, असे मानले जाते. सुलतान हसन शाह (? — १४८७) हा एकमेव काश्मीरी राजा असा आहे, की ज्याला काश्मीरी कला-साहित्याला आश्रय देण्यासाठी स्थैर्य व उसंत लाभली. अर्थातच या वेळेपर्यंत सर्वच विद्वानांवर फार्सी भाषा-साहित्याची विलक्षण मोहिनी पडली होती. फारच थोड्या काश्मीरी प्रतिभावंतांनी फार्सीऐवजी काश्मीरी भाषेचा वापर केलेला दिसतो. फार्सीच्या केवळ अनुकरणाच्या ह्या काळात गाझी चक हा सत्तेवर आला.

(२) मध्य कालखंड : (१५०१ ते १८००). चक वंशाच्या राजवटीत (१५६१– ८६) कमालीची राजकीय अस्थिरता असूनही, काश्मीरी साहित्याला राजाश्रय देण्याच्या बाबतीत ही राजवट मोठी उपकारक ठरली. गूढवादी परंपरा सोडून देऊन या काळातील काव्य लौकिक विषयांकडे जसे वळलेले दिसते, तसेच  ते तत्त्वज्ञानाकडून कलात्मकतेकडेही वळलेले दिसते. हब्बा खातून  सु.(१६५० — १७०७) हिच्या भावगीतांत ह्या गुणांचा परमोत्कर्ष झाला आहे. हब्बा खातूनसोबतच्या माला सलमाँ, निकी बट्ट  आणि फरास्ता हार ह्या दरबारी कवयत्री प्रसिद्ध आहेत. हब्बा खातूनने काश्मीरी साहित्याला राजदरबारात प्रतिष्ठा मिळवून दिली. तिने काश्मीरी `वचुन' (तीन चरणांनंतर चौथ्या चरणात ध्रुवपद असलेली काश्मीरी रचना) लिहिले. तिने काश्मीरमधील स्थानिक संगीत आणि फार्सी संगीत यांचा सुसंवादी मेळ घातला आणि त्यातून वचुनमध्ये आपले मकाम-ए-रास्त हे अभिनव प्रकारचे काव्य लिहिले. तिचे वचुन सर्वच प्रकारच्या काश्मीरी गीतांसाठी एक चिरंतन स्वरूपाचा नमुना बनले. वचुनमध्ये लिहिलेल्या काश्मीरीतील गीतप्रकारांत `रोव्ह' (सण-उत्सवप्रसंगीचे गीत), `लीला' (भक्तिगीत) आणि `चरति-काव्य' (उदारित परमानंदाच्या ‘सो दामचर्यथ’सारखी दीर्घ कथाकाव्ये) यांचा अंतर्भाव होतो. हब्बा खातूननंतरच्या काळात परकीय राज्यकर्त्यानी मोगल, पठाण आणि शीख काश्मीरीचा सर्वस्वी त्याग केला आणि त्यामुळे काश्मीरमधील स्थानिक लोकांच्या कलात्मक सर्जनशीलतेस वाव मिळाला नाही. तरीही तेथे राष्ट्रीयत्वाची भावना हब्बा खातूनच्या देशभक्तिपर आणि कारुण्यपूर्ण भावगीतांद्वारे टिकून होती. हबीब-उल्लाह-नौशहरी (१६१७) आणि साहिब कौल (१६४२) हे सतराव्या शतकातील आध्यात्मिक प्रकारच्या काश्मीरी काव्याचे दोन प्रमुख प्रतिनिधी असून ते दोघेही लोकप्रिय होते. मिर्झा अकमल-उद्‌-दीन हा बहरुल्‌ इर्फान ह्या साठ हजारावर ओळींच्या फार्सी बृहद्ग्रंथाचा कर्ता असून सूफीवादी संप्रदायाच्या आचारविचारांविषयी त्याने हे काव्य लिहिले आहेत. त्यानेच काही सांप्रदायिक गूढ पदे काश्मीरीतही लिहिली आहेत.गूढ भावानुभवांचा आविष्कार रुप भवानीच्यां (१६२५ — १७२१) काव्यात आढळतो. संप्रदायविशिष्ट वाख्‌ ह्या प्रकारात रचना करणारी रूप भवानी ही अखेरची कवयित्री होय. अरणिमाल (अठरावे शतक) हिच्या पूर्वी शाह कलंदर (अठरावे शतक) शाह गफूर (अठरावे शतक) वगैरेंसारख्या सर्वच ख्यातनाम कवींनी आपल्या गीतांद्वारे गुलामीत खितपत पडलेल्या काश्मीरचे सांत्वन केले. त्यातील बहुतांश गीते फार्सीकाश्मीरी मिश्रित भाषेत आढळतात. अरणिमाल ही सुंदर पण दुर्दैवी अशी कवयित्री होती. तिने भावगीतांतून आपल्या करुण अनुभवांना वाचा फोडली. तिचे काव्य हब्बा खातूनच्या तोडीचे मानले जाते.

(३) आधुनिक कालखंडः (१८०१ ते १९४७) अठराव्या शतकाचा उत्तरार्ध हा राजकीय द्दष्टया काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत अधःकारमय असा कालखंड होता. कारण यावेळी अफगाणांची जुलमी राजवट काश्मीरवर होती. सुजलांसुफलां काश्मीरमध्ये यावेळी दुष्काळ, दुर्भिक्ष्य, पूर आणि रोगराई यांचे थैमान सुरू होते. मोगल राजवटीच्या ऱ्हासाच्या काळात सुरू झालेली नासधूस व विध्वंस अफगाणानंतरच्या शीख राजवटीने (१८१९ - ४६) पूर्ण केला. परिणामतः ह्या काळातील कवी, मानवाची असहायता आणि त्याने केवळ दैवावर टाकलेला हवाला अथवा मनःशांती मनोधैर्य आणि ईश्वरावरील अचल श्रध्दा, यांकडे वारंवार वळताना दिसतात. सूफियाना कलाम हया नावाने ओळखल्या जाणाऱ्या अज्ञात कवींच्या संकलनातील अनेक कडव्यात इहलोकापासून निवृत्त होऊन दैवाला शरण जावे, असा हताश सूर अनेक वेळा उमटलेला आढळतो. त्याचप्रमाणे काही अज्ञात कवींनी रचिलेल्या अनेक अंत्यसंस्कारगीतांत इमाम हुसेन याच्या बलिदानाबाबत इस्लामी अनुयायांनी दुखवटा पाळण्याबाबतचा उपदेश आढळतो. एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धात काश्मीर गुलामगिरीच्या व अधःपतनाच्या परमावस्थेस पोहोचला होता ; तथापि ह्याच काळात अनेक नवे साहित्य प्रकारही निर्माण झाले आणि त्यांचा हळूहळू विकासही होऊ लागला होता. परकीय सत्तेच्या प्रभावाविरुेेद्धची जणू काही एक सामुहिक प्रतिक्रियाच अप्रगपणे काश्मीरला त्याच्या दीर्घकालीन निद्रेतून जाग्रुत करीत होती.

कासिम गनी याने ` रंग ' (चार सयमक ओळींचे कडवे), तर नुंदी डार याने `‘’ डोल्कि-शार ' (सात ओळींचे कडवे व ध्रुवपद) हे नवे काव्यप्रकार काश्मीरीत आणले. यांव्यतिरिक्त मोमिन साहिब आणि स्वछक्राल यांनी सांप्रदायिक गूढगीतांत नवे चैतन्य आणले आणि महमूद गामीने, तर सर्वच काव्यप्रकारांत परिवर्तन घडवून आणले. अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील काश्मीरी साहित्याच्या समृद्धीची मुहूर्तमेढ या काळात रोविली गेली.

महमूद गामीने (१८५५) आठ कल्पनारम्य प्रेमकाव्ये फार्सीतून काश्मीरीत भाषांतरित केली. वलीउल्लाह मत्तू आणि झरीफ खान या दोघांनी संयुक्त रीत्या ` हीमाल नागराय ' ही स्थानिक प्रणयकथा काव्यबद्ध करून, काश्मीरी लोकांत त्यांचा उज्ज्वल भूतकाल जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण केले. प्रकाशराम आणि मौलवी सिद्दीक-उल्ला यांनी `रझ्मिया - मस्नवी ' चे ; युध्दावरील खंडकाव्य भाषांतर करण्याचा पायंडा पाडून, अनुक्रमे रामायण आणि सिकंदरनामा ही खंडकाव्ये काश्मीरीत भाषांतरित केली. त्यांनी प्रवर्तित केलेला हा काव्यप्रकार अव्याहतपणे सु,ऐंशी वर्षे, म्हणजे गुलाम मुहंमद हनफी (  — १९३७)  याचा किस्सा-ए-अमीर-इ-हमझा हा ग्रंथ दहा खंडात भाषांतरित होईपर्यंत चालू होता. स्वतःची वैशिष्ट‌्यपूर्ण शैली असलेल्या अनेक कवींची एक प्रभावळच ह्या काळात निर्माण झाली. ह्या प्रभावळीतील रसूल मीर  (— १८७०) याचे गझल,मक्बूल क्रलवारी (— १८७६) याची कल्पनारम्य काव्ये व उपरोध आणि परमानंद (— १८७९) याची हिंदू गूढवादी काव्ये विशेष उल्लेखनीय आहेत.परमानंदाने रादा स्वयंवर, शे`वलगन व सो' दामचर्यथ ही दर्जेदार काव्ये लिहिली. हाजिन येथील वह्‌हाब परे (— १९१४) याने एकोणिसाव्या शतकात काश्मीरी लोकांना परिचित असलेल्या जवळजवळ सर्वच फार्सी साहित्यप्रकारांत आणि फार्सी काव्यविषयांवर साहित्यनिर्मिती केली. रहीम साहिब ; (१८६० — )याने गूढगीतांमध्ये नवीन शैली प्रस्थापित केली. ह्या नव्या शैलीतील गूढगीतांचे प्रामाणिक अनुकरण तसेच त्यांचा क्वचितप्रसंगी विस्तारही नेमा साहिब (? — १८८०), रहमान डार (— १९००) व शम्स फकीर (— १९०४) यांनी केला. शम्स फकीर ह्या संतकवीच्या काव्यात पारंपरिक सूफी पंथाचा आणि शैव मतातील अव्दैतवादाचा सहजसुंदर समन्वय झालेला आढळतो. वह्‌हाब खर (? — १९१२) आणि हाजिन येथील असद परे ( — १९२०) ह्या `दोन कवींजवळच शम्स फकीरसारखी गूढवादी दृष्टी असल्याचे दिसते. अहमद बटवरी (— १९२०) आणि श्रीकृष्ण राझदान (? — १९२५) हे विसाव्या शतकातील इराणी (फार्सी) व रामभक्ती संप्रदायातील गूढवादी परंपरेचे शेवटचे दोन प्रतिनिधी म्हणता येतील. अहमद बटवरी यांची नै आणि इंद्राढून दरबार ही दाने रूपकात्मक गीते प्राचीन अकनन्दुनप्रमाणेच अत्यंत लोकप्रिय झाली. प्राचीन अकनन्दुनला बहादून गनीनंतर रमझान बट्ट ( —१९१८), समद मीर (— १९५७) व अहद झरगर (१९०८— ) ह्यांनी विविध प्रकारे काव्यरुप दिले. हया गूढवादी कवींव्यतिरिक्त बिजबिहारा येथील नाझिम ( — १८६५) आणि क्रेरी येथील सना-दुल्ला ( — १८७५) ह्या कवींनी मुख्यत्वे `ना' (प्रेषित मुहंमद पैगंबरांवरील स्तुतिकाव्य) ह्या काव्यप्रकारावर लक्ष केंद्रित करून आपली रचना केली. ना' त रचनाप्रकाराचा परमोत्कर्ष अब्दुल अहम नादिम (— १९११) ह्या कवीच्या काव्यात आढळतो. या काव्यप्रवाहाशीच समांतर असा गूढवादी पंडित कवींच्या रचनेचाही एक प्रवाह काश्मीरीत आढळतो. वैचारिक दृष्टया ह्या गूढवादी पंडित कवींत दोन पंथ आहेत : (१) रामभक्तीचा पंथ : प्रकाश कौल (—१८८५) हे या पंथाचे अनुयायी आणि (२) कृष्णभक्तीचा पंथः यात साहिब कौल, लछमन कौल ( — १८८४), परमानंद आणि काही अंशी श्रीकृष्ण राझदान या अनुयायांचा अंतर्भाव होतो. एकोणिसाव्या शतकात काश्मीरी भाषेच्या पद्धतशीर अभ्यासास जे.एच्‌. नोल्झ, ए. स्टाईन, ई.कून, के.एफ्‌. बर्कहार्ड, अलेक्झांडर कनिंगहॅम, जॉर्ज ग्रीअर्सन ह्या परकीय विद्वानांनी तसेच तेथील प्राच्यविद्याविशारदांनी सुरुवात केली. त्यांतील जॉर्ज ग्रीअर्सन याचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. विशेषतः त्याचे द मॅन्यूअर ऑफ द काश्मीरी लॅगवेज  (१९११) आणि लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या मालेतील संबंधित खंड (खंड आठवा — १९११) विशेष महत्त्वाचे होत.

काश्मीरी गद्याचा छापील स्वरूपातील आद्य नमुना म्हणजे सेरामपूर (श्रीरामपूर) येथील ख्रिस्ती मिशनेने १८२१ मध्ये नव्या कराराचे काश्मीरी भाषेत व शारदा लिपीत प्रसिद्ध केलेले भाषांतर हा होय. यानंतर ` द ब्रिटिश ऍंड फॉरिन बायबल सोसायटी' ने नस्तालीक प्रकारच्या उर्दू लिपीत प्रथम १८८४ मध्ये नव्या कराराचे आणि नंतर १८९४ मध्ये नवा व जुना अशा दोन्हीही करारांचे काश्मीरी भाषांतर प्रसिद्ध केले. १८९६ मध्ये ए.स्टाइन याने हातिमच्या कथा संकलित केल्या आणि १८८५ मध्ये जे.एच. नोल्झ याने काश्मीरी भाषेतील म्हणींचा व वाक्यप्रचारांचा कोश; डिक्शनरी ऑफ काश्मीरी प्रॉव्हर्ब्ज अ‍ॅड सेइंग्ज तयार केला. ख्रिस्ती मिशन-यांच्या ह्या कार्यातून काश्मीरमधील काही स्थानिक धर्मोपदेशकांनीही स्फूर्ती घेऊन ग्रंथनिर्मिती केली. त्यात मीर वैझ याह्या शाह याचे कुराणाच्या तिसाव्या भागावरील भाष्य, इस्लामी न्यायशास्त्रावरील ग्रंथाचे काश्मीरी भाषांतर व कारी नूर-उद्‌-दीन याचा मसा ' इल हा इस्लामी धर्मशास्त्रावरील ग्रंथ यांचा अंतर्भाव होतो. हे ग्रंथ काश्मीरीतील वैचारिक स्वरुपाच्या गद्याचे सुरुवातीचे नमुने होत. पंडित राम जू धर याचे यूक्लीडच्या भूमितीच्या पहिल्या भागाचे काश्मीरीमध्ये भाषांतर आणि ईश्वर कौल याचा काश्मीरशब्दामृत (संस्कृतमध्ये काश्मीरी व्याकरण)  हे दोन ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे होत.

काश्मीरीतील जवळजवळ सर्वच प्रख्यात कवींनी अन्य भाषांतील दर्जेदार साहित्याचा काश्मीरीत स्वैरानुवाद करून आपला वाटा उचलला. इतर भाषांतील काही ग्रंथांचे तर दोन दोन अनुवादही काश्मीरीत झाले. एकाच ग्रंथाची तीन तीन भाषांतरे होणे, हा प्रकारही काश्मीरीत नवीन नाही. सोपोर येथील नेमा साहिब (?-१९६३) आणि नीलकंठ शर्मा (१८८८- १९७१) यांनी अनुक्रमे गुल-ए-बकावली आणि रामायण यांची नव्याने भाषांतरे करून ती प्रसिद्ध केली. हाजी मोही-उद्‌-दीन मिस्किन (?-१९३१) आणि हक्कानी (१९१४) यांनी अनेक कल्पनारम्य प्रेमकाव्ये आणि हाजिन येथील वह्‌हाब परे याने महाकाव्यांची उत्कृष्ट भाषांतरे केली. बह्‌हाब याच्या सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची पद्यसंख्या तीस हजारांवर आहे. यांशिवाय त्याचा सर्वोत्कृष्ट ` दीवान ' (काव्यसंग्रह) ही असून , त्यात ७८१ उत्कृष्ट काव्ये आहेत. त्यात तीस प्रकारची अंत्ययमक (रदीफ)  साधलेली असून त्यांत काश्मीरी  वर्णमालेतील सर्वच वर्णांचा समावेश आहे. इतर भाषांतून भाषांतरित-अनुवादित केलेले आणि १९४७ पूर्वीच छापून प्रसिद्ध झालेले दीडशेहून अधिक ग्रंथ काश्मीरीत आहेत.

अन्य भाषांतील ग्रंथांच्या भाषांतरांव्दारे काश्मीरी साहित्य समृद्ध करण्याची प्राचीन परंपरा १९४७ नंतरही चालूच राहिली. सुरुवातीच्या अशा व्यक्तिगत प्रयत्नांत भगवद्गीतेचे नीलकंठ शर्मा यांनी केलेले पद्यमय भाषांतर, टागोरांच्या चोखेर बालीचे ; कादंबरी प्रा.पुष्प यांनी केलेले (अछ्‌यकिटुर) भाषांतर आणि अ‍ॅरिस्टॉटलच्या पोएटिक्सचे गुलाम नबी खयाल यांनी केलेले गद्य भाषांतर यांचा उल्लेख अवश्यक करावा लागेल. यानंतर दीनानाथ नादिम, सोमनाथ साधू आणि मोहन निराश यांनी अनुक्रमे टागोरांची गतांजलि, सर्‌व्हॅटीझचे डॉन किक्झोट आणि गांधीजींचे आत्मचरित्र यांतील महत्वपूर्ण भागांची भाषांतरे केली. दिल्लीची ` साहित्य अकादेमी ' तसेच ` कल्चरल अकादेमी ऑफ जम्मू अ‍ॅड काश्मीर ' हया संस्थांनी तर अधिकृत भाषांतरे करुन घेण्यासाठी तज्ञांचे एक मंडळच नियुक्त केले असून त्यामुळे भारतीय तसेच परकीय भाषांतील अनेक अभिजात ग्रंथांची भाषांतरे काश्मीरीत झाली आहेत. लल्ल-वाख्‌ आणि काही काश्मीरी कथा यांची इंग्रजीत तसेच महजूरची काही गीते बंगालीत भाषांतरित झाली आहेत.

अझीझ-उल्ला हक्कानी हया कवीच्या नंतर काश्मीरी साहित्याला नवे वळण लागून त्यात नवे साहित्यप्रकार आणि नवे विषय प्रविष्ट झाले. सुरुवातीस प्रामुख्याने उर्दू काव्यातून आणि नंतर इतर परकीय भाषांतून हे साहित्यप्रकार व विषय काश्मीरीत आणले गेले. यांतील फारच थोडया प्रयत्नांत शब्दकळा व शैली यांबाबत फार्सीचे अनुकरण टाळलेले दिसते अथवा विशुद्ध काश्मीरीत रचना केलेली दिसते. गुलाम अहमद महजूर आणि अब्दुल अहद आझाद (१९०३-४८) यांनी मात्र हया काळातील साहित्याची निकड लक्षात घेउन शब्दकळा आणि अभिव्यक्ती या दोहांतही सुधारण घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. वैचारिक दृष्टया महजूर हा अधिक अभिजात आणि आझाद अधिक पुरोगामी असला, तरी या दोघांच्याही काव्यात माधुर्य व कारुण्य हे गुण असून त्यांचे काव्य एकदम हृदयाला जाउन भिडते. ह्या दोघांनीही आपल्या काव्यात अत्यंत मोजक्या व निवडक शब्दांत व्यापक आशय व्यक्त केला आहे. महजूरने काश्मीर व काश्मीरीसाठी अनुक्रमे ` बाग ' व ` बुलबुल' ही प्रतीके वापरली असून, देशभक्तीचे ओजस्वी वातावरण काश्मीरमध्ये निर्माण केले. आझादने दलितांच्या भावनेला मूलतः आवाहन केले आणि त्यांना निरंकुश जुलमी सरकार, पिळवणूक करणारे आणि प्रचलित काव्यबाह्य मूल्ये यांविरुद्ध बंडास उपयुक्त केले. स्वातंत्र्य आंदोलनामुळे हया दोघाही कवींना १९४७ पर्यंत आपल्या काव्यास अनुकूल व उत्कृष्ट पार्श्वभूमी उपलब्ध झाली, हा एक योगायोगच म्हणावा लागेल. ह्या काळातच लोकांत सुधारणेची सामूहिक जाणीवही निर्माण झाली. त्यामुळे राजकीय असमाधान आणि आर्थिक गोंधळ काश्मीरमध्ये असूनही,साहित्यिक चळवळीला मात्र वेगळेच नवे रुप प्राप्त झाले आणि त्याला महजूरने आपल्या अखेरच्या काळात चांगली वाचा फोडली.

(4) स्वातंत्र्योत्तर कालखंड : (१९४७) नंतर. १६८५ नंतर १९४७ मध्ये स्थानिक सरकारचा काश्मीरी भाषा-साहित्यास आश्रय लाभला. काश्मीरमधील सरकारी शिक्षणखाते तसेच आकाशवाणी आणि प्रसिध्दी खाते यांनी १९४७ मध्ये काश्मीरीचा आपल्या उदि्‌दष्टपूर्तीसाठी प्रभावी साधन म्हणून स्वीकार केला. सुशिक्षित वर्ग साहित्य संस्थांच्या रुपाने संघटित होऊ लागला. अशा संस्थांत ` कल्चरल कॉंग्रेस ' ही महत्वपूर्ण संस्था असून, प्रगतिशील लेखकांचे तिच्यावर वर्चस्व होते. `बझ्म-ए-अदब' हया श्रीनगर व दिल्ली येथील संस्थांवर मवाळ विचारसरणीच्या परंपरावाद्यांचे वर्चस्व होते. हया तीन साहित्यसंस्थांनी आपली तीन नियतकालिक मुखपत्रे सुरु केली. कांग पोश (१९४९-५३) ,गुलरेझ (१९५०-५४)  आणि पॉम्पोश (१९५३), ही ती मुखपत्रे असून त्यांनी नव्या लेखकांच्या साहित्यनिर्मितीस मौलिक स्वरुपाची मदत केली. यानंतर शीराझा आणि सौन अदब ही नियतकालिके `कल्चरल अकादेमी ' ने सुरु केली. श्रीनगरच्या कोशुर अदबने आणि सौन अदबने काश्मीरी साहित्यातील आधुनिक प्रवाहांना, विशेषतः टीकात्मक व ललित स्वरुपाच्या गद्याला , हातभार लावला. प्रताप हे काश्मीरी साहित्य प्रकाशित करणारे सर्वात जुने मासिक होते. त्यात १९३६ पासूनच काश्मीरी तरुण व सुशिक्षित वर्गाच्या आशा-आकांक्षांनुरुप साहित्य प्रसिद्ध होत होते.

काश्मीरी गद्यलेखक १९४७ नंतर आपल्या लेखनातील लय, चढउतार, विरामचिन्हे इत्यादींबाबत विविध प्रयोग करु लागले. गद्यातील प्रयोगशीलतेची सुरुवात हाजिनींच्या ग्रीस-सुंद गरह हया नाटयकृतीपासून झाली आणि नंतर अख्तर व कामिल यांच्या परिणत कथा- कादंबऱ्यांत तिचा विकास झाला. यानंतर सूफी गुलाम मुहंमद, बन्सी निर्दोष, शंकर रैना, नूर शाह आणि अनेक वर्तमानकालीन लेखक यांनी तिचे अनुकरण करुन दर्जेदार गद्य लिहिले. कादंबरी, ललित गद्यलेखन आणि साहित्यसमीक्षा या क्षेत्रांतील सध्याचे काश्मीरी साहित्य हे प्रयोगाच्या व विकासाच्या आरंभीच्या अवस्थेतून जात आहे हे खरेच ; तथापि त्यांतील नवीन प्रवाहांचा व प्रेरणांचा स्वीकार व सात्मीकरण यांची गती पाहू जाता, काश्मीरी गद्यास निश्चितपणे उज्ज्वल भवितव्य आहे, असे म्हणणे चूक ठरणार नाही.

स्वातंत्र्योत्तर काश्मीरी काव्यात निर्यमक, मुक्तच्छंदात्मक, सुनीत आदी रचनांचे यशस्वी प्रयोग कवींच्या नव्या व जुन्या अशा दोन्हीही गटांकडून होत आहेत. कवींच्या हया दोन्हीही गटांत अटीतटीची स्पर्धाही आहे. त्यातील नादिम, राही, रौशन, फिराक हे कट्टर पुरोगामी तर आरिफ, झिंदा कौल, नवाझ, फानी इ. परंपरावादी होत. हया नव्या जुन्या गटांतील स्पर्धा अखेरीस तात्कालिक स्वरुपाची ठरुन १९५३ मध्ये हया दोन्हीही गटांतील कवींनी परस्परांच्या दृष्टीकोनांचा स्वीकार केला. परिणामी नव्या-जुन्यांचा समन्वय होउन काश्मीरी गद्य-पद्य साहित्य वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनले. साहित्यातील गुणवत्ता व कलात्मकता यांबाबत अख्तर मोही-उद्दीन (१९२८-), मास्टरजी  ऊर्फ झिंदा कोल (१८८४-१९६६) अब्दुर्‌-रहमान राही (१९२५), कामिल,ए.के.टाक व प्रा.हाजिनी यांना साहित्य अकादेमीने पारितोषिके देउन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे. काश्मीरच्या कल्चरल अकादेमीनेही प्रा.हाजिनी, मुझफर आझिम, ए.के.रहबर आणि ए.के.टाक यांना त्यांच्या साहित्यसेवेबाबत पारितोषिके दिली आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात विविध विषयांवर आणि विशिष्ट काव्यप्रकारांत वैशिष्टयपूर्णता असलेल्या साहित्यिकांची पृथगात्मकता सिद्ध झाली. जी.आर्‌. नाझकी (१९०९ -) यांचा `कित्ता 'त' (चार ओळींचे कडवे असलेली रचना) ; मिर्झा आरिफ (१९१० -), एम्‌.डी. नवाझ (१९२६-) व जी.आर्‌.आझाद (१९१५ -) यांचा ` रुबाई ' व ` दुबैती ' (दोन ओळींचे कडवे असलेला काव्यप्रकार)  संतोष यांचा `खोलखत ' (हासकरेखा) ; रोशन (१९१९ -) यांचा 'लडीशाह ' (विनोदी उपहास काव्य) आणि खिझर मग्निबी (१९२१ -) यांचा `हझल' (उपरोधी-व्यक्तिविडंबन)  हया काव्य प्रकारात हातखंडा आहे. मुझफर आझिम (१९३४ -) यांचा विशेष, सफाईदार गझल लिहिणे हा होय. कामिल आणि राही यांनी सर्वच काव्यप्रकार यशस्वीपणे व प्रभावीपणे हाताळले आहेत. आरिज (?-१९६६), तनहा (?-१९६८), वली (१८९४ -), रसा (१९०१ -), फाझील (१९१४ -) , सा`इर (१९१५ -), नाझ (१९२६ -),अलमस्त (१९१० -)  आणि अंबारदार (१९१५ -) हे कवी  मूलतः जरी परंपरावादी असले, तरी 1947 नंतर मात्र त्यांच्या काव्याने विषय आणि आशय या दोन्हीही बाबतींत आधुनिक रुप घेतले. अशा प्रकारे हा कवींचा वर्ग भूतकालीन उज्ज्वलतेवर आणि भविष्यकालीन मानवतावादावर नितांत विश्वास असलेला आणि त्याची अपेक्षा बाळगणारा एक पृथगात्म समूह बनला. या कविवर्गाच्या विरोधात फिराक, खयाल, मुश्ताक, टाक, चमन, मजबूर, प्रेमी, दिलशाद, महव, रेह, रशीद नाझकी, कंवल, मख्मूर, ताउस बनिहाली, सज्द आणि अहसन यांच्या साहित्यातील देशपे्रम, भाषेची शुद्धता, हेतूचा  प्र्रामाणिकपणा आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, मानवी भावभावनांचा आणि आशा-आकांक्षांचा नीटस आविष्कार यांचे नव्या पिढीने उत्स्फूर्त स्वागत केले. प्रामुख्याने ह्या कविवर्गाच्या प्रयत्नामुळेच दीर्घकालीन प्रतिष्ठा असलेल्या परंपरावादी लेखकांच्या १९४७ पूर्वीच्या साहित्यातील पाल्हाळ, अतिशयोक्ती आणि कालबाह्य जुने तंत्र त्याज्य ठरले. १९४७ पूर्वीच्या ह्या प्रतिष्ठित परंपरावादी लेखकांत फित्रत, गमगीन,झरगर इत्यादींचा अंतर्भाव होतो. काश्मीरी साहित्यातील वर्तमान प्रवाह म्हणजे गद्यातील व पद्यातील भाषेच्या काटेकोरपणावर व रचनेच्या शुद्धतेवर विशेष भर देणे हा होय. असे असले तरी समाजातील समानतेबाबतची आणि आंतरराष्ट्रीय संबंधांतील मानवतावादी दृष्टिकोनाची कणवयुक्त आकांक्षा ह्या गोंधळलेल्या तरुण कवींच्या काव्याचा मूलाधार होय.काश्मीरी कवी आणि ललित लेखक यांच्या भोवतालचा सामाजिक, नैतिक आणि राजकीय अस्थिर परिसर त्यांना लौकिक जगाबाबत आणि आध्यात्मिक प्रकाशाबाबतही कधीकधी सर्वस्वी अलिप्ततेची भूमिका घ्यावयास लावताना आढळतो आणि म्हणूनच राही, नादिम, हामिदी आणि कामिल हे कधीकधी रूपक काव्याकडे वळतात. ह्या रूपक काव्यातील अर्थ सुभाषितवजा व द्रष्टेपणाचा द्योतक ठरतो. विशेषतः हे कवी जेव्हा आधुनिक विज्ञानातिल अथवा तत्वज्ञानातील विषय आपल्या निर्यमक कवितेत मांडतात तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.

