অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भोसले घराणे

भोसले घराणे

सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी (ॽ -१६२४). त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले.राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजीच्या योग्यतेची कल्पना येते.

हाजीराजास जिजाबाई (सिंदखेडकर लखुजी जाधव यांची कन्या), तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन बायका होत्या. संभाजी आणि शिवाजी छत्रपती हे जिजाबाईचे दोन पुत्र आणि तुकाबाईचा व्यंकोजी ऊर्फ एकोजी (तंजावर राज्याचा संस्थापक). या तिघांनी पुढे इतिहासात नाव कमावले. संभाजी कर्नाटकात शहाजीजवळ राहत असे. कनकगिरीच्या लढाईत (१६५४) पस्तीशीतच तो वारला. एकोजीने शहाजीनंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली.

हाजीने शिवाजीला १६४१ मध्ये जिजाबाई समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. त्यांच्या दिमतीला दादोजी कोंडदेवसारखे अनुभवी व हुशार कारभारी होते. त्यांच्यामुळे शिवाजीच्या स्वतंत्र कर्तृत्वास वाव मिळाला. त्यांच्या साहाय्याने वयाच्या १२ वर्षांपासून शिवाजी जहागिरीचा कारभार पाहू लागला. त्या निमित्ताने पुण्याच्या आसपासचे मोक्याचे किल्ले त्याने ताब्यात घेतले. मावळ्यांनी संघटना करून विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध बंडच पुकारले. यातून मराठ्यांचे स्वराज्य स्थापण्याची कल्पना त्याला सुचली. पुढे प्रसंगानुसार आदिलशाह व मोगल यांच्याशी राजकारण व प्रसंगोपात्त युद्धे करून त्याने स्वराज्याची कल्पना स्वतःला राज्याभिषेक (६ जून १६७४) करवून जाहीरपणे सिद्ध केली आणि छत्रपतिपद धारण केले. शिवराई व होन ही नवी नाणी सुरू केली; अष्टप्रधान पद्धती स्थापिली, नवे पंचांग केले आणि राज्यव्यवहारकोश बनवून शासनातील फार्सी शब्दांचे उच्चाटन केले. देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर ३५६ वर्षांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. हे एक अद्‌भुत घडले. स्वराज्याबरोबर धर्मस्वातंत्र्य प्राप्त होऊन मुसलमानी राजवटीत हिंदूंचे खचलेले नीतिधैर्य त्यांना पुन्हा मिळाले. बखरकार शिवाजीला अवतारी पुरुष मानतात. भोसले कुळाचे नाव शिवाजीमुळे इतिहासात अजरामर झाले.

छत्रपती शिवाजीच्या आकस्मिक मृत्यूनंतर काही काळ अस्थिरता निर्माण झाली; पण नंतर रायगडावर युवराज संभाजी छत्रपतीने राज्याभिषेक करवून घेतला आणि छत्रपतीची सूत्रे धारण केली (१६८०). सुमारे नऊ वर्षें मोगल बादशाह औरंगजेब, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी झुंज देऊन त्याने स्वराज्य टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण दुर्दैवाने दक्षिण कोकणात तो मोगल फौजेच्या हाती सापडला. औरंगजेबाने त्याचा क्रूरपणे वध केला (१६८९). औरंगजेबाच्या रायगड वेढ्याच्या प्रसंगी संभाजीची राणी येसूबाई आणि अल्पवयीन पुत्र शिवाजी ऊर्फ शाहू यांना मोगलांनी पकडून आपल्या सोबत नजरकैदेत ठेविले. त्यानंतर संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम आपल्या कुटुंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हाळ्यामार्गे जिंजीकडे निसटून गेला. तिथे आठ-नऊ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्याची गादी राखली. संताजी घोरपडे-धनाजी जाधव यांसारख्या रणशूरांनी गनिमी काव्याने मोगल फौजेस सळो की पळो करून सोडले; तथापि शत्रूचे पाशवी बळ ओळखून राजाराम शिताफीने महाराष्ट्रात निसटून आला व कारभार पाहू लागला; पण इथेही दुर्दैवाने त्याला घेरले व थोड्याशा आजारानंतर तो सिंहगडावर अकाली निधन पावला (१७००).

राजारामाचे पश्चात राणी ताराबाईने आपल्या अल्पवयीन मुलास (शिवाजी) पन्हाळ्यास गादीवर बसविले व ती स्वतः हिंमतीने कारभार पाहू लागली. औरंगजेब बादशाह या काळात मराठ्यांच्या राज्यात ठाण मांडून बसला होता. त्याने आज सर केलेला किल्ला मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी परत घ्यावा, हा क्रम सतत चालू होता. ताराबाई शर्थीने प्रतिकार करून स्वराज्याचा लढा लढवीत होती. भद्रकाळी हे तिचे अभिधान सार्थ ठरले. वृद्ध औरंगजेब अखेर १७०७ मध्ये खुलदाबादेस मृत्यू पावला. त्याच्या पश्चात त्याच्या पुत्रांत बादशाहीच्या तख्तासाठी युद्धे झाली आणि मोगल सत्तेचा दरारा झपाट्याने ओसरू लागला. राणी येसूबाई आणि शाहू मोगलांच्या नजरकैदेत होते. आझमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असता शाहूची सुटका केली (१७०७).

