অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाऊराव कोल्हटकर

भाऊराव कोल्हटकर

जन्म : ९ मार्च १८६३

मृत्यू : १३ फेब्रुवारी १९०१

पूर्ण नाव लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर. मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट. जन्म बडोदे येथे. बापूबोवा कोल्हटकर हे त्यांचे पिता व सौ. भागीरथीबाई ही माता. भाऊरावांचे शिक्षण कारकुनी करण्यापुरते झाले होते. बडोदे येथील पोलीस आयुक्तांच्या कचेरीत ते साधे कारकून असले, तरी एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याकाळी  बडोद्यात त्यांची फार प्रसिद्धी होती. सुंदर रूप आणि गोड आवाज हे त्यांचे गुणविशेष.

अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी संगीत शाकुंतल  नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीची स्थापना केली. त्या काळात नाटकातील स्त्रीभूमिका पुरुषच करीत. आपल्या नाटकातील स्त्रीभूमिका करण्यासाठी अण्णासाहेबांनी भाऊरावांची निवड केली आणि २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्याकाळी किर्लोस्करांच्या शाकुंतल  नाटकात ‘शकुंतला’ (१८८२), सौभद्र नाटकात  ‘सुभद्रा’ (१८८२) व रामराज्यवियोग  नाटकात ‘मंथरा’ (१८८४) या भाऊरावांच्या स्त्रीभूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘सुभद्रे’ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावड्या’ असा होऊ लागला.

गोविंद बल्लाळ यांच्या विक्रमोर्वशीय नाटकात ‘उर्वशी’ची भूमिका (१८८९) केल्यानंतर भाऊरावांनी नायकाच्या भूमिका करण्यास सुरुवात केली. देवल यांच्या शापसंभ्रम  नाटकातील ‘पुंडरीक’ (१८९३) व मृच्छकटिक  नाटकातील ‘चारुदत्त’ (१८९५); श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या पहिल्या वीरतनय  नाटकातील ‘शूरसेन’ (१८९६) आणि देवलांच्या शारदा नाटकातील ‘कोदंड’ (१८९९) या भाऊरावांच्या लोकप्रिय व गाजलेल्या पुरुषभूमिका होत. गायन आणि अभिनय या दोहोंचाही एकाच वेळी उठाव करण्याची त्यांची ताकद व हातोटी असामान्य होती. त्यांचा आवाज अत्यंत गोड आणि पल्लेदार असून गायनकलेचे त्यांना उत्तम ज्ञान होते. मराठी नाट्यसृष्टीत संगीत नाटके सुरू झाल्यापासून भाऊरावांसारखा चढा, पल्लेदार, गोड आणि सुरेल आवाज मराठी रंगभूमीवर ऐकावयास मिळाला नाही, असे त्यांच्या चाहत्यांचे महणणे आहे.

भाऊरावांनी केलेल्या भूमिकांच्या अभिनयाचे शिक्षण त्यांना गोविंद बल्लाळ देवल यांनी दिले होते.

अण्णासाहेब  किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर (१८८५) ते किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार मालक झाले. अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्थापन केलेल्या संगीत रंगभूमीची परंपरा त्यांनी आपल्या १८–१९ वर्षांच्या कारकीर्दीत चांगल्या प्रकारे समृद्ध केली, त्यामुळे संगीत रंगभूमीच्या विकासाचे आणि उत्कर्षाचे सारे श्रेय भाऊरावांनाच दिले पाहिजे. १७ मार्च १९०० रोजी पुण्याच्या आर्यभूषण नाटकगृहात भाऊरावांनी ‘कोदंडा’ची भूमिका केली. हीच त्यांची शेवटची भूमिका व शेवटचे दर्शन. त्यानंतर मे महिन्यापासून जलोदराच्या विकारामुळे त्यांची प्रकृती बिघडली व त्यातच त्यांचा पुणे येथे अंत झाला.

लेखक : व.शां.देसाई

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate