चीनमध्ये लेखनकला ही इ. स. पू. सु. १५०० च्या आसपास चित्रलिपीच्या स्वरुपात निर्माण झाली. लवकरच लिपीतील चित्रांचा अंश कमी होत जाऊन अक्षरांचे घाट वेगळे होत गेले. चिनी अक्षरलेखन हे विविध माध्यमांत, विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असे. ह्या विविध माध्यम-साधनांच्या स्वरुपभिन्नतेनुसार अक्षरांचे घाट व वळणेही बदलत असत. उदा., लाकडावर किंवा बांबूवर कोरलेली अक्षरे जास्त काटकोनी असत, तर रेशमी वस्त्रावर कुंचल्याने लिहिलेली अक्षरे जास्त गोलाकार असत. सुलेखनाचे विविध प्रकार यांतूनच पुढे विकसित होत जाऊन त्यांना कलात्मक दर्जा प्राप्त झाला. इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंत ‘गू-वन’ ही प्राचीन लिपी प्रचलित होती. त्यातून पुढे ‘ली’ ही लेखनिकांना सुलभ अशी लिपी प्रगत झाली. तिच्यातच काहीसे फेरफार होऊन ही लिपी सरकारी कामकाजामध्ये वापरली जाऊ लागली. नंतरच्या हान काळात (इ. स. पू. सु. २०२ ते इ. स. ९) सरकारी कामकाज फारच वाढल्यामुळे शीघ्रलेखनासाठी मराठीतील मोडी लिपीसारखी ‘त्साव शू’ (गवतासारखी अक्षरे) ही नवी जलदगती लेखनलिपी तयार करण्यात आली.
चिनी सुलेखनकलेत इ. स. तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत दोन प्रमुख संप्रदाय निर्माण झाले : सू जिंग याने उत्तरेकडील एका संप्रदायाची स्थापना केली. या पंथाचे अनुयायी जाड व बुटकी अक्षरे लिहीत. वांग स्यी -जृ व त्याचा मुलगा स्यन-जृ यांनी नाजूक हस्ताक्षरांचा दुसरा संप्रदाय स्थापन केला. थांग काळात (इ. स. ६१८ ते ९०७) इतर कलांबरोबरच सुलेखनकलेचाही विकास घडून आला; मात्र त्यात सू जिंगच्या पंथाचा जास्त प्रभाव होता. येन जन-च्यींग, ल्यव गुंग-च्युआन आणि छू स्वै-ल्यांग हे या पंथातील प्रसिद्घ सुलेखनकार होत. सुंग काळात (९६० ते १२७९) सर्व कलाविष्कारांतच एक प्रकारचा नाजूकपणा दिसू लागला. त्यामुळे वांग पितापुत्रांच्या नाजूक हस्ताक्षराच्या सुलेखन-संप्रदायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सू दुंग-फो, मी फू, ह्वांग थांग-ज्यन व सम्राट ह्वै जुंग (१०८२–११३५) हे या संप्रदायातील प्रमुख सुलेखनकार होत. ह्याच काळात सुलेखनविद्येच्या तांत्रिक अंगोपांगांवर शास्त्रीय स्वरुपाचे ग्रंथ लिहिले गेले. वांग पितापुत्रांच्या सुलेखनशैलीचा प्रभाव नंतरच्या काळातही टिकून राहिला. मंगोल काळात (१२६०–१३६८) जाव मंग-फू हा चित्रकार व सुलेखनकार आणि स्यन यू-शू हे या पंथाचे अनुयायी विशेष प्रसिद्घी पावले. मात्र त्यानंतरच्या मिंग राजवटीतील (१३६८–१६४२) स्यींग थूंग, वन जंग-मिंग आणि दुंग च्यी-छांग या सुलेखनकारांनी उत्तरेकडच्या जोमदार हस्ताक्षरपंथाला पुन्हा पुढे आणले. त्यांचा प्रभाव चीनमधल्या शेवटच्या च्यिंग ऊर्फ मांचू राजवटीतही (१६४४–१९१२) टिकून राहिला. वू वै-ये आणि ल्यव युंग हे या काळातील प्रसिद्घ सुलेखनकार होत. चिनी सुलेखन हे चिनी चित्रकलेला खूपच जवळचे आहे, असे दिसून येते. चिनी कलावंतांनी सुलेखनाचे इतके उत्तमोत्तम आविष्कार घडविले, की चिनी सुलेखनकला ही एके काळी चित्रकलेपेक्षाही उच्च दर्जाची मानली जात असे. आधुनिक काळात चिनी सुलेखनावर कोणत्याही एकाच संप्रदायाचा प्रभाव आहे, असे दिसत नाही. आजही सर्व पारंपरिक लिपिप्रकारांचा सुलेखनकलेत कौशल्याने वापर करुन घेतला जातो आणि सुलेखनकलेचे महत्त्व अद्यापही पूर्वीप्रमाणेच टिकून आहे. एखाद्या व्यक्तीच्या पांडित्याची पारख अजूनही तिच्या हस्ताक्षरावरुन केली जाते. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या रन्-मिन-बाव (इं. शी. ‘पिपल्स डेली’) या दैनिकाचा मथळा माओ त्से-तुंग यांच्या हस्ताक्षरात छापला आहे.
इ. स. ६०० च्या सुमारास जपानी कारागिरांनी चिनी सुलेखनकारांकडून सुलेखनविद्या शिकून घेतली व त्यात उच्च दर्जाचे प्रावीण्य मिळविले. जपानी सुलेखनात ‘कांजी’ (चिनी अक्षरे वा वर्णमाला ) आणि स्थानिक जपानी ‘हिरागाना’ लिपी यांचे मिश्रण दिसून येते. त्यांतील अक्षरवळणांच्या व घाटांच्या वैविध्यपूर्ण संयोगातून व समृद्घ अलंकरणातून जपानी सुलेखनकारांनी व्यक्तिनिष्ठ व सर्जनशील अक्षरलेखनाचे अनेकविध कलात्मक आविष्कार घडविले. अद्यापही जपानमध्ये सुलेखनाच्या स्पर्धा प्रतिवर्षी घेतल्या जातात आणि त्यांत सर्व वयोगटांतले तसेच भिन्न भिन्न व्यवसायांतले स्पर्धक भाग घेतात व आपले सुलेखनकलेचे आविष्कार स्पर्धेनिमित्त भरविल्या जाणाऱ्या जाहीर प्रदर्शनांतून मांडतात.
इस्लाम धर्मीयांत कुराणा च्या नकला करणे हे पवित्र मानले जात असे. कुराणाच्या अरबी भाषेतील श्रद्घापूर्वक लेखनातून इस्लामी सुलेखनकलेचा विकास घडून आला. मशिदी तसेच अन्य धार्मिक वास्तू, विविध वस्तू यांवर कुराणा तले संदेश कोरले जात. हे लेखन विविध शैलींनी व सुंदर सजावटीने आकर्षक करण्यात येई. शेकडो वर्षे इस्लामी कलावंतांनी सुंदर अलंकरणात्मक हस्ताक्षरांचा कलात्मक सजावटीसाठी उपयोग करुन घेतला. सुलेखनात पुष्कळदा वेलबुट्ट्या वा भौमितिक आकृत्या चितारल्या जात. इस्लामच्या उदयानंतर मानवाकृतींच्या व प्राणिमात्रांच्या चित्रणावर धार्मिक प्रतिबंध आल्याने इस्लामी कला अलंकरण, ‘अरेबस्क (कल्पनारम्य अलंकरणप्रधान कलाशैली) नक्षीप्रकार’ या अंगांनी विकसित होत गेली. पानाफुलांच्या नक्षी, भौमितिक आकृत्या यांना कलाविष्कारात प्राधान्य आले. सुलेखन, हस्तलिखितांची सजावट यांसारखे अलंकरणात्मक कलाप्रकार प्रमुख ठरले व प्रगत होत गेले. धार्मिक उद्दिष्टांनी केल्या जाणाऱ्या लेखनातून कालांतराने सौंदर्यमूल्येही वृद्घिंगत होत गेली व त्यातून सुलेखनाला उच्च कलात्मक दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली. एकांतरित उभ्या-आडव्या फटकाऱ्यांनी लयबद्घ बनलेली अरबी लिपी जात्याच अलंकरणानुकूल होती. अलंकरणाच्या इतर प्रकारांतही इस्लामी कलावंतांनी तिचा कौशल्यपूर्वक वापर केला. अरबी सुलेखनाच्या ‘कूफिक’ व ‘नक्शी’ या दोन शैली प्रसिद्घ होत. कूफिक ही साधारणतः चौकोनी व अणकुचीदार वळणाची अक्षरशैली असून, कूफिक हे नाव कूफा (इराक) या गावाच्या नावावरुन आले. त्या गावात उत्तमोत्तम सुलेखनकार रहात. इस्लामी सुलेखनकारांनी कूफिक शैलीचा वापर कोरीव शिलालेखांसाठी व दहाव्या शतकापर्यंत कुराणा च्या लेखनासाठी केला. नक्शी ही गोलाकार वक्र रेखाटनाची व अधिक प्रवाही अशी अक्षरलेखनाची शैली असून कालांतराने तिचाही कुराण लेखनासाठी वापर होऊ लागला. कूफिक शैली प्रामुख्याने कुराणा तील ‘सूरां’च्या (अध्यायांच्या) शीर्षकांसाठी वापरीत. इराणी सुलेखनकारांनी अरबी लिपीचे कूफिक व नक्शी हे अलंकरणप्रकार विशेषत्वाने वापरले. त्यातही कूफिक ही सुलेखनशैली प्रकर्षाने व प्राचुर्याने वापरलेली दिसून येते. अनेक यूरोपीय कलावंतांनीदेखील कूफिक ही शैली सौष्ठवपूर्ण, डौलदार व अलंकरणयुक्त असल्याने तिच्या आकर्षक सौंदर्याच्या प्रभावाने आपल्या सुलेखनात ती जाणीवपूर्वक अनुसरली. फारच थोडे यूरोपीय कलावंत जरी ती वाचू शकत होते, तरी ती आत्मसात करण्याचे प्रयत्न मात्र मोठ्या प्रमाणावर झाले. सुलेखनाच्या अनेकविध वेगवेगळ्या शैली इस्लामी संस्कृतीत उदयास आल्या व त्यांचा वापर भिन्न भिन्न प्रयोजनांनुसार इस्लामी संस्कृती असलेल्या वेगवेगळ्या देशांत होत राहिला. इस्लामी संस्कृतीतले हे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून, जगभरातल्या अन्य संस्कृतींमध्ये ते क्वचितच आढळते.
भारतात मुद्रणपूर्व काळात हस्तलिखित पोथ्या, पुराणादी धार्मिक ग्रंथांच्या सजावटीतून सुलेखनकला प्रामुख्याने जोपासली गेली. सुवाच्य व सौंदर्यपूर्ण सुलेखनाच्या विविध शैलींचे नमुने ह्या धार्मिक हस्तलिखितांतून पाहावयास मिळतात. इस्लामी संस्कृतीत कुराणा च्या लेखन-सजावटीला कलाविष्कारांत विशेष प्राधान्य होते. साधारणपणे मुद्रणपूर्व, हस्तलिखित-शोभनाच्या काळात भारतात सुलेखनकलेचा उदय व उत्कर्ष झाल्याचे दिसून येते. सम्राट हर्षवर्धनाची (सातवे शतक) स्वाक्षरी, धार शिलालेख अशा काही उदाहरणांतून सुलेखन शैलींचे नमुने आढळतात. अकराव्या शतकात जैन सुलेखनकला अतिशय समृद्घ अवस्थेत होती. देवनागरी अक्षरवळणांशी साधर्म्य असलेली जैन लिपीतील अक्षरे सुलेखन शैलींचे विविध नमुने दर्शवितात. ताडपत्रावरील लिपिरेखन बौद्घ प्रज्ञापारमिता हस्तलिखितात (दहावे-अकरावे शतक) आढळते. साधारण बाराव्या ते सोळाव्या शतकांत निर्माण झालेल्या जैन सचित्र हस्तलिखितांतून सुलेखनाचे विविध नमुने आढळतात. विशेषतः कल्पसूत्र, कालकाचार्य कथा (१४५२) या सचित्र हस्तलिखित ग्रंथात सुलेखनाचे उत्तम नमुने आढळतात.