महत्वाचे साहित्यप्रकारः काश्मीरी साहित्याच्या ऐतिहासिक आढाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यातील काही महत्वाच्या साहित्यप्रकारांचा विकास थोडक्यात पाहणे उद्बोधक ठरले.

काव्यः कुरीगाम येथील प्रकाश कौल याने १७५४मध्ये व नीलकंठ शर्मा याने १९३० ते १९४० च्या दरम्यान काश्मीरीत रामायण रचले. तसेच हाजिन येथील मौलवी सिद्दीक-उल्ला याने निजामीच्या सिकंदरनामा ह्या अभिजात फार्सी काव्याचा संक्षिप्त काश्मीरी अनुवाद केला.इस्लामाबादच्या हमीदुल्ला या कवीच्या अकबरनामा  (इंग्रज-अफगाण  युद्धावरील काव्य) ह्या फार्सी काव्याचा स्वैर अनुवाद हाजिन येथील वह्‌हाब परे या थोर महाकघीने आपल्या  तरुणपणीच केला. नंतर त्याने फिरसौदीच्या शहनामा आणि खिलाफतनामा हया फार्सी काव्यांचे काश्मीरी अनुवादही केले. अमीर शाह क्रेरी (?-१९०५) आणि लछमन कौल -`बुलबुल' (?-१८७८) यांनी खाजूच्या मसमनामाचे काश्मीरीत अनुवाद केले. अमीर शह क्रेरीने खावरनामा हे हजरत अलीच्या पराक्रमावर स्वतंत्र काव्यही लिहिले. सैयद मुजफर शाहचे (?-१९३५) मुख्यातरनामा हे देखील एक बृहत्‌ काश्मीरी महाकाव्य असून त्यात इस्लामी इतिहासातील मुख्यातरची अतुलनीय शौर्यगाथा वर्णिली आहे. काश्मीरीत अनेक प्रकारची रझ्मियाकाव्ये (युद्धकाव्ये) असून, त्यांत इस्लामचा सुरुवातीचा इतिहास आला आहे. गुलाम मुहंमद हनफीपर्यंत रझ्मिया काव्याची परंपरा चालू होती. हनफीने अल्लामा फैजीच्या मूळ फार्सी काव्यावरुन आपले किस्सा-ए-अमीरी हमझा हे रझ्मियाप्रकारातील काव्य फार्सीप्रचुर काश्मीरीत लिहिले.

इस्लामच्या प्रसारार्थ अरबांनी केलेल्या यशस्वी मोहिमांची वर्णने काश्मीरी महाकाव्यांत आणि कल्पनारम्य कथाकाव्यांत आढळतात. त्यांवर फार्सीचा सर्वांगीण प्रभाव दिसून येतो. त्यांत शिलेदारी युगाचे आदर्श चित्रण आढळते.  काश्मीरी काव्य हे भावगीतांनी विशेष समृद्ध आहे.फार्सी काव्याच्या प्रभावाने त्यांत भावनात्मकता, कल्पनासौंदर्य, उदात्त विचार वगैरे विशेष समृद्ध झाले. ` लोल भावगीते ' हया नावाचा काश्मीरीत एक भावगीतांचा प्रकार आहे. `लोल भावगीते ' ही संज्ञा प्र्रा.जे.एल्‌. कौल यांनी वापरली आहे. हया भावगीतांना काश्मीरमध्ये दीर्घ परंपरा आहे. ही भावगीते क्वचित सहा ते दहा ओळींहून अधिक लांब असतात. साधारणतः ओळींची ही मर्यादा आणि एकात्म भावनात्मक आशय ही त्यांची वैशिष्टये होत. हब्बा खातूनने आपला वचुन ला वेगळा भावगीतप्रकार प्रसृत केला. त्यात ओळींच्या प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद (ओजे) येते. हळूहळू छकरी, रोव्ह आणि लीला ह्या प्रकारांतील सर्वच भावगीतांनी वचुनरचनेचा अंगीकार केला. ही विविध प्रकारांतील भावगीते सूफियाना कलाम (गूढकाव्य) गाणाऱ्या धंदेवाईक गायकांनी जतन केली. काश्मीरमध्ये भावगीत हे संगीताचेच एक अंग असून त्यात विशिष्ट अंतरावर यमक योजना आहे. प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद येते. त्यातील अनुप्रास व नादलय स्वाभाविक असते.

हब्बा खातून आणि अरणिमाल यांसारख्यांच्या प्राचीन भावगीतांतून भावनेची ऋजुता, साध्णेपणा आणि उत्कटता हे गुण दिसतात. नंतरच्या भावगीतांत मात्र अनुकरण व तदानुषंगिकि बाह्य सफाईदारपणाच तेवढा आढळतो. महमूद गामीनंतरच्या सर्वच भावकवींत स्पष्टपणे दोन गट दिसून येतात. रसूल मीर, मक्बूल शाह, श्रीकृष्ण राझदान आणि महजूर हे भावगीतकार लौकिक पातळीवरील प्रीतीची गीते गातात; तर नेमा साहिब, स्वछक्राल (?-सु.१८६१) आणि अझीझ दरविश हे आत्म्याची आध्यात्मिक तळमळ व्यक्त करण्यासाठी आपली गीते गातात.

