एखादा प्रदेश जिंकून तेथील मूळच्या रहिवाशांना अंकित करून किंवा मुळीच वस्ती नसलेल्या प्रदेशात नव्याने वसाहत करून जनपदांची स्थापना होई. प्रस्थापित करावयाच्या जनपदाचे कौटिल्याने जे वर्णन दिले आहे; त्यावरून असे दिसते की, सामान्यतः एका जनपदास सु. आठशे खेडी व इतर अनेक लहानमोठी गावे असत. जनपदाची राजधानी बहुधा एका किल्ल्यात असे. जनपदाचे दोन प्रकार होते : एकावर राजाचा सत्ता चाले, तर दुसरी गणराज्ये होती. गणराज्यांत शासनाचे विविध प्रकार चालू असत. जनपद राजाधीन वा गणाधीन कसेही असले, तरी त्याचा कारभार सभा व परिषद यांच्या मार्गदर्शनानुसारच चाले. जनपदांचे मध्य, प्राच्य, उदीच्य, दक्षिणापथ, अपरांत, विंध्यपृष्ठ व पर्वत असे सात भौगोलीक विभाग केलेले असत.
प्राचीन राज्यशास्त्रात राज्याच्या सात अंगापैकी (राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र) जनपद हे एक अंग आहे. येथे राज्याचे ग्रामीण भाग व तेथे असलेले लोक असा जनपदाचे अर्थ आहे. बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आहे. ती अशी : अंग, मगध, काशी, कोशल, विदेह, मल्ल, चेदी, वत्स, कुरू, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गंधार व कंबोज. त्यांपैकी काशी, कोशल, विदेह व मगध ही जनपदे विशेष प्रसिद्धीस आली. यांशिवाय इतर अनेक जनपदांचे उल्लेख पुराणांतून आढळतात.अमरकोशात देश, राष्ट्र, विषय, जनपद हे शब्द समान अर्थी योजले आहेत.
ही जनपदे म्हणजे केवळ भौगोलिक विभाग नव्हते; तर प्रत्येक जनपदातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन स्वतंत्र असे आणि स्वतंत्रपणेच विकसित होत होते. प्रत्येक जनपदाची भूमी तिथल्या रहिवाशांची खरीखुरी धात्री अर्थात माता होती. त्यांची भाषाही एकच असे. ते समान देवतांची पूजा-अर्चा व उपासना करीत. त्यामुळे त्यांच्यात भ्रातृभाव वसत असे.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/23/2020