(१५ ऑक्टोबर १५४२-२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील ⇨हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे जन्म. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आग्रा येथे मृत्यू. याच्या जन्ममृत्यूच्या तारखांत एकवाक्यता दिसून येत नाही.
हिंदूस्थानला आपला देश मानणारा हा पहिला मुसलमान राजा होय. मोगल साम्राज्याचा पाया मजबूत करणाऱ्या या राजाचे व्यक्तिमत्त्व लहानपणीच अनेक आपत्तींतून तावूनसुलाखून निघालेले होते. राज्यारोहणप्रसंगी (१५५६) त्याच्या ताब्यात निश्चित असा कुठलाच प्रदेश नव्हता. विश्वासार्ह असे सैन्यही त्याच्या हुकमतीखाली नव्हते. तरीही त्याने आपला पालक बैरामखान याच्या मदतीने आपला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी मुहम्मदशाह आदिल सूर ह्याचा दिवाण हेमू याचा पानिपतच्या मैदानावर नि:पात केला (१५५६). नंतर सिकंदर सूरसारख्या इतर प्रतिस्पर्ध्यांनाही शरणागती पतकरण्यास लावून दिल्लीचे आपले आसन त्याने स्थिर केले.
१५५६ पासून १५६० पर्यंत पालक म्हणून सर्व सत्ता बैरामखानाच्याच हातात होती. परंतु बैरामखानाच्या क्रूर व अन्यायी कारभारामुळे असंतोष पसरला, म्हणून अकबराने युक्तीने त्याच्या हातून सत्ता काढून घेतली. बैरामने बंड केले; पण शेवटी त्यास अकबरास शरण जावे लागले. अकबराने त्यास सन्मानाने वागविले. पुढे बैरामखान मक्केस जात असताना त्याचा एका अफगाणाने खून केला.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
जहांगीर : (३० ऑगस्ट १५६९–२८ ऑक्टोबर १६२७). अकबराचा...