अहमदाबाद येथील लालबाई दलपतभाई संग्रहालयात निवडक जैन हस्तलिखितांचे नमुने पाहावयास मिळतात. जैन मंदिरे व ‘देरासरे’ (जैन घरांच्या मंदिरांतील गाभारे) भारतात सर्वत्र आढळतात. या मंदिरांच्या व देरासरांच्या ग्रंथभांडारांत उत्कृष्ट सुलेखनाने युक्त हस्तलिखित ग्रंथ अद्यापही जतन केलेले दिसून येतात. जैन हस्तलिखितांमुळे जगाला भारतीय सुलेखनशैलीची, अल्प प्रमाणात का होईना, पण ओळख झाली. बौद्घांच्या ललितविस्तार या संस्कृत ग्रंथात प्राचीन भारतीय साठ लिप्यांचा निर्देश आहे. शिवाय सुलेखनक्रियेची शास्त्रोक्त व मुद्देसूद मांडणी या ग्रंथात आढळते. सुलेखनाची लेखणी (बोरु), तिची लांबी-रुंदी, बोरु तासण्याची, शाई बनविण्याची, कागद बनविण्याची पद्घती इ. तसेच ग्रंथाचे पान कसे असावे, अक्षराच्या उंचीची ओळ कशी आखावी, अशा स्वरुपाची विविध माहिती ललितविस्तार या ग्रंथात आढळते. देवनागरी व जैन सुलेखनशैलींचे असंख्य नमुने हस्तलिखितांतून पाहावयास मिळतात. ह्या काळात दाक्षिणात्य राज्यांमध्ये जी हस्तलिखिते तयार झाली, ती ‘शलाका’ नामक सुईसारख्या अणकुचीदार लोखंडी लेखणीने ताडपत्रावर कोरलेली असत. तमिळ व ओडिया भाषांतील अनेक हस्तलिखित पोथ्यांतून वर्तुळाकार सुलेखनशैलींचे नमुने आढळतात. तिबेटी मठांत व देवळांत पारंपरिक पद्घतीचे सुलेखन अद्यापही अत्यंत श्रद्घेने केले जाते. ‘उचेन’ व ‘उमेन्’ ह्या तिबेटी सुलेखनशैली त्यात पाहावयास मिळतात. तिबेटी अक्षरांशी आकारसाधर्म्य असलेले बंगाली सुलेखनाचे नमुनेही दिसून येतात. बंगाली अक्षराकार त्रिकोणात्मक; ओडिया, तमिळ, तेलुगू, मलयाळम्, कन्नड अक्षराकार वर्तुळात्मक, तर देवनागरी, गुजराती व गुरुमुखी (पंजाबी) अक्षराकार चौकोनात्मक अशी आकारविल्हे स्थूल वर्गवारी भारतीय भाषांच्या लिप्यांची करता येईल. त्या त्या भाषा-लिप्यांच्या सुलेखनशैलींतून ही अक्षराकार वळणे दिसून येतात.
भारतात मोगल राजवटीत (सोळावे-अठरावे शतक) इस्लामी सुलेखनकलेचा विकास घडून आला. कुराणा च्या शोभित हस्तलिखितांच्या सजावटीतून सुलेखनाचे विविध उत्कृष्ट नमुने आढळतात. अकबराने ग्रंथसजावटीला विशेष प्रोत्साहन दिले. त्याने आपल्या कारकीर्दीत चोवीस हजारांहून अधिक हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्घ करवून घेतले. ग्रंथसजावटीत चित्रासंबंधीचे सुलेखन चित्रावरच केले जाई व चित्राचाच एक भाग म्हणून पाहिले जाई. ह्या लयदार व एकसंध सुलेखनामुळे चित्राला उठाव येत असे. हे सुलेखन स्वतंत्र सुलेखनकाराकडून करुन घेतले जाई. ऐतिहासिक वृत्तांत, काव्यग्रंथ, कथनपर ग्रंथ अशा विविध प्रकारच्या हस्तलिखित ग्रंथांच्या सजावटींतून सुलेखनाच्या नानाविध शैलींचे उत्कृष्ट नमुने पाहावयास मिळतात. ‘शिरीन कलम’ (सुंदर लेखणी) हा त्या काळातला श्रेष्ठ सुलेखनकार होता. दारा शुकोह हा देखील सिद्घहस्त सुलेखनकार होता. मोगलकालीन अरबी-फार्सी लिप्यांतले उर्दू सुलेखनाचे उत्कृष्ट नमुने, चित्रे व हस्तलिखिते यांतून पाहावयास मिळतात. कूफिक, नक्शी, नस्तालिक, तुलुथ, रेहानी, मघरिबी इ. सुलेखनशैली या काळात प्रचलित होत्या. ग्रंथसजावटीप्रमाणेच अन्य कलाप्रकारांतही सुलेखनाचा वापर केला जाई. मशिदी व अन्य धार्मिक इमारती, विविध वस्तू यांवर कुराणा तील संदेश सुलेखनाने व आलंकारिक सजावटीने कोरले जात. सुलेखनात बऱ्याचदा वेलबुट्ट्या वा भौमितिक आकृत्या चितारल्या जात. अल्तमशच्या कबरीवर (१२३६) कूफिक शैलीत कोरलेले सुलेखन आढळते. कुतुबमिनार (सु. ११९९–१३६८), ताजमहाल (१६३२–१६५२) यांसारख्या वास्तूंमध्ये दगडावर कोरलेली तसेच शिसे भरुन केलेली इस्लामी सुलेखनशैली पाहावयास मिळते. लपेटदार व लयबध्द उर्दू लिपीतील ही अक्षरे बव्हंशी नस्तालिक शैलीत कोरली आहेत, असे दिसून येते. ताजमहालाच्या भव्य प्रवेशद्वाराच्या कमानीभोवती कुराणा चे आयते कोरले आहेत. ‘तुलुथ’ सुलेखनशैलीत ते कोरले आहेत. सतराव्या शतकातील वास्तूंवर पुरालेख कोरण्यासाठी तुलुथ ही प्रवाही सुलेखनशैली विशेषतः प्रचलित होती. मुमताज व शाहजहान यांच्या कबरीवरील स्मृतिलेख फार्सी लिपीत असून ते अनुक्रमे नक्शी व नस्तालिक सुलेखनशैलींत आहेत. शीराझ येथील अब्द-उल्-हक (‘अमानत खान’ उपाधीने प्रसिद्घ) याचा सुलेखनकार म्हणून निर्देश आढळतो.
भारतातील मुद्रणपूर्व काळातील लिप्यांच्या सुलेखनाबाबत अद्यापही पुरेशा प्रमाणात अभ्यास व संशोधन झालेले नाही. अक्षरांच्या आकारसौंदर्याच्या अंगाने भारतीय लिप्यांच्या सुलेखनाचा शास्त्रीय, पद्घतशीर अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात चित्रकलेच्या क्षेत्रात वाणिज्य कला (कमर्शिअल आर्ट) हा नवा विभाग अस्तित्वात आला आणि त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या व्यावसायिक चित्रकारांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांना जास्त आकर्षक व कलात्मक रुप देण्यात बहुमोल कामगिरी बजावली. मुखपृष्ठांवर आकर्षक रंगीबेरंगी चित्रांबरोबरच कलात्मक अक्षरलेखनही ग्रंथ व ग्रंथकार यांच्या शीर्षकांसाठी वापरले जाऊ लागले. मराठी सुलेखनकलेचा हा प्रारंभकाळ म्हणता येईल. १९१०–१९३६ या काळात मुखपृष्ठसजावटीत व अक्षरालंकरणात विकासात्मक बदल होत गेले. ग्रंथांप्रमाणेच वृत्तपत्रे, नियतकालिके यांची शीर्षके, लेखशीर्षके, मथळे, उपशीर्षके अशा सर्वच घटकांत, जिथे-जिथे शक्य व सोईस्कर असेल अशा ठिकाणी कलात्मक, अलंकरणात्मक अक्षरलेखन दिसू लागले. मराठी सुलेखनकलेचा विकास अनेक अंगोपांगांनी, विविध क्षेत्रांत होत गेला. चित्र, छायाचित्र आणि सुलेखन यांच्या कलात्मक संतुलित संयोजनातून साधलेले जाहिरातींचे आकृतिबंध नाटक, चित्रपटांच्या जाहिरातींतून प्रदर्शित होऊ लागले. चित्रपट, नाटके यांच्या जाहिरातींसाठी अक्षराकृतिबंध तयार करुन ते जाहिरातफलक (पोस्टर्स), वृत्तपत्रीय जाहिराती अशा अनेक माध्यमांत विपुलतेने व वैविध्यपूर्ण रीतीने उपयोजिले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळातील ग्रंथ, नियतकालिके आदींच्या चित्राक्षर- सजावटीसाठी नावाजलेल्या चित्रकारांत दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर प्रभृतींची नावे आवर्जून घ्यावी लागतील.
ग्रंथसजावट, नाटक-चित्रपटांच्या जाहिराती यांप्रमाणेच विविध व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक आदी संस्थांच्या जाहिरातींत आधुनिक काळात सुलेखनाचा वापर वैपुल्याने व आकर्षक, कलात्मकरीत्या होऊ लागला. त्यायोगे सुलेखनकलेचे उपयोजित मूल्य उत्तरोत्तर वाढत गेले. त्याचा अप्रत्यक्ष फायदा उत्पादित वस्तूंच्या, ग्राहकसेवांच्या विक्री- वृद्घींत होऊ लागल्याचे दिसून येते.
रघुनाथ कृष्णकांत ऊर्फ र. कृ. जोशी (१९३६–२००७) हे आधुनिक मराठी सुलेखनकलेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. मराठी अक्षरांचा आकार-अंगाने शास्त्रशुद्घ व सौंदर्यलक्ष्यी विचार सातत्याने करुन व सुलेखनाचे नानाविध प्रयोग करुन त्यांनी आधुनिक मराठी सुलेखनक्षेत्रात पायाभूत कार्य केले. १९५६ मध्ये उपयोजित कलेतील जी. डी. आर्ट ही पदविका मिळवून त्यांनी नंतरच्या काळात एका नामवंत देशव्यापी जाहिरात संस्थेत काम केले. त्यांनी स्वतःच्या शैलीत जी सुलेखने केली, त्यांतून त्यांनी भारतीय अक्षराकार संस्कृतीचा अविरत घेतलेला ध्यास जाणवतो. त्यांनी सर्व भारतीय भाषालिपींना सामावून घेणारी देशभारती ही सामायिक भारतीय लिपी तयार केली व सुलेखनामध्ये आणि मुद्राक्षरांमध्ये अनेकविध प्रयोग केले. संगणक तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर त्यांनी सुलेखनात करुन घेतला. त्यांनी काव्यपंक्ती व सुलेखनयुक्त अक्षराकार यांचा अपूर्व मेळ साधून ‘मूर्त कविता’ हा आगळावेगळा प्रयोगशील दृक्काव्यबंधाचा प्रकार निर्माण केला. त्यांच्या या मूर्त कविता सत्यकथा मासिकातून साधारण १९६५ पासून वेळोवेळी प्रसिद्घ होत गेल्या. १९७० साली त्यांनी ‘ हॅपनिंग्ज’ हा सुलेखनाचा नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केला. सर्वसामान्यांमध्ये सुलेखनकलेविषयी जाण निर्माण व्हावी व ती वाढीस लागावी, या दृष्टीने त्यांनी शोधनिबंध, व्याख्याने, प्रात्यक्षिके, माहितीप्रधान प्रदर्शने इ. स्वरुपाचे कार्य केले. सुलेखनविषयक शिक्षण व संशोधन क्षेत्रातही त्यांनी मौलिक कामगिरी बजावली. उपयोजित कलेच्या शिक्षणात भारतीय सुलेखनकला व मुद्राक्षरलेखनकला यांना प्राधान्य व महत्त्व प्राप्त होण्याच्या दृष्टीने त्यांनी अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल सुचविले.
र. कृ. जोशी यांनी जुन्या पोथ्यांमधील अक्षरांची वळणे अभ्यासण्यासाठी एशियाटिक लायब्ररी, मुंबई येथे दोन वर्षे सातत्याने संशोधनकार्य केले. एशियाटिक ग्रंथसंग्रहालयातील जुन्या दुर्मिळ हस्तलिखितांतील देवनागरी सुलेखनशैलींचे त्यांनी प्रथमतः वर्गीकरण केले. त्यांतील वैशिष्ट्यपूर्ण शैलींचे अक्षराकार ते स्वतः मुळाबरहुकूम नकलून काढत. त्यामुळे त्या त्या सुलेखनशैलीतील आंतररचनातत्त्व त्यांना पूर्णतः उमगले होते. सदर हस्तलिखितांच्या शास्त्रशुद्घ संशोधनाचे सार त्यांनी काल्टिस ८३ या अक्षर-आकार संशोधनास वाहिलेल्या संशोधनपत्रिकेत शोध-निबंध लिहून मांडले आहे. (‘इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर’, आय्आय्टी., पवई येथे १९८३ मध्ये झालेल्या चर्चासत्रात वाचलेला शोधनिबंध). र. कृ. जोशी यांनी अक्षरयोग नावाची आंतरराष्ट्रीय सुलेखन कार्यशाळा व परिसंवाद पुणे येथे १९८६ मध्ये आयोजित केला होता. त्यातून अनेक सुलेखनकारांना प्रेरणा मिळाली व भारतीय सुलेखनाची ओळख जागतिक पातळीवर होऊन त्याविषयीचे कुतूहल वाढीस लागले. र. कृ. जोशी यांनी उल्का जाहिरात संस्थेच्या नावे सुलेखनातील संशोधनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुलेखनकारांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. ओडिया भाषालिपीच्या सुलेखनासाठी एस्. के. मोहंती आणि मराठी सुलेखनासाठी अच्युत पालव हे या शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी होत. एस्. के. मोहंती यांनी ओडियाप्रमाणेच अनेक मुद्राक्षरांच्या निर्मितीमध्ये लक्षणीय व विपुल प्रमाणात काम केले.
अच्युत पालव (१९६०) यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला (१९८३). मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली. शैक्षणिक व संशोधन दृष्ट्या त्यांचे हे काम मोलाचे आहे. त्यांच्या सुलेखनात मोडी लिपीतून आलेला देवनागरी गोडवा हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्र शासनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या आपला महाराष्ट्र व मार्ग प्रकाशनाच्या महाराष्ट्र या पुस्तकांत मुक्त लिपीच्या सुलेखनाचे नमुने आढळतात. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ह्या संतांच्या काव्यरचनांना सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी देखणे रुप दिले. तसेच ओम-अल्ला सारख्या सुलेखन-प्रदशर्नांतून सामाजिक बांधीलकी प्रकट केली. जर्मनीतील ‘क्लिंगस्पोर’ या प्रख्यात सुलेखन संग्रहालयात आपली अक्षरचित्रे मांडणारे ते एकमेव भारतीय सुलेखनकार होत.
त्यानंतरची उल्का शिष्यवृत्ती संतोष क्षीरसागर यांना देण्यात आली. या शिष्यवृत्तीच्या काळात, शिष्यवृत्तीचा त्यांचा संशोधनाचा विषय ‘सुलेखन साहित्य-सामुग्री व पृष्ठभाग याचा जागतिक अभ्यास’ हा होता. आजपर्यंत जगातील अनेक परंपरागत सुलेखनशैलींची कारणे ही लेखनसामुग्री साहित्य असून, सुलेखनाचा तो अविभाज्य घटक आहे व म्हणून त्यातूनच उद्याच्या अक्षर सुलेखनाचे प्रयोग करणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. संतोष क्षीरसागर यांनी नंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. र. कृ. जोशींच्या प्रेरणेतून व शिकवणुकीतून त्यांनी सुलेखनाचे सर्जनशील विविधांगी प्रयोग केले व त्यांच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी त्या दिशेने प्रयोगशीलतेकडे प्रवृत्त केले. भारतीय सुलेखनाचा प्रचार, प्रसार व प्रबोधन करण्यासाठी त्यांनी त्यांचे शिक्षक व सहाध्यायी विनय सायनेकर यांच्या साहाय्याने ‘अक्षराय’ नावाची चळवळ सुरु केली. महाराष्ट्रातील अन्य नावाजलेल्या सुलेखनकारांमध्ये दत्तात्रय पाडेकर, चंद्रमोहन कुलकर्णी, कमल शेडगे यांचे उल्लेख करावे लागतील. त्यांचे व्यावसायिक योगदान व प्रसिद्घीमाध्यमांसाठी त्यांनी केलेली सुलेखने यांतून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. कमल शेडगे हे एक लोकप्रिय व्यावसायिक सुलेखनकार असून त्यांचे अक्षरणावरील प्रभुत्व नजरेत भरणारे आहे. नाटके, चित्रपट, विविध सांस्कृतिक संस्था, पर्यटन संस्था आदींच्या जाहिरातींतील सुलेखनकामामुळे ते प्रसिद्घीच्या झोतात आले. त्यांच्या कमलाक्षरं (२००९) या पुस्तकात त्यांच्या सुलेखनाचे विविध नमुने पाहावयास मिळतात.
लेखक : श्री. दे. इनामदार
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020