प्राचीन भावगीतांची परंपरा पुढे हक्कानी, हाजी मिस्किन आणि लसखान ह्या कवींनी आपल्या प्रेमकाव्याने जोपासली. १९४७ नंतर राही, कामिल, नवाझ, जाविदानी, आझिम आणि इतर अनेक तरुन कवी यांनी आपल्या स्वच्दंदतावादी भावकाव्याची परंपरा जोपासली आहे.

नाटक : बडशाह याच्याच कारकीर्दीत काश्मीरी रंगभूमीस राजाश्रय लाभला. साहित्याची एक स्वतंत्र शाखा म्हणून काश्मीरमध्ये नाटके मुख्यत्वे मौखिक परंपरेने जोपासली गेली; ही नाटयाची मौखिक परंपरा चक राजवंशाच्या पाडावापर्यंत (१५८६) विकसित होत होती. पुढील काळात धंदेवाईक लोककवींनी बंदिस्त रंगमंदिरातील नाटयप्रयोगांना खुल्या जागेवरील बेडौल नाट्यप्रयोगांचे रुप दिले. `बांडजशन' हे एक प्रकारचे खुले, ग्रामीण लोकनाट्यगृह बनले. लोकनाट्यांतून सामाजातील वाईट चालीरीती, सरकारी अंमलदारांचे जुलूम आणि क्वचित प्रसंगी ऐतिहासिक कथाभाग सादर केला जाई. विसाव्या शतकात नंदलाल कौल यांनी सतुच कहवट (सत्य हरिश्र्चंद्र), रामुनराज (रामराज्य), पझपतिव्रध (सती सावित्री) आणि दयालाला ही नाटके लिहून नवी परंपरा निर्माण केली. १९३९ मध्ये हाजिनी यांनी ग्रीस-सुंद गरह (शेतकऱ्यांचे घर) हे आधुनिक काश्मीरीतील पहिले अत्यंत लोकप्रिय तीन अंकी नाटक शेक्सपिअरच्या नाटयतंत्रानुसार लिहिले. त्यात त्यांनी काश्मीरमधील सामाजिक स्थितीचे व शोषणाचे चित्रण केले. १९४७ मध्ये काश्मीर युद्धभूमी बनून त्याची फाळणीही झाली. त्यामुळे काश्मीरी लेखकही दोन गटांत विभागले गेले. या दोन्ही काश्मीरमध्ये आकाशवाणीसाठी विविध नभोनाट्ये लिहिली जाऊ लागली. ती अर्थातच सुरुवातीस कलात्मक अभिव्यक्तीऐवजी प्रचाराच्या गरजेतून लिहिली गेली. १९५० ते १९६० च्या सुमारास लिहिली गेलेली आणि त्यातल्या त्यात दर्जेदार नभोनाट्ये म्हणजे दीनानाथ नादिमचे नेकी व बदी, कामिलचे हब्बा खातून, अख्तरचे नस्तिहुंद सवाल (१९५९) ही होत. नादिमची बोंबुर त यंबरझल (१९५३) आणि कामिलची बोंबुर त लोलर (१९६०) ह्या दोन संगीतिका दर्जेदार होत. `हीमाल नागराय' ही काश्मीरी आख्यायिका रोशन व नादिम यांच्या संगीतिकांचा तसेच जे.एस्‌. जलाली यांच्या पाच अंकी नाटकाचा विषय झाली आहे. जलाली हे तंत्राबाबत नसले, तरी नाटयविषय हाताळण्यात कुशल आहेत. १९५८ पासून काश्मीरची `कला, संस्कृती व भाषा अकादेमी' दरवर्षी नाटयस्पर्धा आयोजित करते. `टागोर हॉल'मध्ये एम्‌.ए.बट, पुष्कर भान, सोमनाथ साधू, अली मोहद लोन इ.ख्यातनाम नाटककारांच्या नाटकांचे प्रयोग होत आहेत. तांत्रिक बाबींचा अभाव असूनही अकिंगाम येथील भगत यांनी एम्‌.एल्‌.केब्रू यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली. तसेच पुष्कर भान यांनीही काही दर्जेदारनाटके यशस्वीपणे रंगभूमीवर आणली.

कादंबरी : काश्मीरी साहित्यात कादंबरी प्रकाराचे लेखन फारसे झाले नाही. आतापर्यंत काश्मीरीत सहा-सात कादंबऱ्याच प्रसिद्ध झाल्या असून त्यांपैकी अख्तरची दोद दग (१९६३) ही कादंबरी उल्लेखनीय आहे.

लघुकथा व कादंबरिका : काश्मीरीतील आधुनिक गद्यलेखकांतील जवळजवळ पन्नास टक्के लेखकांचा कल लघुकथालेखनाकडे आहे. कथानक व व्यक्तिचित्रण या दोन्हीही बाबतींत काही कथालेखकांचे पहिलेवहिले प्रयत्नही अत्यंत यशस्वी ठरले आहेत. काश्मीरची कल्चरल कॉंग्रेस आणि बझ्म-ए-अदब ह्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण होय. ह्या संस्थांनी तरुन लेखकांतील कलागुणांना चांगले उत्तेजन दिले.

अख्तर मोही-उद्‌दीन यांच्या सत संगर (१९५५) ह्या दर्जेदार कथासंग्रहाला १९५८ मध्ये साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले  अख्तर, मोही-उद्‌दीन . बन्सी निर्दोष यांचे बालमरायो आणि आदम छु यिथय बदनाम, कामिल यांचा कथे मंज कथ, सूफी गुलाम मुहंमद यांचा लूसिमत्स तारख आणि डॉ.शंकर रैना यांचा झित्नी झूल हे कथासंग्रह विशेष महत्वाचे आहेत. भारतचे लूक कथा हे भारत सरकारच्या प्रसिध्दी खात्याने प्रकाशित केलेले, तसेच मुंतखाब अफसाने हे जी.आर्‌.संतोष यांनी संकलित केलेले, अशी ही दोन काश्मीरी कथांची संकलने प्रसिद्ध आहेत. त्यांतील पहिल्यात भारताच्या विविध प्रदेशांतील लोककथा आणि दुसऱ्यात आधुनिक काश्मीरी लेखकांच्या कथा आहेत.

कादंबरिका ह्या प्रकारातील लेखनास काश्मीरीत नुकतीच सुरुवात झाली असून ते विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत आहे. प्रा.साधूंचा बेधिहुंदि मलर (राजतरंगिणीतील कथा) मध्ये दिसून येणारा हा प्रकार तंत्राच्या दृष्टीने लघुकथा व कादंबरिका यांच्या मध्ये पडेल असा आहे. कथा कादंबरिका, कादंबरी यांसारख्या गद्य साहित्यप्रकारांना पृथगात्मकता येण्याच्या दृष्टीने काश्मीरी गद्याचा विकास अधिक विविध दिशांनी व प्रयोगशील दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे.

साहित्यसमीक्षा : अब्दुल अहद आझाद हा प्रसिद्ध कवीच फक्त १९४७ पर्यंत काव्यसमीक्षक म्हणूनही प्रसिद्ध होता. तसेच महजूरसारख्या प्रख्यात कवीच्या काव्यावर सडेतोड टीका करणारे प्रताप हेच एकमेव मासिक काश्मीरीत होते. हे दोन अपवाद सोडल्यास काश्मीरी साहित्यसमीक्षेचा सर्वसाधारण सूर म्हणजे केवळ एखाद्या कवीवर एखादी उपरोधिका लिहिणे अथवा एखाद्याच्या काव्याचे विडंबन लिहिणे एवढयापुरतेच मर्यादित होते. गुलरेझ आणि कोंग पोश ह्या दोन नियतकालिकांनी मात्र साहित्यसमीक्षेची नवी दालने टीकाकारांना उपलब्ध करुन दिली. १९४७ नंतरच्या पहिल्या दशकात जे.एल्‌. कौल, हाजिनी, पुष्प, राही आणि फिराक हे समीक्षक आणि नादिम, कामिल आणि आरिफ हे प्रसिद्ध कवी यांनी काश्मीरी समीक्षेस नवे वळण दिले. काश्मीरी आकाशवाणीनेही यास महत्वाचा हातभार लावला आहे. काश्मीरी साहित्यसमीक्षेस आता वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाल्यामुळे, जिल्हा व तालुकगा पातळीवरील साहित्यसंस्थांमार्फत पौर्वात्य आणि पश्चिमी समीक्षातत्वांच्या आधारे, प्राचीन व आधुनिक साहित्याचे यथायोग्य मूल्यमापन होऊ लागले आहे. महाविद्यालयांतील व माध्यमिक शाळांतील नियतकालिकांतूनही आता समीक्षेसाठी एक सदर कायमचे राखून ठेवलेले आढळते. प्रा.हाजिनी यांच्या नस्त्रेच किताब व मकालात ह्या ग्रंथांत काही टीकात्मक लेख संकलित आहेत.

विनोद : काश्मीरी साहित्यातील इतर साहित्यप्रकारांच्या तुलनेत विनोदाचा तसा अभाव असला, तरी काश्मीरीत विखुरलेल्या स्वरुपात जे थोडेफार विनोदी साहित्य आहे, ते उल्लेखनीय आहे. लडीशाह आणि बांडजशन (पहिल्यात ग्रामीण जनतेचे मनोरंजन, तर दुसऱ्यात खुल्या नाटयगृहातील प्रयोगांची मौज) ह्या दोन काश्मीरी प्रकारांव्यतिरिक्त काश्मीरी साहित्यात विखुरलेल्या स्वरुपात उत्स्फूर्त मार्मिक विनोद, हजरजबाबीपणा, टोमणे, शाब्दिक कोटया, शाब्दिक चमत्कृती वगैरे विशेष आढळतात.

मक्बूल शाहने आपल्या काव्यात शेतकऱ्याचा आणि पीराचा उपरोध करुन विनोदी काव्याची सुरुवात केली आणि नंतरच्या कवींनी विनोदी काव्यात मौलिक भरही घातली. या दृष्टीने पहलनामा, मुकदमानामा इ. काव्ये उल्लेखनीय होत. श्रीनगरनिवासी महद दिक याने आपल्या चारचार ओळींच्या लहान लहान काव्यांत आणि वड्‌हाब साहिब यांने आपल्या दीर्घ काव्यांतून विखारी उपरोधाचा आविष्कार विनोदी शैलीत केला. अब्दुल अहद नाझिम (१-१८६५) याने आपल्या प्रासंगिक भाववृत्तींतून आणि खिझर मग्रिबी (१९२१-) ह्या कुशल उपरोधकाराने बोलभाषेतील शब्दांत विविध प्रसंगांचे उपरोधपर गतिमान चित्रण केले आहे. जी.आर्‌. संतोष यांनी विनोदी गद्यलेखनाचा पायंडा पाडला.

जी.एन्‌.खयाल यांच्या वतन (१९६४) ह्या साप्ताहिकात विनोदासाठी एक स्वतंत्र स्तंभ राखून ठेवलेला आहे. असुन त गिंदुन आणि दिलसोझ ह्या १९५० पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या संग्रहांतून काही उपरोधपर विनोदी लेख संकलित आहेत. असन त्राय हे काश्मीरी विनोदी लेखांचे दर्जेदार संकलन काश्मीरच्या कल्चरल अकादेमीने प्रसिद्ध केले आहे. आकाशवाणीसाठी विनोदी व्यक्तिरेखा लिहिण्यात पुष्कर भान यांचे स्थान महत्वपूर्ण आहे.

इतर गद्य-पद्य साहित्यप्रकार : (अ) मर्सिया (विलापिका) : ऐतिहासिक दृष्टया पाहू जाता, चक राजांच्या कारकीर्दीत ह्या प्रकाराचा उगम होऊन एकोणिसाव्या शतकापर्यंत त्याचा विकास झाल्याचे दिसते. तथापि `झाकिर' ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मर्सिया-गायकांच्या धंदेवाईक वर्गापुरताच हा प्रकार मर्यादित राहिला. ते मुहर्रममध्ये मर्सिया-गायन करीत. आपल्या मर्सिया पुस्तकरुपात प्रसिद्ध करण्याचे मात्र त्यांनी कटाक्षाने टाळले. त्यामुळे काश्मीरीत मर्सियांचे केवळ दोनच संग्रह उपलब्ध आहेत. त्यांतील एक १९२० पूर्वी लाहोर येथून व दुसरा (ओश-त-आब) १९५३ नंतर श्रीनगर येथून प्रसिद्ध झाला. कृपण झाकिरांच्या पदरी अजूनही अनेक मर्सिया आहेत. मर्सिया दीर्घ व संथ-गंभीर लयीच्या वृत्तांत लिहिले जातात आणि त्यांना कर्बला येथील दुःखद वातावरणाची डूब दिलेली असते. बहुश्रुतपणा व सूचकता यांनी ते समृद्ध असतात. त्यांची भाषा फार्सीप्रचुर असली, तरी काही दर्जेदार मर्सियांत आज विस्मृत झालेले अनेक काश्मीरी शब्दही आढळतात. मस्नवी प्रकारातील मर्सिया सैयद अमीर शाह यांच्या जंग-ए-इमाम हनफिया, गुलाम हसन दाराच्या रौझ-तु-शुहदा आणि ए.जी. अश्कच्या गुलझार-ए-हसनमध्ये आढळतात.

(आ) लडीशाह : काश्मीरातील हा एक वैशिष्टयपूर्ण असा वर्णनात्मक लोकगीतांचा प्रकार असून, त्याचा आशय अत्यंत हास्यकारक-उपरोधिक असतो. ऐतिहासिक दृष्टीने पाहता त्यात परकीय सत्तेखाली भरडल्या जाणाऱ्या समाजाची प्रतिक्रिया सूचित होते. अनियंत्रित राजवटीतील सामान्य काश्मीरी माणसाचा जो एक विसंगत आणि हास्यास्पद परिसर होता, त्याचे चित्रमय वर्णन व साधी सरळ रुपकात्मकता ही त्याची वैशिष्टये. त्यामुळे लडीशाहरचना काश्मीरी जनतेच्या मानसिक समाधानाचे महत्वाचे साधन ठरली. लडीशाहचा प्रमुख भाग भाटांच्या मौखिक परंपरेत नष्ट झाला असता, तरी आजही त्यांतील काही उत्कृष्ट भाग टिकून आहे. हकीम अबीब-उल्लाह (१-१९०५), मुनवूर शाह कुत्सू, लाल लखिमन (?-१९४७) हे लडीशाहप्रकारातील रचना करणारे उत्कृष्ट कवी होत. नूर मुहंमद रोशन आणि एम्‌.ए. कंवल हे सध्याचे लडीशाहरचनाकार आहेत.

(इ) दास्तान शायरी : कथागीतांचा हा एक प्राचीन काव्यप्रकार असून त्यात मुख्य कथानकातील विविध प्रसंगांना अनुरुप ठरतील अशा अनेक दीर्घ कथा गीतबद्ध केल्या जातात. त्यांतील काही कथा सर्वस्वी स्थानिक स्वरुपाच्या असतात (उदा., `अकनन्दुन', `जेहार' आणि `हब्बा खातून'), तर काही परकीय, विशेषतः फार्सी असतात (उदा., `लैला-मजनूँ', `हरुन-अल्‌-रशीद' वगैरे). कबीर मीर याची झिन्य मजूर (लाकूडतोडया) सोडली, तर इतर सर्वच दास्तान शायरींचे कवी अज्ञान आहेत. `कथु'गो`र' नावाने ओळखले जाणारे धंदेवाईक लोक ही दास्तान शायरी गात असता आणि त्यांच्यामुळेच ती आजपर्यंत टिकून आहे. त्यांनी प्राचीन काश्मीरीतील वाक्‌प्रयोगांच्या आणि वैशिष्टयांच्या आस्थेतून हा प्रकार जोपासला. अकनन्दुन हे या प्रकारातील काव्य तर 350 वर्षाहूनही अधिक प्राचीन असून ते परंपरेनेच जोपासले गेले.

(ई) वनवून व रोव्ह : हे दोन प्रकार काश्मीरी लोकगीताचे कदाचित सर्वांत जुने प्रकार असावेत. तसेच ते सर्वस्वी स्त्रियांसाठी असलेले प्रकार होत. व्रतबंध, सुंता, विवाह इत्यादींसारख्या खाजगी समारंभप्रसंगी बनवून प्रकारातील; तर ईद, शिवरात्री, रमजान इत्यादींसारख्या सामुदायिक धार्मिक प्रसंगी रोव्ह ह्या प्रकारातील गीते म्हणण्याचा प्रघात आहे. बनवून हलक्या सुरात विविध प्रकारे म्हटले जाते. एखाद्या विशिष्ट घटनेच्या अथवा प्रसंगाच्या भोवती बनवून विणलेले असते व त्यात अभीष्टचिंतन असते. रोव्हलाही त्याची खास वैशिष्टये आहेत. काश्मीरमधील तरुन मुली व मध्यवयीन स्त्रिया सूर्यास्तानंतर आपल्या दोन रांगा करुन एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून ओळीने उभ्या राहतात. नंतर झोक्याप्रकाणे हालचाली करीत प्रत्येक रांग आलअून पालटून मागेपुढे सरकते आणि रोव्ह गीते गातगात त्यांच्याचालीशी संवादी असे नृत्य करते. रोव्हमध्ये ग्रामीण स्त्रियांच्या भावभावनांचे पडसाद व त्यांच्या दडपल्या गेलेल्या स्वत्वाचे उन्नयन दिसून येते. आधुनिक काळात गुलाम मुस्तफा मंजूर (१९०६-) अणि गुलाम हसन ड्रायव्हर (१९०७-) यांनी या प्रकारात विपुल रचना केली आहे. प्राचीन रोव्हचे कवी मात्र काश्मीरी लोकसाहित्याच्या कवींप्रमाणेच अज्ञात आहेत.

(उ) शहर-आशोब : नव्या फॅशनच्या स्वीकाराने जेव्हा काश्मीरी माणूस जुन्या समाजात विसंवादी ठरला अथवा जेव्हा रुढ श्रध्दांशी प्रतिकूल अशा नव्या मूल्यांचा त्याने स्वीकार केला, तेव्हा शहर आशोब या औपरोधिक रचनेव्दारा कविवर्ग पुढे सरसावला. ह्या प्रकारात भ्रष्टाचारी अधिकारी, जंतरमंतर करणारे धर्मगुरु किंवा नैसर्गिक आपत्ती यांवरील उपरोध असतो. एकोणिसाव्या शतकात साहित्यिक मनोरंजनाचा एक आवडता प्रकार म्हणून, अनेक कवींनी या प्रकारची रचना केली.

(ऊ) लोकसाहित्य व लोकगीते : काश्मिरी लोकसाहित्यात अंगाई गीते, बालगीते, शिशुगीते, सुगीचे गीते, नावाडयांची गीते, कूटे इत्यादींचा अंतर्भाव होतो. काश्मीरीतील रोव्ह व छकरी नावाची गीते अनुक्रमे मुलींनी व मुलांनी म्हणावयाची गीते आहेत. ह्या गीतांव्दारे त्यांच्या मानसिक ताणाचा उपशम होतो. ए.स्आइन आणि जे एच्‌. नोल्झ यांनी काश्मीरी लोकसाहित्याच्या वैशिष्टयांची ओळख इंग्रजी जाण्णाऱ्यांना सर्वप्रथम आपल्या ग्रंथाव्दारे करुन दिली. काश्मीरच्या कल्चरल अकादेमीनेही ह्या लोकसाहित्याच्या दालनाकडे विशेष लक्ष पुरविले असून त्याच्या संकलनासाठी भरपूर मदत केली ओ. त्या दृष्टीने आता काश्मीरीतील लोकसाहित्याचे पुढील प्रकारांतील ग्रंथ उल्लेखनीय होत : (१) बाल वाङ्मय : पोशीमाल-एस्‌.एन्‌.साधू, मुख्त-लर-नाजी-मुन्वर व रहबर, बालमरायो-एस्‌.एन्‌. हलीम. (२) लोकगीते : काश्र लुक बअत (२ खंड, १९६५-६७). पहिला खंड-नाजी मुन्वर व एम्‌.एल्‌. साकी आणि दुसरा खंड-एम्‌.एल्‌. साकी. (३) लोककथा : दलील (१९६२) - अख्तर मोही-उद्‌दीन व पुष्कर भान, गामोव्ह मेंझ-ए-फीरि-फीर-प्रा. मोही-इद्‌दीन हाजिनी आणि पोश-थ'र-तीन पुस्तिकांत-नूर मुहंमद रोशन.

संदर्भ : 1.Grierson, G.A.; Burnett, L.D.Lalla-Vakyani,London, 1920

2.Kaul, J.L.Lall-Dyed, Delhi, 1972.

3.Kaul, J.L.Lol-Lyrics, Srinagar, 1945.

4.Kaul, J.L. Strudies in Kashmiri, Srinagar, 1968.

5.Sahitya Akademi, Bibliography of Men of Letters in Kashmiri, Delhi, 1957.

6.Stein, A,; Grierson, G.A. Ed. Hatim’s Tales, London,

7.Sufi, G.M.D.Kashmir 2.Vols. Lahore 1948-49.

८. दर, मोहनकृष्ण, काश्मीर का लोक-साहित्य, दिल्ली, १९६३

९.पुष्प्, पी.एन्‌. काश्मीरी भाषा और उसका साहित्य पाटणा, १९५७.

लेखक: मोही-इद्‌दीन (इं.) हाजिनी ; भा.ग.(म.) सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate