दक्षिणेकडील राजांचा पराभव केला. श्रीलंकेवर स्वारी केली आणि तेथून बारा हजार बंदी आणून त्यांच्याकडून पुहारनाम
क बंदराची तटबंदी करविली. त्याची न्यायीपणाबद्दल आणि लोकोपयोगी कृत्यांबद्दलही ख्याती होती. त्याने श्रीरंगम् येथे कावेरीला मोठा कालवा खणून बरा
च मोठा प्रदेश सुपीक केला. त्याची राजधानी तिरुशिरापल्लेजवळ उरगपुर (उरैयूर) येथे होती. त्यानंतर मात्र दीर्घ कालपर्यंत चोलांची काही माहिती मिळत नाही. सहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चोल वंशाचे सर्वसामान्य निर्देश मिळतात; पण व्यक्तिनिर्देश आढळत नाहीत. सातव्या शतकातील एका ताम्रशासनात पुण्यकुमार चोल व त्याच्या पूर्वीच्या तीन पिढ्यांतील पूर्वज यांची सु. शंभर वर्षांची माहिती मिळते. पुढे नवव्या शतकाच्या मध्यास विजयालय नामक चोल राजा पल्लवांचा मांडलिक म्हणून वावरत असल्याचे दिसते. त्याने दोन वेल्लार नद्यांमधील पांड्यांचा प्रदेश जिंकून तंजावर येथे आपली राजधानी केली. त्याचा मुलगा आदित्य (सु. ८७१—९०७) हा महत्वाकांक्षी निघाला. त्याने पल्लव सम्राटाचा उच्छेद करून तोंड्डमंडल प्रदेश आपल्या राज्यास जोडला. त्याचा मुलगा परांतक याने भारताच्या अगदी दक्षिण टोकापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.
पूर्वी पल्लवांचे आणि बादामीच्या चालुक्यांचे कित्येक पिढ्या वैर चालू होते, तसे आता त्यांचे उत्तराधिकारी चोल व राष्ट्रकूट यांच्यामध्ये वैर चालू झाले. राष्ट्रकूट नृपती तिसऱ्या कृष्णाने ९४९ मध्ये परांतकाचा पूर्ण पराभव करून त्याचे साम्राज्य खिळखिळे केले.
पुढे पहिला राजराज (९८५—१०१८) या चोल राजाच्या कारकीर्दीत चोलांना पुन्हा ऊर्जितावस्था आली. त्या वेळी राष्ट्रकूटांचा अस्त होऊन कल्याणीच्या चालुक्यांचा उदय झाला होता. राजराजाने केरल (चेर) व पांड्य राजांचा पराभव केला, मालदीव बेट जिंकले आणि श्रीलंकेवर स्वारी करून त्यांचा उत्तर भाग व्यापला. त्याने वेंगीच्या सिंहासनावर आपला हस्तक शक्तिवर्मा याला बसवून तेथेही आपली सत्ता पसरविली. त्याने राज्यकारभारात व जमाबंदी खात्यांत सुधारणा घडवून आणल्या. एकंदरीत त्याने पुढील चोल साम्राज्याचा पक्का पाया घातला. त्याने कित्येक भव्य मंदिरे बांधली. तंजावरचे राजराजेश्वर (सध्याचे बृहदीश्वर) मंदिर त्याच्या काळच्या स्थापत्य व शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
राजराजाने आपला पुत्र राजेन्द्र (१०१२—४४) याला युवराज म्हणून आपल्या हयातीतच नेमले होते. तो पित्याइतकाच थोर निघाला. त्याने उत्तरेत गंगानदीपर्यंत दिग्विजय केला आणि जाताना कलिंग, दक्षिण कोसल, बंगाल इ. प्रदेशांच्या राजांचा पराजय करून त्यांना गंगेचे पवित्र जल वाहण्यास लावले. परत आल्यावर त्याने गंगैकोंड (गंगाविजयी) पदवी धारण केली आणि आपल्या नावे गंगैकोंडचोळपुरम् नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. तेथे अनेक सुंदर देवालये व प्रासाद बांधले, वेदांच्या अध्ययनाकरिता मोठे विद्यालय स्थापन केले व शेतीकरिता सु. सव्वीस किमी. लांबीचा विशाल तलाव खोदून त्यास गंगासागर नाव दिले.
राजेन्द्र चोलाने याहीपेक्षा मोठा आणि अद्वितीय असा विक्रम केला. त्याने आपल्या आरमाराच्या साहाय्याने जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प यांवर स्वारी करून तत्कालीन शैलेंद्रांच्या साम्राज्याचा विध्वंस केला. अशा रीतीने तो उत्तरेस गंगेपासून दक्षिणेत श्रीलंकेपर्यंत आणि पूर्वेस मलाया द्वीपकल्पापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा अधिपती झाला.
राजेन्द्राच्या १०४४ मध्ये झालेल्या निधनानंतर त्याचा पुत्र राजाधिराज गादीवर आला. त्याचे उत्तरकालीन चालुक्य नृपती पहिला सोमेश्वर याच्याशी १०५३-५४ मध्ये कोप्पम् येथे घनघोर युद्ध होऊन त्यात तो मारला गेला; पण तेथेच रणभूमीवर त्याचा भाऊ दुसरा राजेन्द्र याने स्वतःस राज्याभिषेक करवून विजयश्री आपणाकडे खेचून घेतली.
यानंतर चोल व चालुक्य यांच्या अनेक चकमकी झाल्या. चोल नृपती वीर राजेन्द्र (१०६३—६९) याने आपली कन्या महाप्रतापी चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य यास देऊन हे पिढीजात वैर शमविण्याचा प्रयत्न केला; पण तो सफळ झाला नाही. कारण त्याच्या मुलाला पदच्युत करून पहिला कुलोत्तुंग (१०७०—११२२) याने गादी बळकाविली, तेव्हा पुन्हा चोल-चालुक्यांचे युद्ध जुंपले. विक्रमादित्याने आपल्या मेहुण्याचा पक्ष घेऊन कुलोत्तुंगावर स्वाऱ्या केल्या; पण त्यांत त्याला यश आले नाही.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020