अशा ह्या ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या क्रियाशील ढगात सूक्ष्म मेघकणांचे किंवा हिमस्फटिकांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया सहजगत्या उपलब्ध झालेल्या असतात. त्यांत सर्वांत प्रभावी प्रक्रिया म्हणजे जलबाष्पयुक्त हवेचे ऊर्ध्वगतीवर पाऊस किती पडेल हे अवलंबून असते, असे आधुनिक वातावरणवैज्ञानिक संशोधनान्ती सिद्ध झाले आहे. पाऊस केव्हा आणि कोठे पडेल हे प्रश्न त्या मानाने गौणच ठरतात. प्रारण (तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात उष्णता वाहून नेणे), संवहन (प्रत्यक्ष कणांची हालचाल न होता उष्णता एका कणाकडून दुसऱ्याकडे वाहून नेली जाणे) आणि संमिश्रण ह्या प्रक्रियाही ढगात सातत्याने घडतच असतात; पण ऊर्ध्व प्रवाहांना न जुमानता सूक्ष्ममेघकणांपासून भूपृष्ठावर पडणाऱ्या मोठ्या पर्जन्य बिंदूंच्या निर्मितीच्या बाबतीत त्यांची कार्यक्षमता कमीच असते. दव, हिमतुषार (तुहिन), धुके, मंद तुषारवृष्टी यांसारखे कमी लक्षवेधी आविष्कारच ते निर्माण करू शकतात.
साधारणपणे मेघकणांचा व्यास २० ते ४० (१=१०–३ मिमी.) असतो. आणि त्यांचा पतनवेग (वातावरणातून खाली येण्याचा वेग) ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो. हे कण पर्जन्यरूपाने खाली पडू शकत नाहीत. मंद तुषारवृष्टीत जलबिंदूचा व्यास साधारणपणे २००μकिंवा ०.२ मिमी. असतो. मात्र तो ०.५ मिमी. पेक्षा अधिक नसतोच. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असताना दिसतात. पर्जन्यबिंदूचा व्यास १ ते ६ मिमी. या अभिसीमेत पण सरासरीने २ मिमी. असतो. मोठ्या पर्जन्यबिंदूचा व्यास ६०००μ (०.६ सेंमी.) एवढा असू शकतो आणि त्यांचा पतनवेग ७० सेंमी. / सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो. पर्जन्यबिंदू व मेघकण यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर १०:१ असे असते. पावसाच्या एका थेंबात १० लक्ष मेघकण सामाविले जाऊ शकतात. मेघकण वाढून मोठा झाला की, पाऊस पडणे शक्य होते. आर्द्रतम हवा वर जाऊ लागल्यास मेघकणही वर खेचले जातात. ते एकमेकांवर आदळू लागतात. कधीकधी ते फुटतात तर कधीकधी ते फुटतात तर कधीकधी त्यांचे संमीलन होते. अशा ‘आघात व संमीलन’ क्रियेमे परिणामी थेंबाचा आकार वाढतो. त्यांचा पतनवेगही वाढतो. हा पतनवेग ढगातील ऊर्ध्व प्रवाहाच्या वेगापेक्षा अधिक झाला की, ते थेंब पर्जन्यरूपाने खाली पडू लागतात. खाली पडताना ते थेंब लगतची हवाही ओढतात. त्यामुळे अधःप्रवाह निर्माण होतात. कधीकधी त्यांना द्रुतप्रवेगी ⇨ चंडवातांचे स्वरूप येते. काही शीत ढग हिमरेषेपेक्षा (वातावरणात ०° से. तापमान असलेल्या पातळीपेक्षा) उंच वाढतात. त्यांत बर्फकण व अतिशीतित पाण्याचे थेंब निर्माण झालेले असतात. ते समोरासमोर आले की, बर्फकणांवर अतिशीतित जलबिंदूचे आक्रमण होते. बर्फकण आकारमानाने वाढू लागतात. ते फार मोठे झाले की, खाली पडू लागतात. बर्फाच्या स्वरूपात जमिनीकडे येणाऱ्या घनीभूत जलबिंदूचे खालील हवेच्या अधिक तापमानामुळे पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडू लागतो. हिमरेषेच्या खाली असलेल्या उष्णतर ढगांतील पर्जन्यबिंदू ‘आघात व संमीलन’ क्रियेनेच मोठे होतात व पाऊस पडतो. पाऊस पडण्यास ढगांतील ऊर्ध्व प्रवाह विशेषकरून कारणीभूत होतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/10/2020