भारतीय घटनाकार, थोर समाजसुधारक आणि अभ्यासक म्हणून त्यांना संबोधिले जात आहे आणि ते एक प्रकारे खरेच आहे. परंतू यापलिकडे जाऊन असे म्हणता येईल की, मनुष्य हा केंद्रबिंदू धरून त्याला अधिकाराने पाहिजे असलेला न्याय मिळविण्यासाठी त्यांनी जो अभूतपूर्व संग्राम उभा केला त्याला जगाच्या इतिहास खरोखरच तोड नाही. या अन्यायाविरूद्ध झगडण्यासाठी त्यांनी आपली उभी हयात वेचली. या त्यांच्या कार्यामागे एक तात्त्विक अधिष्ठान होते. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक म्हणून जगात ओळखले जातात. अशा या थोर महापुरूषाच्या पुढे उद्धृत केलेल्या आठवणी त्यांच्या स्वभावाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकतील यात शंका नाही.
मला असे वाटते की, ते वर्ष 1937 असावं परळला एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर एका बाजूला श्री. बाळासाहेब खरे आणि दुसऱ्या बाजूला डॉ. ना. भा. खरे बसले होते भाषणाला प्रारंभ करण्यापूर्वी बाबासाहेबांनी एकदा बाजूला मग दुसरीकडे वळून पाहिले आणि थोडे हसत म्हणाले, ‘‘आज माझ्या एका बाजूला काँग्रेसची आवडती आणि दुसऱ्या बाजूला न आवडणारी असे दोघेजण बसले आहे. मी मात्र दोघांच्या मध्ये बसलो असल्यामुळे माझी स्थिती मोठी विचित्र झाली आहे.’’ तेव्हा उपस्थित श्रोत्यांना बोलण्याचे मर्म लक्षात घेऊन सगळीकडे हंशा पिकला.
बहूधा 1943 वर्षाची गोष्ट असावी त्यावेळी बाबासाहेब व्हाईसरॉय एक्झिकेटीव्ह कॉन्सिलचे मजूरमंत्री होते. मंत्री झाल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, खाण कामगारांना फार कमी रोजंदारी देण्यात येते. या मध्ये वृद्धी होणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटत होते. झाले! बाबासाहेब आंबेडकरांनी एका दमात ही वाढ दुप्पट करण्याचे आदेश दिले. म्हणजे दिवसाची रोजंदारी सहा आण्यावरून बारा आणे करण्यात आली. खात्यातील अनुभवी अधिकाऱ्यांनी अशी घाईघाईने वृद्धी करू नये असा सल्ला दिला. परंतू बाबासाहेब थोडेच ऐकणार? गरिबीचे चटके स्वतःच अनुभवले असल्यामुळे बाबासाहेबांनी अधिकाऱ्याचा सल्ला मानला नाही. काही दिवसानंतर बाबासाहेबांनी काढलेल्या आदेशामुळे कोणता परिणाम झाला याची सहज विचारपुस केली. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, आदेश निघून दोन-चार दिवस काम केल्यावर अनेक खाणीतील कामगार कामावरच आले नाहीत. ते दारू पिऊन घरी बेहोश पडले आहेत.
बाबासाहेबांना या वेळेस आपली चूक लक्षात आली आणि नंतर त्यांनी उद्गार काढले. ‘‘कामगारांना केवळ वेतन वाढवून चालणार नाही. तर त्या सोबत हा मेहनतीने मिळविलेला पैसा कुटूंबातील घर खर्चासाठी योग्यरित्या कसा वापरला जाईल याचेही त्यांच्यावर सुरुवातपासून संस्कार केले पाहिजेत.’’
सिध्दार्थ महाविद्यालय अगोदर मरीन लाईन्स वरील सुंदराबाई हॉल शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील बॅरॅक्समध्ये भरत असे, ह्या बॅरॅक्स दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या असल्यामुळे त्या नियमित राहणे शक्य नव्हते. यावेळेस फोर्ट इलाख्यात फ्लोरा फाऊंटनच्या जवळ जपानी बँकेच्या मालकीच्या दोन भव्य इमारती रिकाम्या होत्या. ह्या इमारती महाविद्यालयासाठी सुयोग्य आहेत असे लक्षात येताच बाबासाहेबांनी दिल्ली मुक्कामी हालचाली सुरू केल्या. परंतु यश मात्र येईना तेव्हा बाबासाहेबांनी लेडी मांऊटबॅटनला भेटून सविस्तर कथन केले आणि तिचे पत्र घेऊन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली. पंडितजींचे शिक्षणावर अतिशय प्रेम होते. शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी या दोन्ही इमारतीचा वापर होणार आहे हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरूंनी ह्या दोन्ही इमारती पीपल्स एज्युकेशन सोसायटीला देण्याची मोठे मन करून आनंदाने संमती दिली.
आजही आपण पाहतो फ्लोरा फाउंटनवर मोठ्या दिमाखाने उभ्या असलेल्या आनंद व बुद्धभवन ह्या इमारती आणि त्यामध्ये सुरू असलेले सिध्दार्थ महाविद्यालय म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी एक प्रकारचे प्रयत्नाचे फळ म्हणावे लागेल.
सकाळची कॉलेज सुरू करण्यासाठी नोकरीला असलेल्या लोकांसाठी काढण्यास मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली आणि त्याप्रमाणे अनेक महाविद्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आली. या व्यवस्थेमुळे उच्च शिक्षणापासून दूर झालेले असंख्य जन उच्च शिक्षण घेऊ शकले. इतकेच नाही तर बहुतेकजन विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेत पहिल्या वर्गात चमकले. सर्व काही सुरळीत चालले होते. परंतु का दृष्टाचाऱ्यांना हे पाहावेना. सकाळच्या कॉलेजमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे, असा डांगोरा पिटून त्यांनी त्या महाविद्यालयाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस बाबासाहेब धाऊन आले आणि त्यांनी अनेक पातळीवर या प्रचाराला पायबंद घातला त्यामुळेच सकाळची महाविद्यालये सुरू राहिली. आणि हजारो गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य झाले. ही गोष्ट केवळ बाबासाहेबांमुळे झाली हे फार थोड्यांना माहित असेल.
स्त्रियांचे उद्धारक भारतात पुष्कळ झाले. परंतु कैवारी मात्र एकच झाला. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाईंना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी ‘स्त्रियांच्या प्रगती व मुक्तीसाठी संघर्ष करणारा मी योद्धा आहे’ असे म्हटले आहे. ते सर्व अर्थाने सत्य आहे. दोन्ही हाती शस्त्र घेऊन, महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा असा वीर योद्धा पुन्हा होणे नाही. कायद्याचे शस्त्र एका हाती तर चळवळीचे शस्त्र दुसऱ्या हाती सर्व भारतीय महिलांनी मानले पाहिजे. आपल्या 65 वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यात या लढणाऱ्या योद्धाने राजकीय, सामाजिक, आर्थिक, व धार्मिक अशी चारही शस्त्रे पादाक्रांत केली. परंतु या पराक्रमाला जोड होती करूणेची, महिला आणि शुद्रादी प्रजेवर पराकोटीच्या जातीय व्यवस्थेने केलेल्या अन्याय अत्याचाराचा राग व त्या पिळवणुकीला बळी पडलेल्या विषयी करूणा यातून बाबासाहेबांनी या देशात सामाजिक क्रांती केली. तथागत बुद्धानंतरची ही द्वितीय क्रांती हिंदू समाजातील सर्व प्रकारच्या विषमता पैकी एक म्हणजे स्त्री-पुरूष विषमता तिच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी वापरलेले महत्त्वाचे अस्त्र म्हणजे कायदा. स्वतःचे सर्व पांडित्य त्यांनी स्त्रियांना अधिकार मिळविण्याविषयी हिंदू कोडबिलासाठीपणाला लावले. स्त्री-पुरूष समानता प्रस्थापित करण्यासाठी जुन्या कायद्याची संहिता आदी बदलली पाहिजे व स्त्री केंद्री बनवली पाहिजे हा त्या मागील हेतू होता.
युवकांचे खरे आदर्श पुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण त्यांनी युवकांना बहूमुल्य उपदेश केलेले आहेत. डॉ. बाबासाहेबांचा जन्म अतीशुद्र म्हणून समजल्या जाणाऱ्या समाजात झाला होता. त्या अस्पृश्यतेचे चटके त्यांनी अगदी बालपणापासूनच बसत होते. जातीतून होणारा विरोध अवहेलना सहन करतच त्यांनी आपले भारतीय शिक्षण आपल्या अधिकाराच्या जाणिवेसाठी तदवतच समाज जागृतीसाठी हे प्रभावी साधन असल्याची त्यांना जाणीव होती म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांना मंत्र दिला तो हाच की, ‘शिका संघटीत व्हा, आणि संघर्ष करा’ 11 व्या अस्पृश्य विद्यार्थी युवक संम्मेलनाचे सन 1938 मध्ये पुणे येथील संमेलनाचे अध्यक्षीय भाषणातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. युवकांना आत्मविश्वासाचे विद्यार्जन करण्याचा हितोपदेश दिला. तरी पण त्यांना इतर लोकसेवेमुळे युवकवर्गाकडे पाहिजे तसे लक्ष देण्यास वेळ मिळू शकला नाही त्याबद्दल नेहमी खंत वाटत होती ती खंत त्यांनी दिलगिरी रूपाने आपल्या वक्तव्यातून व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी दशेतील जीवन फारच संघर्षमय होते अस्पृश्यांच्या मुलाकरीता प्रामुख्याने तो काळ प्रतिकूल होता तरीपण त्यांनी घासलेटच्या दिव्यावर, प्रसंगी रस्त्यावरील दिव्याखाली, दिवसातील जास्तीत जास्त वेळ अभ्यास करून विद्यार्जन केले. तल्लख बध्दीमत्तेमुळे प्रेमापोटी बाबासाहेबांना शिक्षकांनी त्यांचे अंबावडेकर हे नाव बदलून आंबेडकर हे अभिधान केले, तेच रूढ झाले. बडोद्याचे राजे संभाजीराव गायकवाड महाराज यांनी शिष्यवृत्ती देऊन शिक्षणात मदत केली. हप्त्यातून एक दिवस उपवास करून त्यांनी वाचलेल्या पैशातून अनेक पुस्तके विकत घेऊन आपल्या ज्ञानात भर टाकली पुस्तकाकरिता ते कित्येकदा कर्जबाजारी होत असत त्यांचा विद्याव्यासंग हा एवढा मोठा होता की अनेक उच्चधर्मीय मंडळी त्यांच्या अध्ययन कामात अडचणी निर्माण करीत असताना त्यांना सतत लढा द्यावयाचा असे.
विद्या, प्रज्ञा, शील, करूणा आणि मैत्री या प्रत्येक युवकांने या पंच तत्वानुसार आपले चारित्य बनवावे, असे ते नेहमी म्हणत आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी आपल्या मनाचे धाडस, निष्ठा राखून गेले पाहिजे.
लेखिका - डॉ. कमल रा. गवई
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 5/10/2020
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयं...
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबे...
डॉ.आंबेडकर यांनी ज्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्यात...