(१८३८-१८४२). अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटतहोती. त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले. याच सुमारास रणजितसिंगाने घेतलेला पेशावर प्रांत परत जिंकून घेण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले. सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदाहार येथे पोहचली. शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदाहारला पोहोचली. इंग्रजांनी १८३९ च्या एप्रिल महिन्यात कंदाहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल घेतले.
दोस्त महंमद बूखाऱ्याला पळाला. त्यानंतर इंग्रजांनी त्याला कलकत्त्यात कैदेत ठेवले. इंग्रजांनी शाह शुजाला गादीवर बसवून त्याच्या संरक्षणासाठी तेथे फौज ठेवली. त्यामुळे अफगाण चिडले. दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान याने बंड करुन १८४१ मध्ये बर्न्स, मॅकनॉटन व इतर अधिकारी यांचे खून केले. त्यानंतर मेजर हेन्री पॉटिंजर आला. त्याने पूर्वी झालेला तह अंमलात आणून जलालाबाद, गझनी व कंदाहार ही स्थळे सोडून देण्याचे ठरविले. परत जाणाऱ्या इंग्रजांची अफगाणांनी खैबर खिंडीत कत्तल केली. बाहेरुनही मदत मिळण्यास इंग्रजांना अडचण पडू लागली. गव्हर्नर जनरल नॉर्थब्रुकने सैनिकांना माघार घेण्यास सांगितले. अखेरीस खजिना व तोफा अफगाणांच्या स्वाधीन करुन इंग्रजांनी माघार घेतली. या युद्धामुळे इंग्रजांचा काहीच फायदा झाला नाही. ज्या शाह शुजासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले, त्याचाच अफगाणांनी खून केला. ऑक्लंडच्या आक्रमक धोरणामुळे निष्कारण पैसा खर्च होऊन २०,००० लोक मृत्युमुखी पडले.
(१९१९). पहिल्या दोन युद्धांत इंग्रजांनी अफगाणिस्तानावर स्वारी केली होती. तिसऱ्या वेळी मात्र अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. अमीर ð अमानुल्ला याने अफगाण लोकांच्या दडपणामुळे १९१९ च्या एप्रिल महिन्यात ब्रिटिश प्रदेशावर आक्रमण केले. हे युद्ध फक्त दोनच महिने चालू होते. अफगाण लोकांनी खैबर खिंडीतून पेशावरच्या परिसरात हल्ले केले. इंग्रजांनी विमानासारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झाले. १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात तह झाला .अफगाणिस्तानला परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांकडून अमीराला मिळणारे आर्थिक साहाय्य बंद झाले. या युद्धानंतर इंग्रज अफगाण संबंध सुधारले.
संदर्भ: 1. Majumdar, R.C. Ed. British Paramountcy and Indian Renaissance-Part I, Bombay, 1963.
२. Fraser-Tytler, W. K. Afghanistan, London, 1950.
गोखले, कमल
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/24/2020