शाहूच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. जुने अनेक मातब्बर सरदार आणि मुत्सद्दी शाहूला मिळाले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असता, भीमेकाठी खेड येथे (१७०७) चुलती ताराबाई त्याच्या विरोधात उभी राहिली. आपला नवरा राजाराम व आपण स्वतः लढून स्वराज्य टिकविले, त्यावर शाहू हक्क सांगू लागला. म्हणून तिने त्याला तोतया ठरविले व आपला मुलगा राज्याचा खरा वारस असल्याचे जाहीर केले. सामोपचाराने हा गृहकलह मिटेना, तेव्हा उभयपक्षी खेड येथे लढाई झाली व तीत ताराबाईच्या फौजेचा पराभव झाला. यानंतर शाहू साताऱ्यास आला व त्याने छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला (जानेवारी १७०८). त्या वेळी ताराबाईने पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. १७१२ मध्ये तिचा मुलगा शिवाजी वारला. तिची सवत, राजारामाची दुसरी बायको राजसबाई हिने आपला मुलगा संभाजी यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. ताराबाईची सत्ता संपुष्टात येऊन छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. [⟶ शाहू, छत्रपति

सातारा

शाहू मोगली छावणीत सोळासतरा वर्षे राहून आल्यामुळे त्याला राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. पराक्रमाची ईर्षाही त्याच्या अंगी नव्हती. त्याचा स्वभाव ऐषारामी, नेमस्त, धार्मिक आणि प्रसंग निभावून न्यायचा असाच एकूण होता. मनुष्यस्वभावाची पारख मात्र त्याला उत्तम होती. बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या यत्नामुळे पातशाहीकडून त्याला स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले असले; तरी त्या हक्कांची अंमलबजावणी करताना आरंभीच्या काळात त्याला अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. आपल्या मर्यादा तो जाणून असल्यामुळे अनेक गुणी व पराक्रमी माणसे त्याने आपलीशी केली आणि सु. चाळीस वर्षे सातारच्या गादीचे ऐश्वर्य व दरारा सर्वत्र वाढवला. या कामी बाळाजी विश्वनाथ आणि त्याचा पराक्रमी पुत्र पहिला बाजीराव हे दोन पहिले पेशवे, चिमाजीआप्पा, प्रतिनिधी, फत्तेसिंग भोसले, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रेरघूजी मोसले, दाभाडे पितापुत्र आणि पेशव्यांच्या हाताखाली तयार झालेले पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार बंधू इ. अनेक कर्तृत्ववान मराठे सरदारांनी निष्ठायुक्त सेवा करून त्याचे राज्य विस्तारित करून वैभवास नेले. या सर्वांच्या पराक्रमामुळे मोगल, निजाम, पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज हे मराठ्यांचे शत्रू निष्प्रभ झाले.

शाहूच्या मोगल साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे धोरण नांदा व नांदू द्या, या स्वरूपाचे होते. स्वतःचे अंगी कर्तबगारी नसली तरी शहाणपणाने पेशवा, प्रतिनिधी इत्यादींवर भिस्त ठेवून सर्वांच्या कर्तृत्वास तो

सातारा शाखा

 

संधी देत असे; पण या धोरणामुळे त्याच्या दरबारात एकवाक्यता व एकजूट राहिली नाही. पेशव्यांनी सर्वाना निष्प्रभ केले व प्रायः तेच राज्याचे सूत्रधार झाले. छ. शाहू १७४९ मध्ये निपुत्रिक वारला. त्याच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आला; पण रामराजापासून छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन सत्तेचे केंद्र पुण्यास गेले व खरे सत्ताधारी पेशवे झाले. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्याने सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या दत्तकाच्या मार्गाने एक करण्याचा यत्न करून पाहिला; पण या गोष्टीस खुद्द शाहूनेच विरोध केला होता. संभाजीचे नाव पुढे येताच ताराबाईने आपल्या नातावास शाहूच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले. त्यामुळे नानासाहेबाची योजना बारगळली. शाहूनंतर राज्य छत्रपतींचे, पण सत्ता पुण्याचे पेशवे व त्यांच्या मुत्सद्यांच्या हाती, अशी पेशवाईची अखेरपर्यंत स्थिती होती.

पेशवाई संपुष्टात आणल्यानंतर इंग्रजांनी सातारच्या प्रतापसिंह भोसल्यास अभय देऊन गादीवर बसविले व आरंभी ग्रँट डफसारख्या प्रशासकास नेमून एकूण मराठी राज्याची घडी नीट बसवण्यास आरंभ केला. ग्रँट डफचा मराठ्यांचा इतिहासविषयक महत्त्वाचा ग्रंथ याच्याच कारकीदींत लिहिला गेला. ग्रँट डफच्या शिकवणुकीने प्रतापसिंह कारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने आपण इंग्रजांचे मांडलिक नसून स्वतंत्र राज्याधिकारी आहोत, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनी बळावू लागली. इंग्रजांना ही गोष्ट खपली नाही. प्रतापसिंहावर बंडखोरीचा आरोप ठेवून त्यांनी त्याला पदच्युत केले व काशीला नजरकैदेत ठेवले.

प्रतापसिंहानंतर त्याचा भाऊ शहाजी ऊर्फ आप्पासाहेब गादीवर आला; पण वर्षभरात तो मृत्यू पावला. भोसले घराण्यात औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा केले (मे १८४८).

कोल्हापूर (करवीर)

कोल्हापूरचे भोसले घराणे खऱ्या अर्थाने स्थिरप्रद झाले, ते राजारामाची द्वितीय पत्नी राजसबाई हिचा पुत्र संभाजी याच्यामुळे. ताराबाईचा पुत्र शिवाजी १७१२ मध्ये वारला. राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने आपल्या पुत्रास (संभाजीस) कोल्हापूरच्या गादीवर बसविले (१७१४). हा संभाजी मोठा महत्त्वाकांक्षी व हिकमती होता. शाहूच्या शत्रूंशी त्याने अनेक वेळा हातमिळवणी केली. अखेर दोघा बंधूंत वारणाकाठी लढाई झाली (१७३०) व तीत संभाजीचा पराभव झाला. वर्षभराने कराड येथे उभयतांत वाटाघाटी होऊन वारणेचा तह झाला (एप्रिल १७३१) व दोन्ही राज्यांच्या सीमा ठरून काही वर्षेतरी गृहकलह थांबला. छ. संभाजीची कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे पंचेचाळीस वर्षांची झाली. आपले राज्य राखण्यासाठी त्याला सातारकर छत्रपतींच्या पेशव्यांशी अनेकदा संघर्ष करावे लागले. निजाम, हैदर अली, राघोबादादा या पेशव्यांच्या शत्रूंशी कोल्हापूरकरांनी प्रसंगी हातमिळवणीही केली. पेशव्यांच्या दक्षिणेतील सरंजामदारांशी कोल्हापूर छत्रपतीचे सतत संघर्ष झाले; पण या संघर्षातून कोल्हापूरची गादी शाबूत राहिली. याचे श्रेय संभाजी आणि शिवाजी या दुसऱ्या व तिसऱ्या छत्रपतींना आहे. पेशवाईची इतिश्री झाल्यानंतर कोल्हापूरचे राज्य इंग्राजांच्या कृपेवर टिकून राहिले. १८५७ च्या उठावाच्या प्रसंगी कोल्हापुरात प्रायः शांतता नांदल्याने राज्य वाचले. संभाजीनंतर (१७६०) छत्रपती शिवरायांचा औरस वंश खुंटला व पुढे दत्तकाची परंपरा सुरू झाली. या परंपरेतील सर्वाधिक थोर छत्रपती म्हणजे राजर्षि शाहू महाराज (कार. १८८४-१९२२). त्यांच्या कारकीर्दीत शैक्षणिक आणि सामाजिक बाबतींत कोल्हापूर संस्थानाने ज्या अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या, त्यांमुळे भोसले घराण्याची प्रतिष्ठा खूप उंचावली. कोल्हापुरात मल्लविद्या आणि संगीतकला जोपासली गेली, तीही शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात सातारचे प्रतापसिंह आणि कोल्हापूरचे शाहू यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करावा लागतो.

कोल्हापूर शाखा

भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ मार्च १९४९ रोजी कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन झाले. शहाजी महाराज (दत्तक देवास घराणे) हे बारावे छत्रपती त्या वेळी गादीवर होते.

तंजावर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

छत्रपती शिवाजींचा सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी याने तंजावरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५ मध्ये हे राज्य मिळवले. आदिलशाहीच्या अंकित असे हे राज्य होते. शिवाजींच्या कर्नाटकावरील मोहिमेत एकोजीने मैत्रीऐवजी शत्रुत्वाची भूमिका घेतल्यामुळे त्याला शिवाजींविरुद्ध पराभूत होऊन पळून जावे लागले; तथापि शिवाजींनी उदार मनाने त्याचे राज्य अबाधित ठेवले. एकोजीच्या मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, सरफोजी व तुकोजी या तिधा भावांनी एकामागोमाग १७३६ पर्यंत राज्य केले, तुकोजीनंतर त्याचा पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर आला; पण तो वर्षभरातच मृत्यू पावला. पुढे तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह गादीवर आला (१७३९) व त्याने इंग्रजांशी सख्यत्व जोडून १७६३ पर्यंत सु. पंचवीस वर्षे राज्य केले. तुळजाजी हा त्याचा पुत्र. याची कारकीर्द भ्रष्टाचार, अनागोंदी, इंग्रजांचा चंचुप्रवेश, हैदरची स्वारी इ. कारणांमुळे खिळखिळी झाली. अगतिक होऊन अखेर त्याने इंग्रजांकडे कारभार सोपविला आणि त्यांचे मांडलिकत्व पतकरले. तुळजाजीनंतर दुसरा सरफोजी हा अल्पवयीन दत्तक पुत्र गादीवर आला. तो सज्ञान होईपर्यंत त्याच्या सावत्र काकाने (अमरसिंह) कारभार पाहिला. त्यानंतर सरफोजीने पस्तीस वर्षे (१८३२ पर्यंत) इंग्रजांच्या कृपेने राज्य केले. साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, चित्र इ. शास्त्रकलांचा तो भोक्ता असल्यामुळे त्याची कारकीर्द सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली. जिर्णोद्धारित बृहदीश्वर मंदिरातील भोसले वंशविषयक शिलालेख (१८०३) त्याच्याच कारकीर्दीत कोरला गेला. इंग्रजांनी त्याला राजा हा किताब देऊन त्याचे अधिकार जवळजवळ संपुष्टात आणले होते. त्याच्या नंतर राजा शिवाजी १८३३ ते १८५५ पर्यंत गादीवर होता; पण प्रत्यक्षात कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला. शिवाजी निपुत्रिक वारल्यामुळे १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावर संस्थान खालसा केले.

तंजावरचे बहुतेक राजे कलाभिज्ञ होते. चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य आणि ग्रंथनिर्मिती यांना या घराण्याचा मोठा आश्रय होता. तंजावरचा मराठा दरबार हॉल आणि अनेक भाषांतील हस्तलिखितांनी समृद्ध असे सरस्वती महाल ग्रंथालय या दोन वास्तू म्हणजे तंजावर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. मराठी भाषेप्रमाणे तमिळ, तेलुगू आणि संस्कृत भाषांनाही या घराण्याचा चांगला आश्रय लाभला. [⟶ तंजावर संस्थान]

तंजावर शाखा


 

 

 

 

 

 

 


 

नागपूर (नागपूरकर भोसले)

महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे. यांच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हे आपल्याला उदेपूरच्या राजपूत राण्यांचे वंशज म्हणवीत. मुसलमानांचे दिल्लीस वर्चस्व वाढले, तेव्हा हे दक्षिणेकडे आले. हे प्रथम अहमदनगरच्या निजामशाहीत नोकरीस लागले. त्यांना अमरावती व भाम ही गावे इनाम मिळाली. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष मुधोजी व त्याचा भाऊ रूपाजी. यांनी सध्याच्या पुणे जिल्ह्यातील हिंगणी येथील पाटीलकी खरेदी केली. म्हणून त्यांना हिंगणीकर या नावानेही संबोधीत. हे दोघे बंधू पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली फौजेत होते. मुधोजीस सात मुलगे होते, तर रूपाजीस संतती नव्हती. सात मुलांपैकी परसोजी व साबाजी हे पुढे शिवाजीच्या चाकरीत आले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीस गादी मिळू नये, म्हणून झालेल्या कटात परसोजीचा हात होता; पण संभाजी यशस्वी होताच तो खानदेशात पळाला. पुढे राजारामाच्या कारकीर्दीत रूपाजी व पुतण्या परसोजी यांनी हरेकप्रकारे मदत केली आणि गोंडवन व वऱ्हाड प्रांतांत अंमल बसविला. त्याबद्दल राजारामाने जरीपटका व सेनासाहेबसुभा हा किताब देऊन परसोजीचा सन्मान केला आणि गोंडवन, देवगढ, चांदा व वऱ्हाड हे प्रदेश त्याच्या अखत्यारीखाली दिले (१६९९). नागपूरकर भोसले घराण्यातील छत्रपतींची सनद मिळालेला हा पहिला पुरुष. परसोजीकडे वऱ्हाडातील चौथाई-सरदेशमुखी गोळा करण्याचे कामही सोपविण्यात आले. शाहूची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली (१७०७), तेव्हा परसोजी आपल्या फौजेनिशी त्यास मिळाला आणि हा शाहू तोतया नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या ताटात जेवला. त्याच वर्षी शाहूने त्यास सेनासाहेबसुभा ह्या पदाची सनद दिली आणि सहा सरकारां (जिल्हा) मधील १४७ महालांचा मोकासा वंशपरंपरागत सुरू केला. परसोजी वऱ्हाडात जात असता खेड येथे मरण पावला (१७०९).

रसोजीनंतर त्याचा मुलगा कान्होजी यास शाहूने सेनासाहेबसुभा हा किताब व गोंडवन-वऱ्हाडची चौथाई – सरदेशमुखी जमा करण्याचे सर्व अधिकार दिले. त्याने भाम हे आपले राहण्याचे प्रमुख ठिकाण केले. कान्होजीने निजामाविरुद्ध बाळापूरच्या लढाईत पहिल्या बाजीरावास मदत केली; परंतु तीत मराठ्यांचा पराभव झाला (१७२०). पुढे मुबारिजखान – निजाम लढाईत कोणासही मदत न करण्याची सूचना देऊन शाहूने त्या लढाईवर कान्होजीस धाडले (१७२४). कान्होजीला माळव्याचा प्रदेश हवा होता; पण पहिल्या बाजीरावाने त्यास जरब देऊन दूर ठेवले. सुमारे १८ वर्षे त्याने वऱ्हाडचा कारभार चोख ठेऊन शाहूजी मर्जी संपादिली; पण पुढे कान्होजी चौथाई-सरदेशमुखी मध्यवर्ती खजिन्यात वेळेवर भरेना व शाहूशी उद्दामपणे वागू लागला. त्याच्या पुतण्याचे - पहिला रघूजी (कार. १७३१-५५) – व कान्होजी यांत वैमनस्य निर्माण झाले. तेव्हा कान्होजी निजामाकडे आश्रयास गेला (१७२८); पण निजामाने त्यास आश्रय दिला नाही. शाहूनेही त्याचे सेनासाहेबसुभा हे पद रद्द केले आणि रघूजीस देऊर गाव (विद्यमान कोरगाव तालुका) इनाम देऊन त्याच्यावर पाठविले (१७२८). यामुळे भोसल्यांना पुढे देऊरकर भोसले हे नाव प्राप्त झाले. शाहूने याशिवाय रघूजीस सेनासाहेबसुभा हे पद व वऱ्हाड आणि गोंडवन येथील चौथाई-सरदेशमुखीचे अधिकार दिले. याबद्दल रघूजीने दहा हजार फौजेसह शाहूची नोकरी करावी व शाहूस सालिना दहा लाख रुपये द्यावे, असे ठरले. रघूजीने कान्होजीचा पराभव केला.

घूजी भोसलेच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; परंतु नागपूरकर भोसले घराण्यातील हा सर्वांत पराक्रमी व श्रेष्ठ पुरुष असून त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले. वऱ्हाडात स्थिरस्थावर झाल्यावर त्याने देवगढ, गढा-मंडला (मध्य प्रदेश) व खंडाला, चांदा (महाराष्ट्र) ही गोंड राज्ये आपल्या आधिपत्याखाली आणली. याच वेळी शाहूने पुन्हा रघूजीस कर्नाटकात स्वारीवर पाठविले (१७३९-४०), रघूजीने भास्करपंत या आपल्या सेनापतीस बंगालवर पाठविले (१७४१). सुमारे दहा वर्षे त्याचे हे बंगाल लुटणे चालू होते. रघूजीने देवगढची विधवा राणी रतनकुंवर हिला सर्वतोपरी मदत करून तिच्या अकबर व बुऱ्हान या मुलांना वारसाहक्क व राज्य मिळवून दिले आणि वलीशाहचा पराभव केला. रतनकुंवरने रघूजीस आपला तिसरा मुलगा मानून राज्याचा तिसरा हिस्सा दिला. यानंतर रघूजीच्या रघूजी करांडे नावाच्या सेनापतीने गोंडवन काबीज केले; तेव्हा रघूजीने राजधानी नागपुरास हलविली. या वेळेपासून पुढे भोसल्यांचे वऱ्हाडातील राहण्याचे प्रमुख ठिकाण नागपूर झाले. शाहूने १७३८ मध्ये रघूजीस बंगाल, बिहार व ओरिसा येथील चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार दिले. रघूजीने १७५१ मध्ये अलीवर्दीखान व मराठे यांत तह घडवून आणला. या तहान्वये भोसले यांना बारा लाख रु. चौथाई म्हणून मिळाले आणि कटक जिल्हा भोसल्यांच्या अंमलाखाली आला. या बंगालवरील स्वारीत रघूजीला वरील गोष्टींशिवाय रायपूर, रतनपूर, बिलासपूर व संबळपूर या संस्थानांवरही भास्करराम या सेनापतीमार्फत अधिराज्य प्रस्थापिता आले. रघूजीचा अनौरस मुलगा मोहनसिंग याच्या ताब्यात या संस्थानांची व्यवस्था असे.

घूजीच्या अखेरच्या दिवसांत त्याच्या ताब्यात वऱ्हाडापासून कटकपर्यंतचा मुलूख व गढा-मंडला, चांदा व देवगढ ही गोंड राज्ये तसेच गाविलगढ, नरनाळा व माणिकदुर्ग हे महत्त्वाचे किल्ले एवढा प्रदेश होता. शिवाय बिहार व बंगाल यांची चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा मिळून सु. ४०% उत्पन्नाचा भाग त्यास मिळत असे.

शाहूने मरणापूर्वी आपल्यानंतर वारस कोण, याची चर्चा करण्यासाठी रघूजी भोसले यास साताऱ्यास बोलाविले. शाहूची राणी सगुणाबाई व रघूजीची पत्नी सुकाबाई या चुलत बहिणी होत्या. त्यामुळे रघूजीस छत्रपतींच्या गादीवर आपला मुलगा दत्तक द्यावा, असे वाटत होते. नानासाहेबांना पेशवेपद न देता ते बाबूजी नाईकास द्यावे, म्हणूनही त्याने पूर्वी खटपट केली होती; पण शाहूने त्याचे सर्व बेत अमान्य करून पेशव्यांबरोबरचा वादही सामोपचाराने मिटवून दोघांना दोन स्वतंत्र विभाग दिले. रघूजीने नागपूर शहराचे सौंदर्य वाढविले. रामटेक येथे रामाची मूर्ती बसविली.

घूजीला दोन पत्न्या होत्या. त्यांपासून त्यास चार मुलगे झाले : मुधोजी, बिंबाजी, जानोजी व साबाजी. जानोजी व साबाजी हे दुसऱ्या पत्नीचे मुलगे होते; पण जानोजी हा सर्वांत मोठा मुलगा होता. म्हणून रघूजीने आपल्या पश्चात जानोजीस नागपूर संस्थानची गादी मिळावी व इतरांना आवश्यक तेवढे उत्पन्न द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. दुसरी गोष्ट जानोजी त्याच्या अखेरच्या दिवसांत त्याच्याबरोबर स्वारीत असे. कर्नाटक व बंगाल (१७४९-५०) मधील स्वाऱ्या त्याने स्वतंत्र रीत्याही हाताळल्या होत्या. रघूजी १४ फेब्रुवारी १७५५ रोजी मरण पावला. त्याच्या मुलांत नागपूरच्या गादीबद्दल नंतर तंटे सुरू झाले.

जानोजी (कार. १७५५ - ७२) रघूजीनंतर नागपूरच्या गादीवर आला. त्याला वऱ्हाडचे सुभेदार कृष्णाजी गोविंदराव, नागपूरचे सुभेदार नरहर बल्लाळ रिसबुड, रघूजी करांडे, शिवाजी केशव टाळकुटे वगैरे मातब्बर सरदारांचे साहाय्य व सहानुभूती होती. मुधोजी थोरल्या बायकोचा असल्यामुळे वारसाहक्क मागत होता. यामुळे दोघांचे भांडण अखेर पेशव्यांकडे पुण्याला नेण्यात आले. पेशव्यांनी जानोजीस सेनासाहेबसुभा हे पद दिले आणि सेनाधुरंधर हे नवीन पद निर्माण करून ते मुधोजीस दिले. मुधोजीस चांदा व छत्तीसगढ हे प्रदेश देऊन त्यांची शासकीय व्यवस्था त्याजकडे सोपविली. बिंबाजीने छत्तीसगढ येथे आणि साबाजीने वऱ्हाडातील दारव्ह येथे रहावे, असे ठरले. सर्व भोसले बंधूंनी पेशव्यांना २० लाख रुपये द्यावेत. प्रत्यक्षात सेनासाहेबसुभा ही सनद ताराबाईने पुढे पहिला माधवराव पेशवा झाल्यानंतर १७६१ मध्ये दिली; तथापि पुण्यास दोघा बंधूंमध्ये समेट घडत असता व नंतरही दोघे एकमेकांशी झगडत होते. अखेर १७५७ मध्ये दोघांनी लढाईने तंटा मिटविण्याचे ठरविले. रहाटगावजवळ लढाई झाली. मुघोजीचा पराभव झाला आणि तह होऊन काही काळ शांतता आली. निजामाने जानोजी कर्नाटकात गेला आहे, हे पाहून वऱ्हाडावर स्वारी केली. त्या वेळी जानोजीने परत येऊन सर्व वऱ्हाडचा प्रदेश पादाक्रांत केला (१७५७); तेव्हा निजामाने पुढे जानोजीबरोबर एलिचपूर येथे सुलतान खापन्ही याच्या मध्यस्थीने में १७५८ मध्ये तह केला. त्यानुसार निजाम व भोसले यांत वऱ्हाडच्या उत्पन्नाची विभागणी झाली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभवानंतर (१७६१) जानोजी नानासाहेबास जाऊन मिळाला; पण पुढे जानोजी पुन्हा निजामाकडे गेला (१७६२). दोघांनी मिळून पेशव्यांचा मुलूख पुण्यासह जाळला. राक्षसभुवनच्या लढाईत (१७६३) जानोजी व मुधोजी पेशव्यांना पुन्हा मिळाले. त्याबद्दल रघुनाथरावाने त्यांना ३२ लाखांचा प्रांत दिला. यानंतर साबाजी रूसून माधवराव पेशव्यांकडे जात असता जानोजी व त्याची बायको दर्याबाई यांनी त्याचे मन वळविले. माधवरावाने नागपूर जाळून त्यांचा पुष्कळ प्रांत काबीज केला. जानोजी व मुधोजी या बंधूंवर गोपाळराव पटवर्धनास पाठविले. गोपाळरावाने मध्यस्थी करून कनकापूर येथे माधवराव पेशवे व जानोजीत तह घडवून आणला (१७६९). जानोजीस मूल नसल्यामुळे त्याने मुधोजीचा मुलगा रघूजी (दुसरा) यास दत्तक घेण्याचे ठरविले. दत्तकमंजुरीस पुण्यास जाऊन परत येत असताना पोटशुळाच्या व्यथेने तो बालेघाटात १६ मे १७७२ रोजी मरण पावला. त्याच्याबरोबर त्याच्या अनेक स्त्रिया सती गेल्या. जानोजीच्या वेळी दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघडे हा नारखेडचा गृहस्थ जानोजीचा राजकीय सल्लागार म्हणून पुढे आला. जानोजीनंतरच्या भोसले घराण्यातील अनेक व्यक्तींना त्याचा सल्ला महत्त्वाचा ठरला. जे स्थान नाना फडणीसाचे पुणे दरबारात होते, तेच नेमके दिवाकरपंताचे नागपूरकर भोसले यांच्या दरबारात होते.

जानोजीनंतर दुसरा रघूजी (कार. १७७२-१८१६) भोसल्यांच्या गादीवर आला; पण तत्पूर्वी त्याचे दत्तकविधान झाले नसल्यामुळे पुन्हा भोसले घराण्यात कलहास सुरुवात झाली. मुधोजीचा धाकटा भाऊ साबाजी याने माधवरावाकडून सेनासाहेबसुभा ही सनद रामाजी बल्लाळ गुणे या मध्यस्थामार्फत मिळविली; कारण मुधोजी हा रघुनाथरावाच्या पक्षाचा होता. याच वेळी जानोजीची पत्नी दर्याबाई साबाजीस मिळाली व आपण गरोदर असून आपणास मुलगा झाल्यास त्यास गादी मिळावी, म्हणून तिने खटपट सुरू केली. मुधोजीने आपली सर्व कुटुंबीय मंडळी चांद्याच्या किल्ल्यात पाठविली आणि सु. २५,००० ची फौज जमविली. साबाजी व मुधोजी यांत कुंभारी येथे युद्ध होऊन (१७७३) असे ठरले की, सेनासाहेबसुभा हे पद दुसऱ्या रघूजीस देऊन साबाजी व मुधोजी या दोघांनी संयुक्तरीत्या राज्यकारभार पाहावा; तथापि साबाजीस ही योजना पसंत नव्हती. त्याने पेशवा नारायणरावाची रघुनाथरावाविरुद्ध बाजू घेतली. निजामही नारायणरावाच्या बाजूचा होता; पण रघुनाथरावाने निजामाचा पराभव केला. अखेर हा तंटा पंचगावच्या लढाईत साबाजी मरण पावल्यानंतर संपुष्टात आला (२६ जानेवरी १७७५). दर्याबाई व इतर साबाजीचे लोक साहजिकच मुधोजीस मिळाले आणि मुधोजी (कार. १७७५-१७७८) हा काही काळ सत्ताधीश झाला व रघूजीस रितसर सेनासाहेबसुभा हा किताब सवाई माधवरावाकडून मिळाला (१७७५). मुधोजी हा बारभाईविरुद्ध रघुनाथरावास मिळाला. मुधोजीने निजामाचा सरदार रूकन उद्दौला यासही रघुनाथरावाच्या पक्षात सामील करून घेतले. पुढे भोसल्यांनी बंगालमध्ये चौथाईचा बहाणा करून इंग्रजांवर स्वारी करण्याचे ठरले असतानासुद्धा दुसऱ्या रघूजीने दिवाकरपंतांच्या सल्ल्याने हा बेत रद्द केला. एवढेच नव्हे, तर जनरल गोडाई पुण्याकडे जात असता मुधोजीने आपल्या राज्यातून त्यास मार्ग दिला व पेशव्यांविरुद्ध त्याच्याशी तह केला. तेव्हा नाना फडणीसाने बिंबाजीच्या साहाय्याने मुधोजीविरुद्ध मसलत उभारली. त्या वेळी मुधोजी घाबरला व त्याने इंग्रजांचा पक्ष सोडला; तथापि त्याचे एकूण धोरण इंग्रजांना मदत करण्याचे होते, हे पुढे इंग्रजांनी टिपूवर जी स्वारी केली, त्यात स्पष्ट झाले. अखेर तो नाना फडणीसास टिपूविरुद्धच्या बादामीच्या वेढ्यात मदतीला आला (१७८६). यानंतर तो नागपूरास परत गेला व तेथेच १९ मे १७८८ रोजी मरण पावला. तत्पूर्वीच त्याचा भाऊ बिंबाजी मरण पावला होता. मुधोजीस रघूजी, खंडोजी व व्यंकोजी असे तीन मुलगे होते. रघूजीने पेशव्यांची मर्जी संपादून व्यंकोजीस सेनाधुरंधरची वस्त्रे मिळविली (१७८९). पुढल्या वर्षी खंडोजी एकाएकी वारला.

मुधोजीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या रघूजीच्या हातात सत्ता पूर्णतः आली. रघूजीचे व नाना फडणीसाचे संबंध मित्रत्वाचे होते. खर्ड्याच्या लढाईत (१७९५) रघूजीने विठ्ठल बल्लाळ या सुभेदाराच्या नेतृत्वाखाली फौज धाडली. यामुळे रघूजीस साडेतीन लाखांचा मुलूख व गंगथडी प्रदेशाचा घासदाणा मिळाला. निजामाने सु. २९ लाख

P - 785  -  1रुपयांची बाकी रघूजीस देण्याचे कबूल केले. याशिवाय नवीन सनदेनुसार नर्मदेच्या दक्षिणेकडील मुलूख आणि नाना फडणीसाने पाच लाख रुपये व गढा-मंडल्याचा प्रदेश दिला. पुढे त्यास सागरच्या राजाने अमीरखानविरुद्ध मदत केल्याबद्दल काही मुलूख दिला. १८०० मध्ये रघूजीचे राज्य विस्ताराने इतर मराठी संस्थानिकांपेक्षा मोठे व समृद्ध होते; परंतु त्याचा ईस्ट इंडिया कंपनीशी संबंध आल्यानंतर अवनतीस सुरुवात झाली. लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर (१७९८) त्याने तैनाती फौजेची पद्धत सुरू केली व हळूहळू ती एतद्देशीय संस्थानिकांवर लादली. मराठी संस्थाने हळूहळू त्याच्या कच्छपी जात होती. वेलस्लीच्या सैन्याने अखेर गाविलगढावर हल्ला केला. अडगावच्या लढाईत रघूजीचा पराभव झाला (२९ नोव्हेंबर १८०३) आणि देवगाव येथे तह होऊन युद्ध संपले (१७ डिसेंबर १८०३). यावेळी इंग्रजांनी भोसल्यांवर अपमानकारक अटी लादल्या व मुलूख घेतला. वऱ्हाड प्रांत निजामास देण्यात आला आणि भोसल्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (कार. १८०४-१८०७) हा नागपूरास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट नेमण्यात आला. देवगावच्या तहानंतर तैनाती फौज ठेवावी, म्हणून रघूजीवर दडपण आणले. एल्फिन्स्टननंतर रेसिडेंट म्हणून आलेल्या रिचर्ड जेंकिन्सने आग्रह धरला; पण रघूजीने आपल्या हयातीत तैनाती फौज स्वीकारली नाही. रघूजीची संपत्ती दानधर्मात खर्च झाली, शिवाय उत्पन्नही कमी झाले होते. त्यामुळे अखेरच्या दिवसांत संस्थानला कर्ज झाले. रघूजी २२ मार्च १८१६ रोजी मरण पावला

घूजीनंतर त्याचा दुबळा मुलगा परसोजी भोसल्यांच्या गादीवर आला (१८१६). त्यामुळे रघूजीचा अनौरस मुलगा धर्माजी व व्यंकोजीचा मुलगा मुधोजी ऊ र्फ आप्पासाहेब या दोघांमध्ये अधिकारांबद्दल तंटा सुरू झाला. रघूजीची पत्नी बांकाबाईचा ओढा धर्माजीकडे होता. मुधोजीकडे सर्व सरदारमंडळी होती. यामुळे मुधोजीने कारस्थान रचून बांकाबाईला नजरकैदेत व धर्माजीस कैदेत टाकले आणि परसोजीस राज्याभिषेक करून सर्व कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. धर्माजीचा ५ मे १८१६ रोजी खून झाला. त्यामुळे आप्पासाहेबाच्या हातात सर्व सत्ता आली. आप्पासाहेब चांद्यास गेला असता परसोजी एकाएकी अंथरूणातच मृत अवस्थेत आढळला (१ फेब्रुवारी १८१७). आप्पासाहेबावर परसोजीच्या खुनाचा आरोप करण्यात आला; पण इंग्रजांनी तो दूर करून आप्पासाहेबास अखेर तैनाती फौज स्वीकारावयास लावली आणि भोसल्यांच्या गादीवर आप्पासाहेब आला (२१ एप्रिल १८१७).

प्पासाहेबावर आपले वर्चस्व असावे, म्हणून इंग्रजांनी सर्वतोपरी यत्न केले. तैनाती फौजेनंतर त्यांनी हुशंगाबादेस वखारीकरिता परवानगी मागितली. ती त्याने नाकारली. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्धच्या लढाईत त्यात होळकरांप्रमाणे भोसल्यांचीही मदत मागितली. ती त्यांनी कबूलही केली. पेशव्यांनी आप्पासाहेबास सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे पाठविली. आप्पासाहेबाने थोडीशी फौज जमविली. या कामी मनभट, रामचंद्र वाघ, सुभेदार निंबाळकर, नारायण नगारे वगेरे मातब्बर मंडळी त्याच्या बाजूस होती. फौजेने सीताबर्डी व नागपूर शहर या दरम्यान नाकेबंदी करून रेसिडेंसीवर तोफांचा भडीमार केला; पण आप्पासाहेबास काही तरी निमित्त काढून रेसिडेंसीत नेऊन अडकविण्यात आले. भोसल्यांचा पराभव झाला व भोसल्यांच्या ध्वजाच्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचा युनियन जॅक फडकला. आप्पासाहेबाने आपल्या आज्ञेशिवाय आपल्या सरदारांनी हे युद्ध केले, असा दावा इंग्रजांकडे मांडला. इंग्रजांनी आप्पासाहेबाबरोबर तह केला (६ जानेवरी १८१८). या तहानुसार इंग्रजांना गाविलगढ, नरनाळा हे किल्ले व काही प्रदेश मिळाला. तसेच नागरी व लष्करी व्यवस्था इंग्रजांच्या हातात गेली आणि आप्पासाहेब हा इंग्रज रेसिडेंटच्या देखरेखीखाली नागपूरात राहू लागला. यामुळे नागपूर व आप्पासाहेब यांचे स्वातंत्र्य पूर्णतः नष्ट झाले. सुमारे तीन महिने शांततेत गेली. आप्पासाहेबाने बाजीरावाशी पत्रव्यवहार सुरू केला. जेंकिन्सला हा पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्याने तत्काळ आप्पासाहेबास कैद केले (१५ मार्च १८१८). त्याला रामचंद्र वाघ व नागोपंत यांसह प्रयाग येथे पाठविण्यात आले. चांद्याचा किल्ला काही दिवस गंगासिंग या किल्लेदाराने लढविला. तो पुढे मे १८१८ मध्ये पडला. आप्पासाहेब पळून गेला. त्याने प्रथम महादेव टेकड्यांत आश्रय घेतला. गोंड राजांनीही काही दिवस त्यास आश्रय दिला. पुढे तो भटकता भटकता अटक होऊन जोधपूर येथे तुरुंगात मरण पावला (१८४०). त्याच्या पारतंत्र्यात उमाबाई ही त्याची पत्नी त्यास द्रव्य-पुरवठा करीत असे; तर त्याची दुसरी पत्नी सावित्रीबाई नागपूरात निवृत्तिवेतन उपभोगीत होती.

प्पासाहेबानंतर नागपूरच्या गादीवर इंग्रजांनी तिसरा रघूजी (कार. १८१८-५३) यास दत्तक देऊन बसविले. तिसरा रघूजी हा दुसऱ्या रघूजीच्या बानूबाई या मुलीचा मुलगा. त्याचे जन्मनाव बाजीबा. त्याचे दत्तकविधान २६ जून १८१८ रोजी झाले. तो अज्ञान असल्यामुळे सर्व राज्यकारभार व राजवाड्यातील व्यवस्था रेसिडेंट आणि बांकाबाई पाहत असे. तो सज्ञान झाल्यानंतर इंग्रजांनी त्याच्याबरोबर तह केला (१८२६). तो इंग्रजांच्या तंत्राप्रमाणे वागे. त्याने अनेक तीर्थांना भेटी दिल्या. त्याला आठ बायका होत्या; पण पुत्रसंतती नव्हती, एक मुलगा झाला तोही लहानपणीच वारला. त्याने दत्तक घेण्याचे ठरविले होते. तशी अट १८२६ च्या तहामध्ये होती. तो ११ डिसेंबर १८५३ रोजी मरण पावला.

तिसऱ्या रघूजीनंतर बांकाबाईने यशवंतराव नावाच्या (दुसऱ्या रघूजीच्या मुलीच्या अहिरराव घराण्यातील) मुलास दत्तक घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे इंग्रज रेसिडेंट यास कळविले व तिसऱ्या रघूजीचे उत्तरक्रियाकर्म त्याच्या हस्ते केले. नंतर दत्तकविधान झाले. मुलाचे नाव जानोजी ठेवण्यात आले; तथापि गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले (१८५४). रघूजीच्या राण्यांनी चालविलेली कायदेशीर खटपट निरर्थक ठरली. पुढे १८६७ मध्ये इंग्रजांनी जानोजीस राजा ऑफ देऊर अशी पदवी देऊन सालिना ९० हजार रुपयांचे निवृत्तिवेतन दिले. त्याला सहा राण्या होत्या. त्यांपैकी अंजीराबाईस रघूजी व लक्ष्मण असे दोन मुलगे झाले. रघूजीस पुढे फत्तेसिंह व जयसिंह असे दोन मुलगे झाले.


पहा- पेशवे मराठा अंमल.

देशपांडे, सु. र.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. Maratha Supremacy, Bombay, 1977.

2. Parasnis, D. B. Satara<, Bombay, 1909.

3. Shejwalkar, T. S. Ed. Nagpur Affairs, 2 Vols., Poona. 1954 & 1959.

4. Sinha, R. M. Bhanslas of Nagpur : The Last Phase-1818-1854, New Delhi, 1967.

५. काळे, यादव माधव, नागपूरकर भोसल्यांचा इतिहास, नागपूर, १९७९.

६. गर्गे, सदाशिव मार्तंड, करवीर रियासत :इ. स. १७१० ते इ. स. १८८३, पुणे, १९६८.

७. गोखले, पुरुषोत्तम पांडुरंग, जागृत सातारा, सातारा, १९६६.

८. सरदेसाई, गो.स. मराठी रियासत, भाग १ ते ४, मुंबई, १९१५-१९२५.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate