অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गजानन त्र्यंबक माडखोलकर

गजानन त्र्यंबक माडखोलकर

गजानन त्र्यंबक माडखोलकर : (२८ डिसेंबर १९०० – २७ नोव्हेंबर १९७६). विख्यात मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक. जन्म व शिक्षण मुंबईत. गणित विषयात गती नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत; तथापि संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशाचे विभागसंपादक, नागपूरच्या दैनिक महाराष्ट्राचे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या नरकेसरी स्मारक मंडळाने काढलेल्या तरुण भारत ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले. एक पत्रकार ह्या नात्याने त्यांनी तात्कालिक महत्त्वाच्या अनेक विषयांवर लेखन केले. प्रखर राष्ट्रवादी वृत्ती, वाङ्‌मयगुणांनी युक्त अशी प्रसन्न भाषाशैली आणि तर्कशुद्ध विवेचनपद्धती ही त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाची वैशिष्ट्ये होती.

आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही कविता–ह्यांत संस्कृत काव्यरचनेचाही समावेश आहे–केल्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या उषा (१९२४) ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत. देवयानी (१९६४) हे त्यांनी लिहिलेले नाटक. रातराणीची फुले (१९४०) आणि शुक्राचे चांदणे (१९४८) ह्या त्यांच्या कथासंग्रहातील कथा गाजल्या होत्या. १९३३ मध्ये मुक्तात्मा ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर कांदबरीकार म्हणून त्यांना ख्याती लाभली. भंगलेले देऊळ (१९३४), शाप (१९३६), कांता (१९३९), दुहेरी जीवन (१९३९), मुखवटे (१९४०), नवे संसार (१९४१), नागकन्या (१९४१), डाकबंगला (१९४२), चंदनवाडी(१९४३), प्रमद्वरा (१९४३), अनघा (१९५०), स्वप्नांतरिता (१९५३), रुक्मिणी (१९५९), उर्मिला (१९६३), सत्यभामा (१९६८), इ. त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ह्यांपैकी बऱ्याचशा कादंबऱ्या राजकीय स्वरूपाच्या आहेत. गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार त्यांच्या राजकीय कादंबऱ्यांतून प्रत्ययास येतो. त्यांच्या काही कादंबऱ्या-उदा., नागकन्या आणि डाकबंगला त्यांतील शृंगारिकतेमुळे एके काळी चर्चेचा विषय झाल्या.

संस्कृतप्रचुर शब्दकळा आणि पल्लेदार रचनाशैली ही त्यांच्या कादंबरीलेखनाची अन्य वैशिष्ट्ये होत. आधुनिक कविपंचक (१९२१) हे माडखोलकरांचे पहिले पुस्तक समीक्षात्मक होते. रेव्ह. टिळक, केशवसुत, गोविंदाग्रज, विनायक व बालकवी ह्या पाच कवींच्या कवितेचा रसग्रहणात्मक परामर्श ह्या पुस्तकात घेतलेला असून ह्या पहिल्या पुस्तकाने समीक्षक म्हणून ते प्रसिद्धीस आले. प्रस्तुत पुस्तक हे रसास्वादी समीक्षेचे उत्तम प्रत्यक्षिक मानले जाते. समीक्षकाला आवश्यक असलेली चिकित्सा आणि रसिकता ह्यांचा सुंदर समन्वय ह्या पुस्तकात दिसतो. विष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध(१९२३), विलापिका (१९२७), स्वैरविचार (१९३८), माझे आवडते कवी (१९३९), अवशेष (१९४०), माझी नमोवाणी(१९४२), जीवनसाहित्य (१९४३), परामर्श (१९४३), माझे आवडते लेखक (१९६५), माझे लेखनगुरू (१९६५), महाराष्ट्राचे विचारधन (१९७३), ह्यांसारखे त्यांचे प्रबंध व लेखसंग्रह उल्लेखनीय आहेत.

व्यक्तिरेखा (१९४३), व्यक्ती तितक्या प्रकृती(१९७०), आणि श्रद्धांजली (१९७४), ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके. दोन तपे (१९४६), एका निर्वासिताची काहणी (१९४९), मी आणि माझे साहित्य (१९६८), मी आणि माझे वाचक (१९७२) ही त्यांची विशेष निर्देशनीय अशी आत्मपर पुस्तके होत. मृत्युंजयाच्या सावलीत (१९७४) ह्या त्यांच्या ग्रंथातील त्यांच्या पत्नीवरील लेख म्हणजे एका परीने त्यांचे धावते आत्मचरित्रच होय. अमेरिका, प. जर्मनी, इंग्लंड ह्यांसारख्या देशांना भेट देण्याची संधी माडखोलकरांना पत्रकार ह्या नात्याने मिळालेली होती. मी पाहिलेली अमेरिका (१९६३) ह्या त्यांच्या प्रवासवर्णनात्मक पुस्तकात अमेरिकेतील त्यांच्या अनुभवांबरोबरच त्यांचा राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोणही स्पष्ट झालेला आहे.

१९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचारपसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडेही ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

१९४६ साली बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि ह्याच साहित्यसंमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मंजूर झाला होता. नागपूर येथे ते निधन पावले.

 

लेखक : गो. म. कुलकर्णी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate