অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विकासपिडिया निबंध स्पर्धा २०१५ "स्वच्छ भारत"

विषय :- स्वच्छ भारत- तुम्ही स्वत:ला व आपल्या सभोवतालील परिसर कसा स्वच्छ ठेऊ शकता ?

या नववर्षाच्या सुरुवातीलाच दिनांक ९ जानेवारी  ते २० जानेवारी पर्यंत स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होण्यासाठी विकासपिडियाने “विकासपीडिया–निबंध लेखन स्पर्धा २०१५' आयोजित केली होती.

ही स्पर्धा विकासपीडिया या वेबपोर्टलवरील  मजकूर लेखक,  नोंदणीकृत सदस्य आणि शाळेतील ८वी ते १०वी मधील विद्यार्थी या तीन गटासाठी आयोजित केली होती.  या स्पर्धेमध्ये अहमदनगर, सातारा, सांगली, जालना, वर्धा, यवतमाळ, लातूर आणि नवी मुंबई आशा ८ जिल्ह्यामधून शालेय विद्यार्थी / व्यक्तींनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत शालेय गटातून उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या स्पर्धेमध्ये एकूण ७११ विध्यार्थी सहभागी झाले होते.   हे विद्यार्थी अहमदनगर, सातारा, सांगली, जालना, वर्धा, यवतमाळ या 6 जिल्ह्यातील २४ गावे व ३३ शाळेमधील प्रतिनिधी होते.

या पानावर शालेय गट ,विकासपिडिया मजकूर लेखक गट व विकासपिडिया नोंदणी सदस्य या तीनही गटातील प्रथम पारितोषिक विजेत्यांचे निबंध दिले आहेत.

निबंध १ - विकासपिडिया मजकूर लेखक गट

``गांवाचे जरी उत्तम नसलें।तरि देशाचे भविष्य ढासळले

ऎंसे मानावे जान त्याने भले।हृदया माजी।।''

संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी. गाव चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले होते,  असा त्यांचा संदेश. गावच्या विकासा साठी संतानी आपापल्या परिने प्रयत्न केले.त्यातील च संतगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांचे योगदान महत्वाचे मानले जाते .देव – देवतांच्या पूजेबरोबरच श्रमातून भक्ती करा.गाव चांगले ठेवा .त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, ही शिकवण त्यांनी युवकांना देण्याचा प्रयत्न केला. सदयस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे ज्यांचे आरोग्य मान, पर्यायाने जीवन स्तर उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे . (उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,  निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना वगैरे) यामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यापूर्ण उत्स्फुर्त सहभाग कार्यक्रमात करुन घेण्याची प्रभावी तरतूद कार्यक्रम अंलमबाजवणी करण्यासाठी शासन ही प्रयत्नशील आहे.

घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता न्हावी व सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मानव पर्यार्याने जीवनमान उंचवावे व त्यायोगे  ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' हे संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे.  तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न परिसर, गाव व पर्यायाने देशाची निर्मिती करणेही काळाची गरज असल्याने जल, जमीन,  जंगल, हवा, वनस्पती इ. चे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी -  सुविधांची निर्मिती  ``पर्यावरण संतुलन''  ठेऊन केल्यास नागरीकांचे जीवनमान,  दर्जा सुधारण्यास मदत होईल, त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकांमध्ये खोलवर रुजण्याची नितांत आवश्यकता आहे.

आपण विदेशातील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो,  मात्र तेथील स्वछता, शिस्त,  सौंदर्य,  सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे,  ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळेच आहे, हे मात्र आपण विसरतो.  आपण आपल्या मनाला,  शरीराला, घराला, परिसराला स्वच्छ बनविण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये,  लोकल,  ऑफिस,  उदयान,  इमारती,  रस्त्यांवर,  गल्ली बोळांत, आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणे,  पान खाऊन पिचकारणे,  सिगारेट ची थोटके,  खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे,  तंबाखू,  गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्या नदया या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.  किती जाण आपल्या मुलांना स्वच्छते चे महत्व सांगातात ?त्याचे अनुकरण करायला सांगतात ? आणि स्वत:  ही त्याचे अनुकरण करतात ?

आपल्या कडे अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होतात. त्यामुळे घराची व परिसराची स्वच्छता हे उत्तम आरोग्या चे महत्वाचे अंग आहे.

आपले मन स्वच्छ,  तर आपले घर स्वच्छ।

आपले घर स्वच्छ, तर आपला परिसर स्वच्छ।।

या उक्ती प्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारीही स्वत: पासून सुरु करावी लागेल. त्याच प्रमाणे मी स्वत: ही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवडयातून किमान १ तास स्वच्छता करण्याचा संकल्प करुन तसा प्रयत्नही सुरु केलेला आहे. त्याचप्रमाणे मी स्वत: ही घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देण्याचा प्रयत्नकरीन.  सर्व प्रथम मी स्वत: पासून,  माझ्या कुटूंबा पासून, माझ्या गल्ली / वस्तीपासून, माझ्या गावा पासून ते कार्यस्थळा पर्यंत या कामास सुरुवात केलेली आहे व पुढे ही करेन. त्याच बरोबर माझे सम विचारी, सहकारी यांच्या तही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देवून त्यांनाही या कामात सक्रीय सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मला माहित आहे की,  मी व माझ्या प्रमाणेच, असंख्य व्यक्तींनी स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.

गाव ही शरीर।त्यास राखावे नेहमी पवित्र।

त्याने च नांदेल सर्वत्र।आनंदी गावी।।

रामधून पूर्वी गावपूर्ण।व्हावे स्वच्छ,  सौंदर्यवान।

कोणाही घरी गलिच्छपणा।न दिसावे।।

स्वत: प्रमाणेच, सभोवतालीचे परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बानावयास हवी.

Cleanliness is next to Godliness - म. गांधी या घोष वाक्यास अनुसरुन मा.पंतप्रधान यांनी नेमके आपल्या मर्मावर बोट ठेवून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. आपले सर्वांचेच हे कर्तव्य ठरते की, आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवर च भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. यामुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.

पहिले पाऊल घरचा धंदा।दुसरे पाऊल दारच्या प्रबंधा।।

पुढे ग्राम सफाईच्या छंदा।लावोनि घ्यावे आनंदे।।

सार्वजनिक स्वच्छते मध्ये येणाऱ्या गोष्टी :-

१) पाणी व्यवस्थापन :- ग्रा.पा.पु., स्वच्छता समिती व ग्राम सभेमार्फत जल अंदाज पत्रक व त्याची अंमलबजावणी, टि. सी.एल.पावडर / हायपोचा नियमित वापर, शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा, पाणी गळती थांबविणे.

२) सांडपाणी व्यवस्थापन :- शोषखड्डे, बंदिस्तगटारे, परसबाग, शेतीउदयोग इ. द्वारे शास्त्र शुध्द विल्हेवाट व पूर्नवापर करणे.

३) शौचालय / मुतारीव्यवस्थापन :- विविध उत्सवातील विसर्जन करुन पर्यावरण दृष्टया अंमलबजावणी करणे,  सार्वजनिक ठिकाणी पुरेशी शौचालये व मुतारींची व्यवस्था व वापर तसेच, हात धुण्यासाठीची व्यवस्था व पुरेसे पाणी  (उदा. शाळा, कॉलेजेस, बसस्थानके, भाजीमार्केटवगैरे) सार्वजनिक शौचालयांमधील मैल्याची विल्हेवाट करुन बायोगॅस,  सोन खतनिर्मितीही करता येवू शकते.

४)घन कचरा व्यवस्थापन :- कचरापेटयांची पुरेशी संख्या,  ओला, सुका व प्लॅस्टिक कचरायांचे वेळोवेळी वर्गीकरण व विल्हेवाट,  कचरा उचलून नेण्याची सातत्यपूर्ण व स्वतंत्र व्यवस्था, ओल्या कचऱ्याचे नॅडेप/ गांडूळखत/कंपोस्टखत इ.  मार्गाने खतात रुपांतर व पूनर्वापर तसेच दवाखाने, रुग्णालये येथील घातक ठरणाऱ्या कचऱ्याची शास्त्र शुध्द पध्दतीने विल्हेवाट लावून आर्थिक उत्पन्नही मिळविता येवू शकते.

५)अपारंपारिक उर्जेचा वापर  :- स्ट्रीट लाईट,  सोलर यांचा वैयक्तिक व सार्वजनिक वापर करणे, प्लॅस्टिकबंदी (५०मायक्रॉन) ची अंमलबजावणी करणे.

६) पर्यावरण सवंर्धन :- वृक्षलागवड, जतन,  संवर्धन, टॅगिंग करणे व वृक्ष लागवडीची नोंद ठेवणे.

७)घर / गांव / परिसरस्वच्छता :- गावातीलरस्ते, गल्ल्या, घरासमोरीलअंगणे, परसबागा, स्वच्छता, सजावट व वृक्ष संवर्धन तसेच,  अन्न धान्य साठवणुक पिण्याच्या पाण्याची व वापराची शास्त्र शुध्द व्यवस्था,  स्वच्छता नीटनेटकेपणा इत्यादी.

आपण नेहमी पैसा – वस्तू अशा गोष्टी दान करतो. आज आपला देश आपल्याला आपल्या श्रमाचे दान मागतो आहे. नागरीकांच्या सहकार्याने चे हे शक्य होऊ शकते. तेव्हा या अभियानांतर्गत म्हणा किंवा स्वयं प्रेरणेने म्हणा, आपला सभोवतालील परिसर जरुर स्वच्छ करा.पण,  मुळात आपणच अस्वच्छता करण्यासकारणीभूत ठरत तर नाहीना ?याचा विचार करुन आधी   अशा प्रकारचा कचरा / अस्वच्छतेला पायबंद घाला.सुधारणा च करायची असेल तर दुसऱ्याकडे बोट न दाखविता आणि यंत्रणांना दोष न देता स्वत:  पासून च सुरुवात करा.  तरच, आपला देश स्वच्छ आणि सुंदर होऊ शकेल.

गाव व्हावया निरोगी सुंदर। सुधारावे लागेल एकेक घर।

आणि त्यातून हि घरात राहणार।करावा लागेल आदर्श।।

चला तर, आपण स्वत: आपला परिसर, आपला भारत स्वच्छ राखूया.

निबंध लेखक : श्री.दत्तात्रय बाळकृष्ण उरमुडे, मु.पिंपळगांव वाघा, पो.निमगांव वाघा, ता.जि.अहमदनगर

निबंध २ : विकासपिडिया शालेय गट

मन करारे प्रसन्न !

सर्व सिद्धीचे कारण “

मन हा सर्वात सुंदर गोष्टींचा सुंदर शिल्पकार असतो .निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आपले शरीर एक सुंदर देवालय आहे आणि देवालयात मनरूपी देव वास करत असतो. मन जर सात्विक असेल ,सात्विक विचाराने परिपूर्ण असेल तर आपल्या हातून नवनिर्मितीचे कार्य घडते व या कार्याने आसमंताच्या चारी दिशा उजव्वून जातील यासाठी निरोगी मन असणे महत्वाचे आहे .निरोगी मन हे निरोगी शरीरात असते .शरीर निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेचा फार मोठा वाटा असतो .

ज्ञानदेव पाया रचिला ,

तुका झालासे कळस !!

समाज जागृतीचा ,समाज परिवर्तनाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला , नामदेवांनी ह्याच्या भिंती बांधल्या ,एकनाथांनी त्यावर घुमट चढवला आणि त्यावरती कळस तुकोबारायांनी चढविला अशा या सामाजपरीवर्तनाच्या कळसावर पताका लावण्याचा कार्य संत गाडगेबाबांनी केले.

सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभले !

करी धरीयेले गाडगे ,काठी !

डोई शुभ्र केस उडती वारयाने!

चिंध्या प्रकाशाने चमकती !

स्वतः निरक्षर असणाऱ्या या महामानवाने स्वच्छतेचे महत्व समजले .स्वतःचे सर्व आयुष्य त्यासाठी समर्पित केले .आपल्या अभूतपूर्व कर्तुत्वाने ‘स्वच्छतेचा ‘ वसा या राष्ट्रासंताने भारताला ज्ञात करून दिला .’जीवनात स्वछता श्रेष्ठ आहे ‘ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबांनी स्वतःच्या आचरणातून पटवून दिले .त्यांच्या उपदेशातूनच स्वच्छतेचा मंत्र मिळाला .

‘भारत माझा देश आहे .सारे भारतीय माझे बांधव आहेत .समृद्धीतेने  व विविधतेने नटलेल्या भारताचा मला अभिमान आहे ‘ हि प्रतिज्ञा म्हणताना आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असण्याबरोबरच देशासाठी आपण स्वतःला करावयाची कर्तव्याविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे . विविध नैसर्गिक सौदेर्याने नटलेल्या या देशात सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे  असंख्य बाबीमुळे कचऱ्याचे प्रमाण अस्वच्छतेचे प्रमाण वाढतच आहे .अशा गलिच्छ वातावरणात राहण्यामुळे आपली शारीरिक क्षमता कमी होतेच पण मानसिक आजार देखील होऊ शकतात .

हिरवे हिरवे गालिचे !

हरिततृणांच्यामखमालीचे !

त्या मखमाली वरती ,

फुलराणी ती खेळत होती !

हि कविता ऐकली कि आपल्या डोळ्यासमोर जणू स्वर्गच उभा राहतो .पण याचे स्वप्न न पाहता स्वर्ग प्रत्यक्षात निर्माण करू शकतो . आज आपण विचार केला तर आपापल्या खाण्यापिण्यासाठी जेवढा खर्च होतो त्याच्या हि पेक्षा अधिक खर्च रोगराईसाठी होतो . हि परिस्थिती बदलण्यासाठी आरोग्याचा गुरुमंत्र सर्वांनी स्वीकारायला हवा .

स्वच्छतेचा घेऊन ध्यास

मनात फुलांची फुलवली आस

परसदारी फुलवली सुंदर बाग .

हि सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मला असे वाटते कि स्वच्छतेचा पाठ हा स्वतःपासून गिरवावा . मला वाटते याचा प्रारंभ वैयक्तिक स्वच्छतेपासून करावा .मी स्वतःला स्वच्छ राखण्यासाठी अनेक गोष्टी करू शकते आणि करण्यास प्रारंभ केला आहे . उदाहरणार्थ – नियमित अंघोळ करणे ,दात घासणे ,दात, डोळे, कान यांचे आरोग्य राखणे , केस व नखे योग्य वेळी कापणे .मी वैयक्तिक स्वच्छता राखू शकेल तरच आजूबाजूची परिसर स्वच्छता करण्यास पात्र ठरेन नाहीतर ‘दुसरया शिकवे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण ‘ अशी आवस्था होईल .वैयक्तिक स्वच्छतेबरोबेरच परिसर स्वच्छताही महत्वाची आहे .आपण ज्या घरात राहतो ते स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो उदाहरनार्थ आई हि सतत कामात व्यस्त असते. तिच्या कामात मदत करू शकते तिच्याकडून कचरा कुठेतरी टाकला जाण्यापेक्षा कचऱ्याचा डबा आणून त्यात एकत्र करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे. ओला कचरा सुखा कचरा वेगळा करून ठेवणे. इ बाबी घर स्वच्छ करण्यासाठी तसेच नियमित घरातील कचरा काढणे .सर्व वस्तू जागेवर ठेवणे इत्यादी .

वडील स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असतात .संडास ,बाथरूम ,बेसिन याची स्वच्छता घराबाहेरील परिसर स्वच्छता याचबरोबर शेजारी असणारी मोकळी जागा रस्ता या जागेतील स्वच्छता ते स्वतः करतात .मला त्याचा अभिमान वाटतो .जे त्यांना वाटते तेच मलाही वाटते .स्वच्छतेमुळे रोगराई दूर पडते .आता आजूबाजूच्या परिसर स्वच्छतेत मर्यादित राहण्यापेक्षा आपण गाव स्वच्छतेकडेही वळले पाहिजे .

ईश्वर व्यापिले हे विश्व

म्हणोनी जगाची आम्हा देव

विश्वाचा मुळ घटक गाव!

ग्रामगीता त्यासाठी

यात ग्रामाचा जयजयकार

सर्व तीर्थांचे ग्रामची माहेर .

ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर

ग्रम नसता प्रलयची!!

हे लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र आळवायचा आहे .”माझ गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल “हि भावना मनात रुजवायची आहे. आपला देश खेड्यांचा ,गावांचा देश आहे . जोपर्यंत खेडे स्वच्छ व सुंदर व निर्मेल होणार नाहीत तोपर्यंत भारत स्वच्छ व सुंदर बनू शकणार नाही . स्वच्छतेच्या पायरीवर खंबीरपणे उभे राहून आरोग्याची कास धरूनच विकासाची समृद्धीची फळे चाखता येणार आहेत .

मी अशी प्रतिज्ञा करते कि-  माझ्या घराच्या ,सभोवतालच्या स्वच्छ परीसराबरोबरच ,शाळेतील किंवा सार्वजनिक ठिकाणी जाईन त्या ठिकाणी माझ्याकडून कोणत्याही प्रकारे अस्वच्छता निर्माण होणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. तसेच माझ्या मैत्रिणीला हि याबाबत तसेच नातेवाईकांना सहयोगी करून घेईल . माझ्या देशातील प्रत्येक परिसर माझाच आहे .मला त्या परिसरात अस्वच्छता पसरू दयावयाची नाही हेच माझे कर्तव्य राहील आणि मी सतत प्रयत्नशील राहीन. राष्ट्रसंताचे विचार जगवण्यासाठी

“स्वच्छतेचे देशविकासाचे स्वप्न पाहून !

नित्याची धडपड ठेऊन !!

संताचे विचार घेऊन !

देशाला ,राष्ट्राला बनवू महान”!!

 

निबंध लेखिका - कु. आकांक्षा चव्हाण (श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय ,उंब्रज  ता. कराड ,जी. सातारा )

निबंध ३ : विकासपिडिया नोंदणी लेखक गट

‘केल्याने होत आहे|

आधी केलेचि पाहिजे|’

संत रामदास यांच्या काव्यकल्पनेनुसार दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी एखादे काम आपण केले पाहिजे. आधी केले मग सांगितले असे होईल. शारीरिक श्रम न केल्यास नाना व्याधी आपल्या जीवनात उभ्या राहतात. म्हणून बुध्दीजीवी कामे करणाऱ्यांनी दररोज काही वेळ तरी शारीरिक श्रमाची किंवा मेहनतीची कामे केळी पाहिजेत.

शरीर सुदृढ असेल तर आपण कष्टाची कामे सहज करू शकतो. कष्टाची कामे करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःच्या दैनंदिन कामांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष देते. सकाळी उठल्यानंतर दात घासणे, अंघोळ करणे, केस नीट विंचरणे, पावडर लावणे, छान असा पोशाख करणे, पोशाखाला शोभेल अशी चप्पल घालणे, मगच बाहेर पडणे. हि झाली बाह्य स्वच्छता. शरीरावर दागिने घालून बाह्य शरीर सुंदर बनवितो. पण

नाही निर्मळ जीवन|

काय करील साबण|

संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार शरीरावर दागिने घालून शरीर सुंदर बनवितो साबणाने शरीर (बाह्य) स्वच्छ करतो, परंतु मनामधील वाईट विचार, खोटे बोलण्याची सवय असेल, इतरांना फसविणे, दुसऱ्यांना लुबाडणे, खोटे सांगणे, टिंगल-टवाळी करणे इ. सवयी नाहीशा करण्यासाठी साबणाचा उपयोग होणार नाही. तर मनातील विचार सुंदर व स्वच्छ बनविणे आवश्यक आहे.

थोर नेत्यांची थोर विचारांची पुस्तके वाचून माझे मन स्वच्छ बनविण्याचा प्रयत्न केला. आता माझे शरीर व मन अंतर्बाह्य खऱ्या अर्थाने स्वच्छ झाले. स्वतःची स्वच्छता झाली म्हणजे सर्वकाही स्वच्छ झाले असे नाही. तर माझे कुटुंब, गाव, समाज, राज्य, राष्ट्र या सर्वच ठिकाणी स्वच्छता करायची आहे. सर्व ठिकाणे स्वच्छ करणे शक्य नाही. पण कुटुंब, गाव व आजूबाजूचा परिसर मी निश्चित स्वच्छ करू शकते.

मी माझी स्वच्छता जशी केळी त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वच्छ कशी बनेल? याचा विचार केला. घरातील सर्व समान व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. प्रत्येकाने मला या कामात मदत केळी.

माझ्या कुटुंबाची स्वच्छता झाली आता आजूबाजूच्या परिसर (गाव, शेजारी) स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. आजूबाजूच्या परिसरातील, शाळा, रस्ते, भाजीमंडई, सार्वजनिक ठिकाणे(देवालये, चित्रपटगृह, दवाखाने) इ. असंख्य गोष्टी आहेत.

मी वरील काही घटक घेऊन पुढीलप्रमाणे प्रयोग करायला सुरुवात केळी. सर्व प्रथम मी शाळा घटक निवडला. जिथे विद्यार्थ्यांना घडवले जाते, ज्ञान दिले जाते तेच स्वच्छतेचे महत्त्वाचे द्योतक आहे. परिसर का स्वच्छ ठेवायचा? कसा स्वच्छ ठेवायचा? हे सर्व त्या विद्यार्थांना सांगितले. आजूबाजूच्या कचऱ्यामुळे रोगराई पसरते. ती कशी दूर केळी जाईल हे समजावून सांगितले. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थांना समजल्या. कुठेही कागद किंवा अन्य कोणतीही टाकाऊ वस्तू टाकायची नाही. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पेन्सिलला टोक काढलीतरी वर्गात कचरा टाकत नाही. त्यासाठी वेगळी सोय करतात. दप्तर वेळच्यावेळी धुणे, दप्तर स्वच्छ ठेवणे हे सर्व विचार विद्यार्थ्यांना समजले आणि काय? विद्यार्थीच शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करू लागतील! शाळेच्या शिपायांना स्वच्छतेचे कामच उरणार नाही.

शाळेचा परिसर स्वच्छ झाला व आजूबाजूचा परिसर व्यक्ती स्वच्छ होणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी दोन किंवा तीन दिवसांनी एक तास पाणी येते. त्या लोकांना पाण्याचा काटकसरीने वापर कसा करायचा हे सांगितले. ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा ’, हि मोहीम आखली आणि पाण्याचा साठ केलं. अर्थात स्वच्छतेला पाण्याची गरज आहे हे समजले. सर्वांनी स्वतःला व आजूबाजूला परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली.

शाळेच्या समोरच रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूना दुकाने आहेत. काय मजा बघा. दोन्ही बाजूचे दुकानदार आपल्या दुकानाच्या समोरील जागा झाडूने झाडून कचरा रस्त्याच्या मध्यभागी आणून गोळा करतात. याला कारण काय असेल? रस्ता सरकारने बनविला आहे. त्यावर कचरा टाकला तरी कुणीही विचारणार नाही. अशा या दुकानदारांना एकत्र केले त्यांना विचारले,” तुम्ही हा कचरा रस्त्यांच्या मध्यभागी आणून का गोळा करता. कचरा कचरा पेटीत का टाकत नाही. एकाने उत्तर दिले, कचरा गोळा करण्यासठी महानगरपालिकेचे सफाई कामगार येत्तात. टे उचलतील!

दुसरा म्हणाला, ‘ मी रोज रस्त्यावरचा कचरा का भरू? रस्ता माझा काही एकट्याचा नाही. तो आपल्या सर्वांचा आहे. मी त्यांना असे सांगू इच्छिते, “ अहो आपल्या दुकानातील प्रत्येक वस्तू तुम्ही स्वतःची आहे असे म्हणता. प्रत्येक वस्तू तुमची आहे म्हणून तिची काळजी घेत्ता, स्वच्छ ठेवता, कुणालाही हात लावू देत नाही. त्या वस्तू व्यवस्थित जपून ठेवता. वस्तू मात्र तुमच्या आहेत. रस्ता तुमचा नाही. जर प्रत्येकाने हा रस्ता माझा आहे. तो माझ्यासाठी आहे. असे म्हटले तर रस्त्यावर कचरा साठणारच नाही. जेवढी आपण दुकानातील वस्तूंची काळजी घेतो तेवढी रस्त्याची काळजी घेतली, रस्ता स्वच्छ ठेवला तर रस्ता सुद्धा माझा होईल ना! तो स्वच्छ ठेवायची जबाबदारी माझी राहील. खरंच हा उपक्रम राबविला तर रस्त्याची स्वच्छता निश्चितच होईल.

पुढील उपक्रम आहे भाजीमंडईतीळ कचरा. अरे बापरे! भाज्यांच्या कचऱ्याचा ढिगारा बाजूलाच पडला होता. बरेच दिवस झाले कचरा उचलला नव्हता. शेवटी भाजी सर्व विक्रेत्यांना एकत्र करून त्यांना सांगितले, भाज्यांची पाने, त्यांची मुळे, ओल्या भाज्या, सुक्या भाज्या अशी वेगवेगळी वर्गवारी करावी. रोज एका किंवा दोन व्यक्तींनीवरील कचऱ्याचे डबे उचलून कचराकुंडीत कचरा टाकावा. महानगर पालिकेच्या व्यक्ती येईपर्यंत थांबायचे नाही. अशाप्रकारे काम करू लागले तर कचऱ्याचा ढीग राहणारच नाही. तेथील कचऱ्याचा वास नाहीसा होईल. स्वच्छता राखली जाईल.

भाजीमंडईतील कचरा ‘कचराकुंडीत’ जाऊ लागल्यामुळे गावकुसाबाहेर दुर्गंधी पसरू लागली. रोग्रयीचे प्रमाण वाढले. महानगरपालिकेच्या व्यक्तींना सुका कचरा व ओला कचरा अशा दोन कचरापेट्या तयार करायला सांगितल्या. प्रत्येक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींनी वरीलप्रमाणेच कचरा टाकायचा आहे हे सांगितले. प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये दोन डबे करण्यास सांगितले. त्यामुळे कचरा इतरत्र भर टाकण्यासाठी मिळतो. ओल्या कचर्यापासून खत बनविले जाते. या सेंद्रिय खताचा उपयोग शेतीसाठी केला जातो. त्यामुळे दुर्गधी नाहीशी झाली.

पण दुसरे संकट मी त्या भाजी विक्रेत्यांजवळ ठेवले. कोणते बरे! जो कापडी पिशवी घेऊन येईल किंवा भाजी हातातून घेऊन जैन त्यालाच भाजी विकत द्यायची. भाजीची विक्री नाही झाली तरी चालेल. सर्व भाजी विक्रेत्यांनी असे केले तर नक्कीच प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी येईल व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील.

याशिवाय चित्रपटगृह, हॉस्पिटल इ. ठिकाणी विविध उपक्रम योजून स्वच्छता राबविता येईल.'

निबंध लेखिका  - संध्या जयवंत राणे (जोगेश्वरी पूर्व मुंबई )

 

 

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate