অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वि.का. राजवाडे यांचे कार्य व कर्तृत्व

प्रस्तावना

धुळे येथे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे दि. 31 डिसेंबर 1923 रोजी निधन झाले. त्यांची 90 वी पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा घेतलेला आढावा. वि.का राजवाडे हे संशोधक तर होते पण त्यांचे विविध विषयांवर संशोधन होते. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली.

आपल्या भारत देशाचा इतिहास सर्वांनीच अभ्यासला पाहिजे. हिमालयापासून खाली कन्याकुमारी तसेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर अशी सीमा पाहिली तर या ठिकाणी प्राचीन काळापासून अनेक जाती, पंथ, धर्माची विविध लोक राहतात. आज आम्ही एकसंघ आणि गुण्यागोविंदाने राहात आहोत. प्रत्येकाच्या चालीरिती वेगळ्या, अन्न, पोषाखात वैविध्य आहे पण आम्ही सर्व एक आहोत. हा सर्व इतिहास त्यात प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन हा अभ्यासलाच पाहिजे. येथे अनेक थोर पुरुष होऊन गेले. या ठिकाणी इंग्रज आले, मोगल आले, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आले. आमच्या समवेत राहिले. या थोर मायभूमीने सर्वांना सांभाळले. यांचाही इतिहास समजून घेतला पाहिजे.

इतिहासाचा अभ्यास करतांना एक कर्तृत्ववान पुरुष समोर येतो. तो म्हणजे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे होय. 1875 ते 1925-26 या कालखंडात राजवाडे यांनी एक लेख लिहिला. त्यात त्यांनी 1818 ते 1913 या कालखंडातील कर्तृत्ववान पुरुषांची माहिती दिली आहे. राजवाडे यांचे धातुकोष आणि नामादिशब्दयुत्पत्तिकोश हे सन 1937 आणि 1942 मध्ये प्रसिद्ध झाले होते. ते म्हणजे त्यांची आयुष्यभरांची कमाई होती.

ऐतिहासिक खजिना असलेल्या दुर्मिळ ठेव्याचे धुळे येथील इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे. ज्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजेच धुळे. येथील इ.वि.का. राजवाडे. त्यांना इतिहासाचार्य ही पदवीच दिलेली होती. प्राचीन ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे, वास्तू दप्तरखाने, गड, कोट, स्मारके आणि किल्ले ही देशाची महान प्रतिके आहेत. तो देशाचा महान राष्ट्रीय ठेवाच आहे. त्याची जपवणूक हे देशातील प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. असा महान राष्ट्रीय वारसा धुळे येथे राजवाडे संशोधन मंडळात जपला जात आहे. खानदेशच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे हे मंडळ म्हणजे भूषण आहे. महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून इ.वि.का. राजवाडे यांचे नांव पुढे येते.

संशोधन संकलन, संपादन आणि समिक्षण या इतिहासाच्या सर्व टप्प्यात राजवाडे यांचा संचार त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू होता. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात विशिष्ट ध्येयवादाने भरलेली जी पिढी होती त्यामध्ये इ.वि.का. राजवाडे यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य अनेक दृष्टीने इतर महापुरुषांपेक्षा एक वेगळेच होते. त्यांचे लिखाण नवीन विचारांचे खाद्य पुरविणारे आणि आपल्या लोक विलक्षण निष्कर्षांनी समाजाला धक्के देणारे झाले. त्यांचा संशोधनाचा अफाट व्यासंग पाहिल्यावर मन थक्क होते. तनमन ओतून ते संशोधनाकडे वळले.

मराठी भाषा आणि मराठी वाङमय याविषयी त्यांच्या मनात इतिहासाइतकीच जिज्ञासावृत्ती असल्याने राजवाडे यांचे भाषा आणि वाङमय विषयक लेखन अभ्यासकांना ज्ञात नसलेली माहिती देणारे ठरले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने राजवाडे यांनी 22 खंड प्रसिद्ध केले. संशोधन करतांना राजवाडे यांना ज्ञानेश्वरीची जुनी प्रत सापडल्यानंतर खूप आनंद झाला. या ज्ञानेश्वरीस त्यांनी 100 पानाची प्रस्तावना जोडली. पुढे ज्ञानेश्वरीचे व्याकरण हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. राजवाडे यांच्याजवळ प्रदिप्त प्रतिभा अवर्णनीय नि:स्पृह्ता आणि निरपेक्षता तसेच कष्टशिलता होती. म्हणून त्यांच्याकडून राष्ट्राची उत्तम सेवा झाली.
सन 1864 ते 1926 हा इ.वि.का. राजवाडे यांचा कालखंड सन 1904 पासून ते पुणे येथून धुळे येथे खोलगल्लीतील ॲड.भास्कर वामन भट यांच्याकडे येऊ लागले. इतिहास हे राजवाडे यांचे एक साधन होते. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वदेश यांच्या रक्षणासाठी ह्या साधनाचा त्यांनी उपयोग केला. पुण्यात सन 1910 मध्ये त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली.
दिनांक 31 डिसेंबर 1926 रोजी धुळे येथे तात्यासाहेब भास्कर वामन भट यांच्या घरी राजवाडे यांचे निधन झाले. लगेचच दिनांक 9 जानेवारी 1927 रोजी धुळे येथील लोकमान्य उद्यानात धुळ्याच्या नागरीकांची जाहीर सभा झाली आणि त्याच दिवशी राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना झाली.

राजवाडे यांचे स्मारक म्हणून राजवाडे संशोधन मंदिर तात्काळ उभारण्याचा ठरावही झाला. दिनांक 27 डिसेंबर 1929 रोजी राजवाडे संशोधन मंदिराची कोनशिला बसविण्यात आली आणि आनंदाची बातमी म्हणजे दिनांक 5 जानेवारी 1932 रोजी राजवाडे मंदिराचे उद्घाटन सौ. महाराणी इंदिराबाई होळकर (मॉ साहेब) यांच्या हस्ते झाले. राजवाडे यांनी गोळा केलेल्या असंख्य दुर्मिळ प्राचीन संस्कृत प्राकृत हस्तलिखित ग्रंथ व ऐतिहासिक कागदपत्राच्या मोठ्या 10 पेट्यांना येथे संग्रहात ठेवण्यात आले. शके 1854 चैत्र शुद्ध 1 एप्रिल 1932 रोजी ‘संशोधक’ या त्रैमासिकाच्या प्रकाशनाला प्रारंभ झाला. श्रीमंत सरदार माधवराव विनायकराव किबे इंदुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 डिसेंबर 1932 रोजी राजवाडे यांच्या अर्धपुतळ्याचेही उद्घाटन झाले. दिनांक 27 मार्च 1933 रोजी राजवाडे मंडळ पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली. दिनांक 30 जानेवारी 1938 रोजी धातुकोश या ग्रंथाचे प्रकाशन झाले. 29 मे 1942 रोजी त्यांच्या नानादिशब्दव्युत्पत्तिकोशाचे प्रकाशन झाले.

सन 1890 पासून राजवाडे यांनी भाषाशास्त्राकडे लक्ष दिले होते. भाषा ही त्यांना संस्कृतीचे प्रतिक व भाषेतील शब्द त्यांना इतिहासाचे विश्वसनीय साधन वाटे. त्यांनी मराठी भाषेतील शब्दाचे विवेचनात्मक व्याकरण व ऐतिहासिक व्याकरण यांच्या व्याख्या केल्या. निरुकवी शास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र म्हणजेच ऐतिहासिक व्याकरणाच्या सहाय्याने त्यांनी शब्दांची प्राकृत, संस्कृत, वेदकालीन, पूर्ववैदिक, पूर्वपूर्ववैदिक भाषेतील रुप त्यांचे संशोधन केले. मराठ्यांच्या इतिहासात त्यांना जगाचा इतिहास दिसू लागला. इतिहासशास्त्राच्या अभ्यासातून त्यांची दृष्टी अर्थशास्त्र, भाषा, समाज अशा गहन विषयांकडे वळली. समाजशास्त्राचा अभ्यास करतांना गावाची नांवे, आडनांवे, जातीचे उगम शोधता शोधता राजवाडे मराठ्यांच्या प्राथमिक वसाहतीत गेले.

महाराष्ट्राचा वसाहतकाळ, राधामाधव विलासचंपू महिकावतीची बखर इत्यादी त्यांचे लिखाण त्यांच्या प्रतिभासंपन्न बुद्धिची चमक दाखविणारी आहेत. त्यांनी आपल्या 20 हजार पृष्ठांच्या प्रसिद्ध व अप्रसिद्ध ग्रंथसंपत्तीवर कोणताही हक्क राखून ठेवला नाही हे त्यांच्या निस्पृहतेचे ज्वलंत उदाहरण म्हणायला पाहिजे. त्यांच्या संपूर्ण वाङमयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संशोधनात्मक स्वरुप होय. त्यांनी भारतीय इतिहास शास्त्रात मुलभूत सिद्धांत मांडले आणि भारतीय इतिहासकारांना संशोधन व लेखनात बुद्धीवादी व शास्त्रीय पद्धतीचे धडे दिले. मातृभाषेतच लिहिण्याचा आपला बाणा त्यांनी आयुष्यभर पाळला. म्हणूनच राजवाडे म्हणजेच मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र धर्म म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता असे समीकरण झाले आहे. भारताने आपल्या परंपरेशी नाते कायम ठेऊन आधुनिक शस्त्रे व शास्त्रांचे ज्ञान मिळविल्यास भारत देश स्वतंत्र आणि बलवान होईल असे त्यांना वाटत असे.

धुळ्याचे राजवाडे संशोधन मंडळ


महाराष्ट्रास आणि सर्वत्रच भुषणभूत असलेली राजवाडे संशोधन मंडळ ही एक नावारुपास आलेली संस्था आहे. सन 1904 पासून तर 31 डिसेंबर 1926 पर्यंतचा राजवाडे यांचे धुळ्यातील वास्तव्य तो इतिहास रोमांचकारी आहे.

त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या संग्रहाच्या जतनाची व्यवस्था त्यांचे शिष्य आणि चहाते तसेच धुळ्याचे सुप्रसिद्ध वकील तात्यासाहेब तथा भास्कर वामन भट यांनी अथक प्रयत्न करुन केली. राजवाडे मंडळाच्या दैनंदिन खर्चाच्या सोयीसाठी त्यांनी राजवाडे बँक उभी केली. राजवाडे यांच्या अमोल ठेव्यांचे दर्शन व्हावे म्हणून वस्तुसंग्रहालयासाठी पैसा उभा केला. संशोधक हे त्रैमासिक सन 1932 पासून सुरु केले. ग्रंथालय सुमारे 25 हजार पुस्तकांचे आज भव्य दिव्य स्वरुपात उभे आहे.

या मंडळ उभारणीत खुप मोठमोठ्या मान्यवरांचा सहभाग आहे. तात्यासाहेब भास्कर वामन भट, श्रीधर बाळुकाका भट, वामनराव भट, दत्तु काका भट, बाळासाहेब मुंदडा, स.कृ. देशमाने, डॉ. प्र.न. देशपांडे अनेक मान्यवरांचा यात सहभाग आहे. मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष आणि राजवाडे यांचे पणतु आनंद राजवाडे सध्याचे अध्यक्ष मदन लालजी मिश्रा, कार्याध्यक्ष संजय मुंदडा, मुख्यचिटणीस प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे आणि सर्व समितीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाने राजवाडे मंडळाचे कार्य पुढे जात आहे.


लेखक - प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर, धुळे

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate